प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक) -हे होणारच होतं आणि तसंच ते व्हावं, अशी हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा होती. अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं हिंदुत्ववाद्यांची ही अपेक्षा पुरी केली आहे.‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ २१ जून रोजी पाळण्याचा मोदी सरकारचा निर्णय म्हणजे ब्राह्मण धर्म व वैदिक संस्कृती देशावर लादण्याचा प्रयत्न आहे आणि देशातील मुस्लिमांनी या प्रयत्नांपासून सावध राहावं’, अशा आशयाची प्रतिक्रि या या बोर्डाच्या एका मौलवीनं दिली आहे.साहजिकच आता वादाला तोंड फुटलं आहे. योग हा हिंदू धर्माशी निगडित आहे, की ते एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे हा वाद योगदिन पाळण्याचा निर्णय झाला तेव्हापासून खेळला जात आहे. या वादाला फोडणी दिली गेली, ती ‘ज्यांना हा दिवस पाळायचा नसेल त्यांनी पाकिस्तानात जावं’ या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानं आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे राजपथावर का उपस्थित राहिले नाहीत, या भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी राम माधव यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नामुळं. आता या वादाला धार चढवली जात आहे, ती मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या मतप्रदर्शनानं.असा हा वाद खेळला जाण्यात हिंदुत्ववादी व मुस्लिमांतील पुनरुज्जीवनवादी या दोघांनाही रस आहे आणि या ना त्या प्रकारे हा वाद सतत उफाळत राहणं, आपले हितसंबंध जपले जाण्यासाठी आवश्यक आहे, अशी या दोघांची ठाम समजूत आहे.योगाला पूर्वापार मुस्लिमांचा विरोध होता काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक दस्तऐवज व विविध तज्ज्ञांचं लिखाण आज उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, विल्यम डॅरिम्पल या प्रख्यात इतिहासकारानं ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू आॅफ बुक्स’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकात गेल्या वर्षी मार्च महिन्यात एक प्रदीर्घ लेख काही पुस्तकांच्या परीक्षणाच्या निमित्तानं लिहिला होता. असा लेख लिहिण्याला आणखी एक निमित्त होतं. ते म्हणजे ‘योग : द आर्ट आॅफ ट्रान्स्फॉर्मेशन’ या विषयावरील चित्रांचं एक प्रदर्शन अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या फ्रेअर व सॅकर गॅलरीत त्या वेळी भरलं होतं. नंतर हे प्रदर्शन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्को येथेही भरवलं गेलं. हे प्रदर्शन होतं, गोवर्धन या मुगलकालीन चित्रकारानं काढलेल्या चित्राचं.हा गोवर्धन अकबराच्या गोतावळ्यातील हिंदू स्त्रीच्या पोटी जन्माला आला होता. तरुण वयातच त्याच्या हातात असलेल्या कलेची चुणूक बघायला मिळाली होती. अकबराचा मुलगा राजपुत्र सलीम, म्हणजे नंतरचा सम्राट जहांगीर, हा जेव्हा प्रयागल - आजचं अलहाबाद.. आपलं बस्तान बसवत होता, तेव्हा हा गोवर्धन तेथे होता आणि त्यानं या काळात योगाविषयक विविध प्रकारची चित्रं चितारली. त्यात वेगवेगळी आसनं करणाऱ्या साधूंपासून ध्यानस्थ बसलेल्या व्यक्ती इत्यादींचा समावेश होता. राजपुत्र सलीमला साधू-बैरागी इत्यादिंविषयी कुतूहल होतं आणि तशी जे काही सांगत असत, ते ऐकून घेण्यात त्याला रस कसा होता, याचं वर्णन डॅरिम्पल यांनी या लेखात केलं आहे.सर्वसंगपरित्याग करणाऱ्यांबद्दल राजपुत्र सलीमला आकर्षण होतं. अर्थात हिंदू तत्त्वज्ञानातील गूढता व सुफींत संप्रदायात दिसून येणारी अपरित्यागाची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टींबाबत जाणून घेण्यात इस्लामी राज्यकर्त्यांना रस होता. हिंदू व मुस्लीम यांच्यात सामंजस्य व सहचर्य असायला हवं, असं मानणारा मध्य आशियातील अभ्यासक अल्बेरूनी यानं पतंजलींच्या योगसूत्राचं पर्शियनमध्ये भाषांतरही केलं होतं. सुफी संत मोइउद्दिन चिस्ती यानंही योगविषयक गं्रथ लिहिला होता. डॅरिम्पल लिहितात की, अकबराचा चरित्रकार अबू फजल हा योगाच्या आसनांमुळं आश्चर्यचकित झाला होता. ‘आपल्या शरीरातील स्नायूंवर इतकं नियंत्रण माणूस मिळवू शकतो, हे आश्चर्यकारक आहे’, असं अबू फजलनं लिहून ठेवल्याचा दाखला डॅरिम्पल देतात. महमद अल ग्वालियारी या सुफी संतानं ‘बहर-अल-हयात’ नावाचा योगाविषयक ग्रंथ लिहिला आणि आपल्या शिष्यांनी योग आसनं करावीत, असा सल्लाही दिला. पुढं राजपुत्र सलीमनं याच ग्रंथात २२ योग आसनांची चित्रं घालून नवी आवृत्ती काढली. ही चित्रं काढण्यात वर उल्लेख केलेल्या गोवर्धन हा तरुण चित्रकार सहभागी झाला होता. या व नंतर याच गोवर्धननं काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे गेल्या वर्षी मार्चमध्ये भरलं होतं.अर्थात हा सगळा तपशील मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डातील मुल्ला - मौलवींना किंवा हिंदुत्ववाद्यांना सांगणं हे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यासारखं आहे. मात्र हा तपशील दर्शवतो की, येथील मुस्लीम राज्यकर्ते व मुस्लीम समाजही हिंदू चालीरीती, संस्कृती याकडं दुष्टाव्यानं बघत नव्हते. उलट त्यापासून काही घेण्याचा प्रयत्न करीत होते. किंबहुना भारतातील हिंदू-मुस्लीम यांच्यात सहजीवन व संघर्ष अशा अनेक चढउताराची पर्वे येत गेली आहेत. संघर्षानंतर सहजीवन अस्तित्वात येत गेलं होतं. खरं तर आज जरुरी आहे, ती अशा सहजीवनाच्या वाटा शोधून संघर्षाच्या वाटा कायमच्या बंद करण्याची.मात्र यात मुस्लिमांतील मुल्ला-मौलवी व त्यांच्या मदतीनं समाजाला वेठीस बांधून ठेवणारे राजकारणी यांना अजिबात रस नाही. उलट अशानं आपले राजकीय हितसंबंध धोक्यात येतील, असं त्यांना वाटत असतं. दुसऱ्या बाजूस हिंदुत्वाच्या विचासरणीचा गाभाच हा एकजिनसी समाजनिर्मितीचा आहे. देश पारतंत्र्यात गेला; कारण हिंदू समाज एकजिनसी नव्हता, याच एकमेव गृहीतावर ही हिंदुत्वाची विचारसरणी उभी आहे. हिंदू धर्मातील बहुविधता व सर्वसमावेशकता हिंदुत्वाला मान्य नाही. नेमकं योगाचं तत्त्वज्ञान हे बहुविधतेच्या संस्कृतीवर आधारलेलं आहे आणि संयम हा त्याचा पाया आहे. हिंदुत्ववादी आज ते डोक्यावर उभं करू पाहत आहेत. मात्र एखादे योगी आदित्यनाथ वा राम माधव हे या प्रयत्नांमागचा खरा उद्देश सांगून टाकत आहेत.