नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी जो सूट परिधान केला होता, तो आधुनिक इतिहासात फार बारकाईने बघितलेली वस्तू ठरला आहे. एखाद्या चाहत्याने नरेंद्र मोदींचे नाव अंकित केलेला सूट त्यांना भेटीदाखल दिला असता, त्यांनी तो का घ्यावा, असा प्रश्न टेलिव्हिजनवरील चर्चेत आणि घरोघरीसुद्धा विचारण्यात येत आहे. त्यांनी असा सूट सरकारी कार्यक्रमात परिधान करणे योग्य होते का? असा सूट घेतल्यावर त्यांनी त्याचा लिलाव करणे योग्य होते का?‘बिझिनेस स्टॅन्डर्ड’ नियतकालिकाने नमूद केले आहे की मोदींच्या पूर्वी पंतप्रधानपदी असलेल्यांनीही त्यांना मिळणाऱ्या भेटवस्तू स्वीकारल्या होत्या. माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती अशी की, डॉ. मनमोहनसिंग यांनी जेव्हा पंतप्रधानपद सोडले तेव्हा त्यांना पंतप्रधान या नात्याने मिळालेल्या १०१ वस्तू त्यांनी आपल्यासोबत नेल्या होत्या. त्यात एक म्युझिक सिस्टिम, एक रिस्ट वॉच आणि काही टी सेट्सदेखील होते.राजकारणी व्यक्तींनी त्यांना भेटीदाखल मिळणाऱ्या वस्तू स्वत:कडे ठेवून घेतल्याचा इतिहास हा फार जुना आहे. जुनी कागदपत्रे हाताळताना आंध्रचे काँग्रेस नेते टी. प्रकाशम यांना १९४०साली भेटीदाखल मिळालेल्या वस्तूंची यादी माझ्या हाती लागली. त्या वस्तू निरनिराळ्या व्यक्तींकडून, बार असोसिएशन्स आणि नेल्लोर, विशाखापट्टणम्, राज महेन्द्रीच्या मर्चन्ट्स चेम्बरकडून मिळाल्या होत्या. मद्रास प्रेसिडेन्सीतील तेलुगु भाषिक प्रदेशात टी. प्रकाशम हे हिरो म्हणून ओळखले जात होते. त्यांचे चाहते त्यांना ‘आन्ध्र केसरी’ म्हणायचे.प्रकाशम यांनी त्यांना मिळणाऱ्या वस्तू स्वत:कडे ठेवून घेतल्या याचे पक्षनेत्यांना विशेषत: वल्लभभाई पटेल यांना वैफल्य वाटायचे. फेब्रुवारी १९४६मध्ये वल्लभभाई पटेल यांनी प्रकाशम यांना पत्र लिहून, त्यांना मिळणारा निधी पक्षाकडे जमा केला किंवा नाही याबद्दल विचारणा केली. त्यावर प्रकाशम यांनी कळविले की त्यांना पक्ष कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या थैल्या किंवा वस्तू या त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल दिल्या होत्या. त्यावर ‘‘या तऱ्हेने सार्वजनिकरीत्या मिळणाऱ्या थैल्यांचा वापर स्वत:साठी करणे हे काँग्रेस नेत्यांना शोभत नाही’’ असे त्यांना सांगण्यात आले.वल्लभभाई पटेल यांनी हा सगळा पत्रव्यवहार महात्मा गांधींना दाखविला. त्यावर महात्मा गांधींनी प्रकाशम यांना कळविले की, ‘‘प्रकाशम यांनी आपल्या कृतीने लोकांसमोर चुकीचा आदर्श ठेवला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, हा प्रकार जर वाढतच राहिला, तर सार्वजनिक जीवनातील पावित्र्य संपुष्टात येईल. लोकांच्या उपयोगासाठी निधी उभारणे मी समजू शकतो. जसे, असहकाराच्या चळवळीत भाग घेऊन ज्यांनी वकिली करणे सोडून दिले होते त्यांना मदत म्हणून निधी उभारणे मी समजू शकतो. पण हा निधी स्वत:कडे ठेवून घेण्याचे मी केव्हाही समर्थन करू शकणार नाही.’’ गांधींनी प्रकाशम यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी आपल्या कृतीने सार्वजनिक जीवनाला बट्टा लावला.म. गांधींच्या या पत्रावर प्रकाशम यांनी स्वत:च्या कृतीचे समर्थन करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले की, ‘‘पूर्ण वेळ राजकारणात राहणारी व्यक्ती कोणतीही पगारी नोकरी स्वीकारू शकत नाही. त्याला लोकांकडून मिळणाऱ्या निधीवरच गुजराण करावी लागते. लोकसुद्धा सामूहिकरीत्या पैसा जमा करून, स्वत:ची कृतज्ञता व्यक्त करीत असतात. त्यांनी पुढे लिहिले होते की, माझ्या साध्या साध्या गरजा पूर्ण करून सार्वजनिकरीतीने मिळालेल्या पैशातील उर्वरित रक्कम योग्यवेळी राष्ट्रार्पण करण्यात येईल आणि योग्य हातात सोपविण्यात येईल.’’प्रकाशम यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वत:च्या देशभक्तीचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिले, ‘‘माझे देशाविषयीचे प्रेम माझे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रेरणादायक ठरत असते. माझ्या रक्तातूनच देशभक्तीचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण आन्ध्रात लोक माझे स्वागत करण्यासाठी धावत असतात. माझ्या हजारो चाहत्यांच्या भावनांकडे मी कसा दुर्लक्ष करू शकेन! त्यांचे खेड्यापाड्यातून आणि मोठमोठ्या शहरातूनसुद्धा माझ्याविषयीचे प्रेम ओथंबून वाहात असते. लोकांना माझ्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा आणखी कोणता पुरावा हवा?’’प्रकाशम यांच्या उत्तरात त्यांनी महात्माजींनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा डावलला होता. त्यांनी व्यक्ती आणि पक्ष यांच्या रेषा धूसर केल्या. म्हणून गांधींनी त्यांना सांगितले की, त्यांना मिळालेल्या भेटींचा लेखाजोखा त्यांनी लेखी स्वरूपात सादर करावा. त्यानंतर एप्रिल १९४६मध्ये प्रकाशम यांनी म. गांधी आणि पटेल यांची भेट घेतली आणि स्वत:ला मिळालेल्या पैशापैकी काही पैसा त्यांनी पक्षाकडे जमा केला. त्यामुळे म. गांधींचे पूर्णपणे समाधान झाले नाही. त्यांनी प्रकाशम यांना लिहिले की, त्यांना आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होत असेल तर त्यांनी पदांचा त्याग करावा. त्यांनी पुढे नमूद केले की सार्वजनिक क्षेत्रात शांतपणे काम करण्यासाठी खूप वाव आहे. प्रकाशझोतात काम करण्यापेक्षा अशातऱ्हेने केलेली सेवा अधिक मोठी असते.पण हे करण्याची प्रकाशम यांची तयारी नव्हती. उलट त्यांनी एप्रिल १९४६च्या अखेरीस मद्रास प्रेसिडेन्सीचे पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला.नरेंद्र मोदींना टी. प्रकाशम हे फार मोठे वाटणार नाही. त्यामुळे त्यांनी म. गांधी व पटेल यांच्या नावाशी स्वत:चे नाव जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपल्या भाषणात मोदी हे नेहमी गांधी आणि पटेल यांची तारीफ करीत असतात. त्यांनी सरदार पटेल यांचा खूप मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. तसेच महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिनी त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.माझ्या लेखात जी पत्रे मी उल्लेखिली आहेत त्यावरून भेटवस्तू स्वीकारण्याच्या बाबत मोदी हे प्रकाशम यांच्या म्हणण्याचा पाठपुरावा करीत आहेत असेच दिसते. पण गांधी आणि पटेल हे जर आज अस्तित्वात असते तर त्यांनी मोदींनी सूटचा स्वीकार करणे अमान्य केले असते. कारण त्यांनी आपल्या भेटीचे प्रदर्शन केले म्हणून नाही तर सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीने व्यक्तिगत भेटीचा स्वीकार करणे योग्य नाही. सूटचा लिलाव करून उद्योगपतींनी एकापेक्षा एक वरचढ बोली लावून त्यांच्या हिरोने एकदा परिधान केलेल्या सूटविषयी प्रेम दाखवणे गांधी व पटेल या दोघांनी मान्य केले असते याची कल्पनाही करवत नाही.तथापि पंतप्रधानांचे चाहते स्वत:चा बचाव करण्यासाठी एक युक्तिवाद करतील की लिलावात बोली लावून त्यांनी देशाविषयी तसेच मोदींविषयी वाटणारे स्वत:चे प्रेमच व्यक्त केले होते !रामचन्द्र गुहा(विचारवंत इतिहासकार)
महात्मा गांधी, पटेल आणि मोदींचा सूट
By admin | Updated: March 5, 2015 22:46 IST