अतुल कुलकर्णी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याविषयी ‘बाथरूममें रेनकोट पहेन कर के नहाना, ये कला तो डॉक्टर साहब ही जानते है...’ असे विधान केले. पंतप्रधानपद भूषविणाऱ्या मोदींकडून ही अशी अत्यंत खालच्या पातळीवरची तुलना केली गेल्याने मोदींचीच त्यातून अप्रतिष्ठा झाली आहे.विरोधकांचे काम टीका करण्याचे असते. त्यानुसार काँग्रेसने राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका केली. ती करत असताना त्यांनी लूट... कुत्रे यासारख्या शब्दांचा वापर केला. तुम्ही बोलता, तेव्हा आम्ही ऐकून घेतले तर मग आता मी असे शब्द वापरले, तर तुम्हाला का राग यावा? असा सवाल मोदींचा होता. या सगळ्यात कोण खरे, कोण खोटे हा प्रश्न महत्त्वाचा नाही. पण देशाच्या पंतप्रधानांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, या तारतम्याचा इथे भंग झाला आहे. एखाद्या प्राण्याने आपला चावा घेतला तर आपण त्याला चावायला जात नाही. हा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, तो उगाच नव्हे!कोणी कोणत्या पदावरून काय बोलावे, हा ज्याच्या त्याच्या वकुबाचा आणि बुद्धीचा प्रश्न आहे. काँग्रेसतर्फे जी काही भाषणे केली गेली, त्यांनी जी काही विधाने केली, त्याची शिक्षा त्यांना सव्वाशे कोटीच्या देशाने दिली. त्यांना सत्तेबाहेर बसवले आणि मोदी नक्कीच काहीतरी चांगले कराल, असा विश्वास वाटला. मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ घोषणेवर लोकांची श्रद्धा बसली. त्यांच्या हेतूंविषयी लोकांच्या मनात शंका आल्या नाहीत. त्यामुळेच जनतेने मोदींना निवडून दिले. त्यांच्या या विश्वासाला, श्रद्धेला आणि उद्देशाला तडा जाऊ देण्याचा अधिकार मोदी यांनाही नाही. कारण मोदी यांच्यावर कोणी किती प्रेम करावे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना मुळीच नाही.मोदीजी, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आपण पंतप्रधान आहात. त्यामुळे आपण अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. आपणही विरोधकांसारखीच भाषा वापरू लागलात, तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहील?डॉ. मनमोहनसिंग हे आपल्या देशाचे भूषण आहे. राजकारणी म्हणून नव्हे, तर अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही अवघे जग त्यांना ओळखते. देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी जवळपास ३० ते ३५ वर्षे दिली आहेत. एखाद्या व्यक्तीने एवढी वर्षे देणे आणि त्यातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे ही सोपी गोष्ट नाही. जगात मंदीची लाट आली पण भारताचा विकासदर कमी न होता वाढला होता. हे शक्य झाले डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान म्हणून आखलेल्या धोरणांमुळे. त्यांनी जी दिशा दिली त्याच्या विरुद्ध वागण्याचे धाडस बहुमत असतानाही गेली तीन वर्षे आपल्या सरकारला शक्य झालेले नाही. यावरून त्यांच्या धोरणांची महती लक्षात यावी. सगळा देश आणि जग डॉ. मनमोहनसिंग यांच्याविषयी काय बोलतो, त्याचा तुमच्या टीमला अभ्यास करायला सांगा. नोटाबंदीनंतर डॉ. मनमोहनसिंग हे फारतर दहा मिनिटे बोलले. पण ते जे काही बोलले, त्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता. वास्तवाची कटू जाणीव होती हे आपण जाहीरपणे मान्य करणार नाही, कारण आपला तो स्वभाव नाही...!रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना लोकसभेच्या लोकलेखा समितीने बोलावले आणि काही प्रश्न विचारले. त्यातले काही प्रश्न अत्यंत अडचणीचे होते. ज्याची उत्तरे देण्याची सक्ती पटेल यांच्यावर झाली असती, तर देशाची अब्रू वेशीला टांगली गेली असती. जगात आपल्या वाट्याला वाईटपणा आला असता, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर राहिलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी पटेल यांना उत्तर देण्याची तुमच्यावर सक्ती नाही, असे सांगितले होते. देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम याच रेनकोट घालून अंघोळ करणाऱ्या मनमोहनसिंग यांनी हे महत्त्वाचे काम केले, ही गोष्ट तुम्ही कसे काय विसरलात?भाजपाचेच लोकसभेतील उपनेते असणारे गोपीनाथ मुंडे यांनी काही आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण लोकसभेच्या उपनेत्यांना अशा पद्धतीने आपल्या पक्षात घेणे योग्य नाही, ते संसदीय परंपरांना धरून नाही असे सांगून मनमोहनसिंग यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आपल्या पक्षात राहिले. अशा स्वभावगुणांची माणसे पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडची असतात. ती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायची असतात. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अमर्त्य सेन, मनमोहनसिंग ही केवळ चालती बोलती माणसे नव्हती आणि नाहीत. अशा व्यक्ती आपल्या देशाची संपत्ती आहेत. मात्र त्यांच्यावर आपण असे अत्यंत हिणकस आरोप करणार असू, भ्रष्टाचारी नेत्यांच्या मध्ये राहून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डागही नाही, हे कौतुकाने सांगण्यासाठी ‘बाथरूममध्ये रेनकोट घालून नाहण्याची कला’ अशा विशेषणांनी त्यांनी तुलना करणार असू, तर त्यातून मोदीजी तुमची प्रतिष्ठा वाढणार नाही, उलट डॉ. मनमोहनसिंग यांचीच इज्जत वाढली आहे. याच मनमोहनसिंग यांनी ‘तुमच्या विधानावर मला यावर काही बोलायचे नाही’, असे सांगून पुन्हा तुम्हालाच अभय दिले आहे!
मनमोहनसिंगांचीच प्रतिष्ठा अधिक वाढली !
By admin | Updated: February 10, 2017 02:32 IST