मराठा समाजातील छोटा शेतकरी आणि कष्टकरी आज मोठ्याच अडचणीत सापडला आहे. शेतीला पाणी नाही, डिग्र्रीला नोकरी नाही आणि उद्योगासाठी भांडवल नाही. या सगळ्या बिकट परिस्थितीला कोण, कसे, किती जबाबदार, याविषयी बरेच विश्लेषण करून झाले आहे. एकूण परिस्थितीची भीषणता मराठ्यांच्या अभूतपूर्व मूक मोर्चांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के असणारा हा समाज काही धनाढ्य, पुढारी, उद्योजक, सरकारी व संघटित कर्मचारी सोडल्यास आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. दोषारोपांच्या गर्तेत पुन:पुन्हा न अडकता, चांगल्या व टिकाऊ उपायांचा शोध घेणे आणि या उपायावर तातडीने, पण शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यास प्रारंभ व्हायला हवा. पहिला आणि महत्त्वाचा उपाय हा ‘सरकारी शेती’ची मुहूर्तमेढ रोवण्याचा. शेतीचा एकत्रित आकार मोठा केल्यास ती किफायतशीर होऊ शकेल. तीन प्रागतिक स्तरांवर शेतकऱ्यांना एकत्र येता येईल. पहिल्या स्तरावर आपली मालकी शाबूूत ठेवून, शेतकरी एकत्रितपणे शेती प्रक्रिया करू शकतील. पेरणी, नांगरणी, कापणी, जलसिंचन, साठवणूक, वितरण, बाजाराचा अभ्यास आदि गोष्टी सहकारी तत्त्वावर केल्यास एक संस्थात्मक सामूहिक शक्ती उभी राहील. दुसऱ्या स्तरावर हे शेतकरी ‘सामूहिक मालकी-सहकारी भांडवल’ या गोष्टीचा अंगिकार करू शकतील. तिसऱ्या व अंतिम स्तरावर ते आपल्या मूल्य-साखळीला पुढे नेत शेतीवर आधारीत उद्योग उभे करू शकतील. या उद्योगांमध्ये शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला रोजगार मिळू शकेल.आजच्या पदव्यांच्या भेंडोळ्यांना किमान रोजगार मिळणेही दुरापास्त झाले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या प्रकारे गरिबांसाठी रयत शिक्षण संस्था उभी केली, त्याचप्रकारे तांत्रिक रोजगारक्षम शिक्षण संस्था सहकारी तत्त्वावर उभ्या कराव्या लागतील. दहावीनंतर दोन किंवा तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असावा. तांत्रिक, शेतकरी प्रक्रिया, सेवाक्षेत्र, छोटे उद्योग अशा प्रमुख विषयांचा बाजाराधिष्ठित अभ्यासक्रम या युवकांना उपलब्ध करून द्यावा लागेल. हा पर्याय शेतीला आधार देणारा ‘रोजगार निर्मिती’चा मोठ्या प्रमाणावर राबवावा लागेल.शेती, शिक्षण, छोटे उद्योग इ. गोष्टींसाठी पैसा लागणारच. यासाठी ‘मराठा फंड’ उभा करणे. सहकारी व सहकारी बँका, मध्यमवर्गीय मराठा कुटुंबे, मराठा उद्योजक हा फंड उभा करू शकतील. मराठा फंडची उत्तम संस्थात्मक उभारणी करावी लागेल. या फंडाचे लाभार्थी मिळालेल्या वित्तीय मदतीचा उत्तम उपयोग करताहेत की नाही, यासाठीची चांगली ‘नियमन पद्धती’ बनवावी लागेल. फंडाची उभारणी करण्यासाठी जपानी व अन्य आंतरराष्ट्रीय बँकांची मदत घेता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे, तथाकथित सहकारी महर्षी, शिक्षण सम्राट, साखर सम्राट आदि महाभागांना कसोशीने या उपक्रमापासून दूर ठेवावे लागेल.चौथा उपाय उद्योजकतेसंबंधीचा. चार चढत्या स्तरांवर उद्योजकतेचा विकास व बांधणी करावी लागेल. युवा मराठ्यांना सूत्रबद्ध व शिस्तबद्ध उद्योजकतेचे धडे देणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यासाठी मराठा समाजाने नि:संकोचपणे मारवाडी, गुजराती उद्योजकांची मदत घ्यावी. भांडवल, जमीनजुमला, संख्याबळ किंवा राजकीय पाठिंबा नसतानाही, मारवाडी समाजाने आपली उद्योजकता संपूर्ण देशात उभी केली. सामुदायिक पद्धतीने उद्योजकतेच्या अनेक समान प्रक्रिया मराठा उद्योजकांनी एकत्रितपणे राबवाव्या. दुसऱ्या टप्प्यात ते समान ब्राँडिग व समान ओळख आदी तत्त्वांचा वापर करू शकतील. तिसऱ्या टप्प्यात ते स्वत:चा सामायिक फंड उभा करतील. प्रत्येकाची वित्तीय गरज या फंडातून भागवली जाईल. चौथ्या व अंतिम टप्प्यावर ते स्वत:ची एक विशाल ‘कॉर्पोरेट संस्था’ बनवू शकतील. पाचवा आणि सर्वाधिक महत्त्वाचा उपाय मराठ्यांनी मानसिकतेत बदल करण्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या या समाजाने त्यांची व्यूहनीती, लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आणि सर्वांनाच सोबत नेण्याचे एकीचे तत्त्व प्रखरतेने अंगिकारले पाहिजे. शून्यातून स्वराज्य उभे करण्याची किमया या युगपुरुषाने साधली. आज मराठ्यांनी त्यांचे खरे हितैषी ओळखायला हवेत. मानसिकतेत बदल करताना छत्रपती शाहू महाराजांचे प्रागतिक विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि महात्मा फुल्यांचे सत्यशोधकी विचार या समाजाने अंमलात आणले पाहिजेत. समाजाचा एकजिनसीपणा हा सामुदायिक प्रगल्भतेवर आधारित असतो. अशा प्रगल्भतेची वैज्ञानिक तारतम्य आणि सामाजिक भान ही दोन प्रमुख अंगे. प्रत्येक मराठ्याला बुध्यांंक, भावनिक, उद्योजकांक व ऊर्जांकाचा योग्य समतोल साधता आला पाहिजे.अत्यंत कमी संख्येने असणारा पारसी समाज, मुंबईतील बहुतेक हॉटेलांचा मालक असलेला शेट्टी समाज, मुंबईच्या काळबादेवीपासून ठाण्याच्या आदिवासी पाड्यापर्यंत सर्वत्र आपली मोहोर उमटविणारा आणि देशभरात सर्वत्र आपली दुकाने थाटणारा माहेश्वरी अग्रवाल समाज जर अभ्यासले, तर लक्षात येईल की, ‘एकसंध समाज’ अगदी सुलभतेने नवनिर्मिती करू शकतो. यासाठी कल्पकता, धोका पत्करण्याचे धाडस, सर्वांना सोबत नेण्याचा दिलदारपणा, संधीवर स्वार होण्याची हुशारी हे शिवरायांचे गुण मराठी युवकांनी आता प्रभावीपणे आचरणात आणले पाहिजेत.छोटे शेतकरी व कष्टकरी आणि त्यांची मुले आज नोकऱ्यांच्या व योग्य शिक्षणाच्या शोधात आहेत. अखेरीस एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायला हवा. ज्या बहुतेक मराठा ‘पुढाऱ्यां’नी आपल्या समाजाचा फक्त ‘वापर’ केला, ते आज मोर्चांच्या पाठीमागून चालत पुन्हा नवी खेळी खेळताहेत का? श्रीमंत मराठी शेतकरी आयकर भरणार का? मराठा शिक्षण सम्राट आपल्या संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना नि:शुल्क घेणार आहेत का? मराठा साखर उद्योग मळी इत्यादि सम्राट आपल्या आस्थापनांमध्ये मराठ्यांना वाढीव नोकऱ्या देणार आहेत का? सत्तेची उब चाखलेले निवृत्त मराठा प्रशासकीय अधिकारी आपला वेळ व अनुभव मराठा युवकांना देणार? अतिधनाढ्य मराठा ‘मराठा फंडा’स आधार देतील? अर्थात, या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतीलच. मराठा युवकांनी मात्र, आता ‘सुधारणेच्या वाटा’ स्वत:च तयार कराव्यात!-डॉ.गिरीष जाखोटीया(नामवंत अर्थतज्ज्ञ)
मराठा समाजाच्या सर्वंकष विकासाची पंचसूत्री
By admin | Updated: October 19, 2016 06:36 IST