- राजा मानेराणेंची धाडसी कृती नेहमीच वादग्रस्त तरीही कौतुकास्पद ठरते... पण त्यांचे ‘टायमींग’ चुकते! आता शेतकऱ्यांच्या संघटनांना त्यांनी दिलेली हाक मात्र अचूक टायमिंगची ठरू शकते! त्यांच्या हाकेला रघुनाथदादा पाटील यांच्यापासून ते ‘धरणातील पाणीफेम’ भैय्या देशमुख, संजय पाटील-घाटणेकर आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटनांचे नेते सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात.नारायण राणे यांचा आक्रमक बाणा, धडाडी आणि त्यांची तशीच कार्यपद्धती महाराष्ट्राला नवी नाही. पण त्यांच्या कृतींचे ‘टायमींग’ मात्र नेहमीच चुकते! त्याची पुरेपूर राजकीय किंमत वेळोवेळी चुकती करण्याची पाळी त्यांच्यावर आली.उदाहरणादाखल अगदी सोनिया गांधी, विलासराव देशमुखांच्या विरोधातील बंडापासून ते थेट अलीकडच्या मुंबईतील वांद्रे पूर्व पोट निवडणुकीतील त्यांच्या पराभवाच्या घटना घ्या. त्यांच्या प्रत्येक कृतीतील धाडस-धडाडी कौतुकास्पद होती, पण ‘टायमींग’ मात्र सपशेल चुकीचेच! आपण म्हणाल राणे, त्यांचा राजकीय प्रवास आणि टायमींग हा विषय अचानक कशासाठी? परवा ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी पंढरपुरात घेतलेल्या दूध व ऊस परिषदेत ते सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या एका संघटनेच्या व्यासपीठावरील त्यांचा सक्रीय सहभाग हा खरा औत्सुक्याचा विषय होता. फडणवीस सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, प्रशासकीय पातळीवरील उदासीनता, राज्यात २२०० शेतकऱ्यांनी आणि सोलापूर जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्या आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी उजनी धरणात सोडण्यासंदर्भात पेट घेऊ पाहत असलेला वाद या परवलीच्या विषयांवर अपेक्षेप्रमाणे खास राणे शैलीत ते परिषदेत बोलले. त्यांच्या भाषणात खरा कळीचा मुद्दा आला तो राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध संघटनांबद्दलचा! खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सदाभाऊ खोत यांना लाल दिव्याच्या गाडीत बसविण्याच्या तयारीत आहे. शरद जोशी यांची संघटना सरकारच्या विरोधात किती आक्रमक बनणार हे कोडे काळच सोडवू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा खरा वाली कोण, या प्रश्नाचे उत्तर सर्वच आघाड्यांवर मेटाकुटीला आलेला शेतकरी शोधतो आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी नेमकी नाडी पकडण्याची चतुराई आपल्या भाषणात दाखविली. राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात आवाज उठवावा, अशी हाक देतानाच आपली पूर्ण शक्ती या संघटनांच्या पाठीशी उभी करण्याचा शब्दही त्यांनी दिला. राणेंच्या हाकेला अनेक पदर आहेत. त्याचे राजकीय अर्थ काहीही असले तरी त्यांचे यावेळचे ‘टायमींग’ मात्र अचूक आहे, असेच म्हणावे लागेल. खरीप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिला. आता चार-पाच दिवसात अवकाळी पाऊस न पडल्यास रब्बी हंगामही शेतकऱ्यांना रडविण्याच्या बेतात दिसतो.सर्वसामान्य शेतकऱ्याला खात्रीने चार पैसे देणारे पीक म्हणून ऊसाचे महत्त्व आहे. पाण्याअभावी राज्यातील तब्बल ४० टक्के ऊस जळून गेला आहे. यावर्षी राज्यात ५६ साखर कारखान्यांचे धुराडे पेटले. त्यापैकी २४ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. आज ऊसाच्या दराचे नावही घ्यायला कोणी तयार नाही. अशा वेळेला शेतकऱ्यांचा कैवार घेऊन सरकारशी दोन हात कोण करणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरतो. सरकारमधील खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या आक्रमकतेला किती धार असणार, अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असताना शेतकऱ्यांच्या संघटनांना राणे यांनी अचूक वेळी दिलेली हाक महत्त्वाची वाटते. या हाकेला रघुनाथदादा पाटील यांच्यापासून ते ‘धरणातील पाणीफेम’ भैय्या देशमुख, संजय पाटील-घाटणेकर आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटनांचे नेते सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात. तसे घडल्यास एकत्रित येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना व राणेंचे बळ अडचणीतल्या बळीराजासाठी तारणहार ठरेल काय, हे काळच ठरवेल.
नारायण राणे यांचे ‘टायमींग’
By admin | Updated: November 20, 2015 03:15 IST