शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मुसलमान

By admin | Updated: September 22, 2014 04:56 IST

‘राष्ट्रीय मुसलमान’ हा शब्द कोठून आला, पहिल्यांदा कोणी कोणाला उद्देशून वापरला, याचा शोध घ्यावा लागेल. एवढे मात्र खरे आहे, की हा शब्द स्वातंत्र्य आंदोलनात वापरला गेला

अमर हबीब - 

एकदा एका प्राचार्यांनी माझी ओळख ‘राष्ट्रीय मुसलमान’ अशी करून दिली. आपण काही चुकीचे करतो आहोत,असे त्यांना अजिबात वाटले नाही. पण मला ते बोचले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही कोणाची राष्ट्रीय मारवाडी, राष्ट्रीय मराठा, राष्ट्रीय ब्राह्मण अशी ओळख करून दिली आहे काय?’ ते माझ्याकडे नुसते पाहत राहिले. हा माणूस असा काय प्रश्न विचारतो, अशी त्यांची मुद्रा झाली. मी म्हणालो, ‘जातीचा विषय तपशिलाचा असल्यामुळे आपण तो सोडून देऊ. तुम्ही कोणाला ‘राष्ट्रीय हिन्दू’ असे कधी तरी संबोधले आहे का?’ ते म्हणाले, ‘नाही.’ मी म्हणालो, ‘मग मलाच ‘राष्ट्रीय मुसलमान’ असे का संबोधले?’ त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.‘राष्ट्रीय मुसलमान’ हा शब्द कोठून आला, पहिल्यांदा कोणी कोणाला उद्देशून वापरला, याचा शोध घ्यावा लागेल. एवढे मात्र खरे आहे, की हा शब्द स्वातंत्र्य आंदोलनात वापरला गेला. पाकिस्तानच्या मागणीला पाीठंबा न देणाऱ्या मुसलमान नेत्यांना उद्देशून तो वापरला जायचा. हा नेता मुसलमान असूनही पाकिस्तानचे समर्थन करीत नाही, असे सांगण्यासाठी ही शब्दयोजना केली जायची. त्याकाळात ते योग्य होते की नाही, हे मला सांगता येणार नाही. परंतु, देशाला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्षे झाल्यानंतरही तो शब्द जर वापरला जात असेल, तर त्या अनुषंगाने विचार करणे आवश्यक होऊन जाते.या देशात हिंंदू घरात जन्म घेतला, तर त्याला आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याची गरज नाही. त्याच्याकडे जन्मजात राष्ट्रीयत्व येते. परंतु एखादा जर मुसलमान घरात जन्मला, तर त्याला मात्र आपली देशभक्ती सिद्ध करावी लागते. हे दुर्दैवी वास्तव आजपर्यंत टिकून आहे. माझ्यासारख्या मुसलमान कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीवर हा अतिरिक्त भार असतो. एका सार्वजनिक कवी संमेलनात एक मुस्लिम शायर भाग घेणार होता. माझ्याकडे आला व त्याने मला विचारले की, ‘मी कोणत्या कविता सादर केल्या पाहिजेत.’ मी म्हणालो, ‘तू चांगल्या कविता लिहितोस, कोणत्याही म्हण.’ त्याच्या प्रश्नाची खोच माझ्या लक्षात आली नव्हती. मी त्या छोट्या कवी संमेलनात पाहिले की, मुसलमान कवी आवर्जून देशभक्तीच्या कविता सादर करीत होते. या मित्रानेही इतर कवितांसोबत एक देशभक्तीची कविता सादर केलीच. तो पुन्हा भेटल्यावर त्याला विचारले, ‘उर्दू शायर सोडले, तर इतर दुसऱ्या कोणीच देशभक्तीपर कविता सादर केल्या नाहीत, हे तुझ्या लक्षात आले का?’ तो म्हणाला, ‘त्यांचे कसेही भागून जाते, आम्हाला तसे करून चालत नाही.’ आपल्या देशभक्तीवर कोणी शंका घेऊ नये, यासाठी त्याला सतर्क राहणे भाग पडावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?परवा नरेंद्र मोदींनी मुसलमानांना प्रमाणपत्र दिले की, ते या देशासाठी जगतात आणि मरतात. एका समाज समूहाला अशाप्रकारचे प्रमाणपत्र का द्यावे लागले? नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिमेची काळजी असणे समजून घेता येईल, पण त्यासाठी त्यांनी इतरांच्या प्रतिमेचे धिंंडवडे काढावेत का? जेव्हा तुम्ही इतर कोणाच्याच देशभक्तीबद्दल बोलत नसता व विशिष्ट लोकसमूहाबद्दलच विधान करीत असता, तेव्हा तुम्ही त्या समूहाला संपूर्ण समाजाचा घटक मानायला तयार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.माझा जेवढा संबंध मुसलमानांशी आहे तेवढाच अन्य धर्मीयांशी. देशभक्तीच्या प्रमाणाबद्दल बोलायचे, तर दोघांत तोळा-माशाचासुद्धा फरक नाही. येथून तेथून सगळे सारखे आहेत. आपल्या अवतीभोवती पोटासाठी जगणारे लोक सर्वाधिक आहेत. शेतीवर जगणारे हिंंदू असो की मुसलमान त्यांच्या विवंचना सारख्याच आहेत. त्यांना तुमच्या वादांशी काही देणे-घेणे नाही. दुबळ्या समाजांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी सरकार लोकाभिमुख असायला हवे. दुर्दैवाने असे सरकार आमच्या देशात निर्माण झाले नाही. सत्तेच्या साठमारीत गुंड-पुंडांचीच चलती राहिली आहे. मतांचे गठ्ठे लाटण्यासाठी एकाने द्वेष निर्माण करायचा व दुसऱ्याने तो जोपासायचा, असाच जीवघेणा खेळ चालत राहिला. राजा कोणीही आला तरी तो आम्हाला लुटणारच, छळणारच. असा अनुभव येत गेला. पाठीवर जखम असलेला प्राणी कितीही बलदंड असला, तरी रानातील मोकाट कावळे त्याच्या पाठीवर बसून जखमेवर चोचा मारतात. विकासकुंठीत झालेल्या भारतीय समाजाच्या पाठीवरील जखमेवर विविध रंगांचे जातीयवादी आणि धर्मवादी कावळे येऊन चोचा मारीत राहिले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेवर भाष्य करताना महात्मा जोतिबा फुलेंनी सांगितले होते, की राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकमयलोक असायला हवे. आपल्या देशात ते कोठे आहे? महात्मा गांधींनी पहिल्यांदा ‘एकमयलोक’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास दुसरे तिसरे काही नसून ‘एकमयलोक’ निर्माण करण्याचा अभूतपूर्व प्रयत्न होता. ते काम अधुरे राहिले. इंग्रजांची सत्ता जाताच गांधीजींचा खून झाला. मुसलमानांचा कैवार घेण्याचा आव आणणारे आणि मुसलमानांवर वार करणारे मूठभर हितसंबंधी आहेत. वाचाळवीर आहेत. त्यांना ना हिंंदू समाजाची कणव आहे ना मुसलमान समाजाची. एकमेकांच्या डोळ्यांत संशयाची धूळ उडवून देण्याचा खेळ ते खेळीत आहेत. अशा धुरवळीत शब्दांचे संदर्भ बदलून जातात हे मला ‘राष्ट्रीय मुसलमान’ म्हणणाऱ्याच्या लक्षातही येत नाही.