शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

श्रद्धेच्या नावावर लिंगभेद नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 04:55 IST

कोणत्याच देवाच्या दरबारात महिलांना विनाभेदभाव प्रवेश असावा ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

- अ‍ॅड. असीम सरोदेकोणत्याच देवाच्या दरबारात महिलांना विनाभेदभाव प्रवेश असावा ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. कारण शबरीमला मंदिराप्रमाणेच सगळ्या इतर जाती-धर्मांची प्रार्थनास्थळेही महिलांसाठी प्रवेशमुक्त करावी हा विषय आता सर्वोच्च न्यायालय ऐकून घेणार आहे. त्यामुळे केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर.एफ. नरीमन, न्या. ए.एम. खानविलकर, न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे. त्यातील दोन न्यायमूर्तींच्या असहमतीनंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय ३-२ मतांनी घेण्यात आला. सगळ्या पुनर्विचार याचिकांवर आता सुनावणी घेण्यात येईल. सर्वच स्त्रियांना, सगळ्या धर्म व जातीतील स्त्रियांना मासिकपाळी येते हे नैसर्गिक सत्य आहे. परंतु तरीही काहींची पुरुषी मानसिकता जोरकसपणे स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करते. काहींनी तर स्त्रियांनी मंदिर प्रवेशासाठी आग्रह धरण्याऐवजी मंदिरात जाणेच बंद करावे, असे मत मांडले. पण प्रवेश आहे तरीही न जाण्याचा निर्णय घेणे वेगळे आणि स्त्रियांना प्रवेशच देणार नाही, असे म्हणणे यात अधिकारकेंद्रित दृष्टिकोनाचा फरक आहे.महिलांबाबत दुजाभाव करून त्यांच्या आत्मसन्मानाला कमी लेखणे योग्य नाही. संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार सर्वजण समान आहेत. महिलांनासुद्धा पूजेचा समान अधिकार आहे. श्रद्धेच्या नावावर कुणाशीही लिंगभेद केला जाऊ शकत नाही. शबरीमलामधील परंपरेला धर्माचे अभिन्न अंग मानता येणार नाही. सर्वांना समानतेने वागणूक देणे हे कायदा आणि समाजाचे काम आहे, असे पाचपैकी चार न्यायाधीश म्हणत असताना त्यापैकी स्त्री न्यायाधीश असलेल्या न्या. इंदू मल्होत्रा यांनी मात्र वेगळा राग आळवला होता की, धार्मिक परंपरांमध्ये कोर्टाने हस्तक्षेप करू नये, प्रथा रद्द करणे हे कोर्टाचे काम नाही. या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद करून ठेवले. या प्रथांना संविधानाचे संरक्षण आहे.

समानतेच्या अधिकाराचा विचार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासोबत एकत्रितपणे केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. अनेक पुनर्विचार याचिका दाखल झाल्याने आता न्या. इंदू मल्होत्रा यांनी मांडलेल्या वेगळ्या मतांनाही विचारात घेतले जाईल. त्यामुळेच लढाई संपली नसून आता नव्याने सुरू झाली आहे. धर्मांध रूढी, परंपरा झुगारून देण्याच्या अशा लढाया महाराष्ट्रातील काळाराम मंदिर, पंढरपूरचे मंदिर, शनी-शिंगणापूर येथे आपण पाहिल्या आहेत. शबरीमला मंदिराच्या निमित्ताने आता हा विषय सगळ्याच धर्मांच्या प्रार्थनास्थळांना लागू होणारा निर्णय होण्यात परावर्तित होण्याची शक्यता आहे.अनेक पुनर्विचार याचिका दाखल झाल्याने घटनेतील अनुच्छेद १३७ नुसार त्या सगळ्या याचिका ऐकता येतील का, हा प्रक्रियेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर होता तसेच यापूर्वी ७ न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिलेला शिरूर मठ (१९५४) केसमधील निकाल तसेच पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दरगाह कमिटी अजमेर (१९६२) या केसमधील निर्णय वेगळाच दृष्टिकोन मांडणारे आहेत. त्यात धार्मिक प्रथा-परंपरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केला नव्हता. आणि म्हणून न्यायालयाने कमलेश मेहता या २0१३ मध्ये निकालात लागलेल्या रिव्ह्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना असलेल्या केसचा संदर्भ घेतला. एखाद्या प्रकरणाच्या निर्णयातून न्यायाशी प्रतारणा होत असेल तर पुनर्विचार करता येतो आणि म्हणून शबरीमला प्रकरणसुद्धा आता ७ न्यायमूर्तींच्या न्यायपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे हे एक कारण आहे. मुस्लीम महिलांना दर्गा व मशिदीमध्ये प्रवेश असावा, पारशी नसलेल्या पुरुषाशी लग्न केलेल्या पारशी स्त्रीला पवित्र अग्नी असलेल्या अग्यारीत प्रवेश मिळावा, दाऊदी बोहरा समाजात स्त्रियांचे जननेंद्रिय कापणे अशा प्रथा धर्मपालनासाठी आवश्यक आहेत का व तसे करणे धर्माचा अविभाज्य भाग आहे का, यावरही आता व्यापक निर्णय अपेक्षित आहे.
घटनेतील कलम २५ नुसार असलेले धर्मस्वातंत्र्य व कलम १४ नुसार विषमताविरहित जीवन जगण्याचा हक्क या मूलभूत हक्कांचा निवाडा होणार असताना आता एक कायदेशीर प्रश्न विनाकारण उपस्थित होणार आहे की, ज्या प्रकरणांत कायद्याच्या संदर्भातील भरीव मुद्दा उपस्थित केला गेला असेल ती केस पाच न्यायाधीशांच्या समक्ष चालवावी. मग शबरीमलाची केस जर आधीच पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठाने निकालात काढली होती तर ती पुन्हा सात न्यायाधीशांच्या न्यायपीठापुढे का लावण्यात आली? संविधानातील १४५ (३) नुसार हे योग्य झाले का, अशी चर्चा आता टाळता येणार नाही. अनेक कायदेशीर प्रक्रिया, न्यायाधीशांचे निवृत्त होणे, पुन्हा खंडपीठ गठित होणे अशा अनेक प्रक्रिया होतील व त्याला काही वर्षे लागतील. महत्त्वाची बाब इतकीच की सुदैवाने शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश द्यावा, या आधीच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिल्याचे नमूद केलेले नाही. परंतु स्त्रियांना बंदी असावी असे वाटणारे याबाबत स्पष्टता मागू शकतात व सगळ्या याचिका प्रलंबित आहेत तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालावर स्थगिती द्यावी, अशी मागणी करू शकतात. आधुनिकता जिंकेल, बुरसटलेले विचार हरतील इतके मात्र नक्की.(संविधान विश्लेषक आणि मानवी हक्क भाष्यकार)

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिर