शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संवेदना जागवूया, चला माणूस होऊया...

By किरण अग्रवाल | Updated: August 14, 2022 11:42 IST

Let's be sensible, let's be human $ निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते.

- किरण अग्रवाल 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया...

 काळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार? निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.

 राग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे... असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार? तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे?

 सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.

 या सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय? दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे...चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.