शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आघाड्यांची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 08:46 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी देशव्यापी दौरा करून साऱ्या समविचारी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली.

लोकसभेच्या अठराव्या सार्वत्रिक निवडणुकीला आता केवळ आठ महिने उरले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वबळावर देशात सलग दोन सार्वत्रिक निवडणुकांद्वारे सत्तेवर आला असला तरी आगामी निवडणुकीचे वारे काही वेगळेच वाहत असल्याचे दिसते आहे. परिणामी भाजपला पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ची आठवण येऊ लागली आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ३०० जागा जिंकण्याचा पराक्रम केल्यानंतर एनडीएला जणू अडगळीत टाकल्यासारखी स्थिती होती. काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर समविचारी पक्षांना एकत्र करून आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी देशव्यापी दौरा करून साऱ्या समविचारी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली. त्यानुसार १७ राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पाटण्यात गेल्या महिन्यात झाली. त्यांची दुसरी बैठक आता १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूमध्ये होत आहे. जागावाटपाचे सूत्र, समान कार्यक्रम, आदींवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे, असे म्हटले जाते. दरम्यान, या आघाडीतील एक प्रमुख नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यांच्या पुतण्यानेच बंड करून भाजप-शिवसेना युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पक्षाने समान नागरी कायदा या विषयावर केंद्र सरकारला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए किंवा काँग्रेस आघाडीशिवाय काही पक्ष आहेत. ते अद्याप दोन्हीही आघाडीत आलेले नाहीत. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष आणि तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएस यांचा त्यात समावेश होतो. 

समान नागरी कायद्यावरही या पक्षांनी भूमिका जाहीर केलेली नाही. भाजपप्रणीत एनडीएमध्ये यांपैकी काही पक्ष सहभागी होतील. शिवाय पंजाबमधील अकाली दल, महाराष्ट्रातील अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एनडीएत सक्रिय होणार आहेत. या पक्षांच्या भूमिकांवरून राष्ट्रीय पातळीवरील आघाड्यांच्या राजकारणाची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. याच अधिवेशनात समान नागरी कायदा मांडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी विरोधातील काही पक्षांची मदत लागेल. यासाठी एनडीए पुन्हा सक्रिय करून देशपातळीवरील राजकारणात घटकपक्षांना महत्त्व देत आहोत, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. उत्तर प्रदेशात अपना दल सहभागी आहे. बसप स्वतंत्र राहिला तर भाजपला मदतच होणार आहे. 

बिहारमध्ये चिराग पासवान तसेच उपेंद्र कुशवाह यांची साथ भाजपला हवी आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षामुळे तिथले राजकीय समीकरणच बदलून गेले आहे. अकाली दल सध्या तरी स्वतंत्र जाण्याची भाषा करीत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून हा पक्ष भाजपपासून अंतर राखून राजकारण करीत आहे. दक्षिणेत अण्णा द्रमुक किंवा जनता दल, तसेच वायएसआर काँग्रेस किंवा तेलुगू देसम यांपैकी निवड करावी लागणार आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस आणि भाजप या पक्षांच्या आघाड्यांपासून बीआरएस दूर राहील, असे स्पष्ट दिसते आहे. अलीकडे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला खम्माम येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. बीआरएस आणि तेलुगू देसमचे माजी पदाधिकारी, माजी आमदार मोठ्या संख्येने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. काँग्रेस पुन्हा एकदा तेलंगणाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. समान नागरी कायदा, राममंदिराचे उद्घाटन, आदी कार्यक्रम घेऊन भाजप हिंदुत्वाची हवा पुन्हा एकदा भरण्याच्या मार्गावर आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपप्रणीत आघाडीत येण्यासाठी कोणी तयार नाही. मात्र काँग्रेस आघाडीत तृणमूल कॉंग्रेस, डावे आणि काँग्रेस एकत्र कसे घेता येणार, हा प्रश्नच आहे. या महत्त्वाच्या राज्यात आज (दि. ८ जुलै) स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होत आहे. त्याचा एकूण कल काय असणार यावरही बरेच अवलंबून आहे. मणिपूरचे प्रकरण ईशान्य भारतात भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते. भाजपकडे बहुमत असले तरी वजाबाकी होण्याची शक्यता असल्याने मित्रपक्षांची आठवण काढण्यात येत आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आदी राज्यांत स्थानच नसल्याने आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा आघाड्यांच्या राजकारणाला बळकटी मिळणार, असे दिसते आहे. परिणामी सर्वांना बरोबर घेऊन आघाड्या करण्याची कसरत सर्वच राजकीय पक्षांना करावी लागणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण