शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

सणासुदीच्या तोंडावर बळीराजा सापडलाय संकटात!

By किरण अग्रवाल | Updated: October 29, 2023 11:27 IST

Farmers is in trouble : बळीराजाला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

- किरण अग्रवाल

सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना भाव नसल्याने बळीराजा चिंतित आहे. विम्याची तकलादू रक्कम व निसर्गाचा फटका अशा संकटात दिवाळी गोड कशी होणार?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रण माजले आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या विजयादशमीला विविध राजकीय पक्ष व नेत्यांच्या मेळाव्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या; पण या साऱ्या गदारोळात आमच्या बळीराजाचे हबकलेपण किंवा त्याची विवंचना काही दूर होऊ शकलेली नाही.

मुळात या हंगामात पावसाची खफा मर्जी राहिली, पावसाच्या तुटीमुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. ती करूनही म्हणावे तसे पीक आलेच नाही. सोयाबीनवर यलो मोझॅकचे आक्रमण झाल्याने फटका बसला, तर कापूस फारसा समाधानकारक झाला नाही. उडीद, मुगाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. म्हणजे एकीकडे उत्पादनाला फटका बसला तर दुसरीकडे उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासे झाला आहे. आपल्याकडे अल्पभूधारकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सोयाबीन असो की कापूस; जे काही उत्पादन आले ते घरात साठवण्याची सोय नसल्याने व गोडाऊनमध्ये नेऊन घालणे खिशाला परवडणारे नसल्याने बाजारात मिळेल त्या भावात विकण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. तात्पर्य, बळीराजाला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा गतवर्षी सीसीआयसोबत करार झाला नसल्याने ‘पणन’ने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. यावर्षीही सीसीआयने त्यांचे खरेदी केंद्र उघडण्याची घाेषणा केली आहे़ परंतु, पणन महासंघासाेबत अद्याप करार झाला नाही. या दाेेन्ही संस्थांनी कापूस खरेदी सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. नाफेडनेही सोयाबीनची खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे त्याचीही पडत्या भावात विक्री करावी लागत आहे.

बरे, शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला; राज्यात एक रुपयात विमा या योजनेपोटी शासनाने कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या हाती विम्याची नुकसान भरपाई येताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी व विरोधी पक्षांनी खूप आरडाओरड केली; परंतु विमा कंपन्यांच्या कार्यालयावरील माशी उडाली नाही. आताचा हंगाम तर गेला आहेच; परंतु कमी पावसामुळे जमिनीत ओल नसल्याने यापुढील रब्बी हंगामही नीट होईल याची शाश्वती नाही. पण शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कुणी लक्ष देताना दिसत नाही. आपापल्या राजकीय चिंतेत सारेच मग्न असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.

दिवाळी तोंडावर आली, दिवाळी पाठोपाठ लग्नसराई सुरू होईल; पण सण साजरा करायला किंवा लग्नसराईसाठी बळीराजाच्या हाती पैसा आहे कुठे? परिस्थिती अशी आहे की, शेतशिवारातील चटका जाणवतो आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उचल खाल्ली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आंदोलन उभारते आहे. म्हणजे सणासुदीचा आनंद व्यक्त करीत पोराबाळांना घेऊन बाजारात खरेदीला जाण्याऐवजी बळीराजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

सारांशात, निसर्गाने दिलेला फटका बघता बळीराजाची दिवाळी गोड होईल अशी चिन्हे नाहीत. सरकार त्यांच्या राजकारणाच्या विवंचनेत आहे हे खरे, पण शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढायचे तर किमान कापूस, सोयाबीनच्या हमीभावाची खरेदी केंद्रे तरी तातडीने सुरू होणे अपेक्षित आहे.