शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संवेदना जागवूया, चला माणूस होऊया...

By किरण अग्रवाल | Updated: August 14, 2022 11:42 IST

Let's be sensible, let's be human $ निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते.

- किरण अग्रवाल 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया...

 काळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार? निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.

 राग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे... असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार? तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे?

 सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.

 या सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय? दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे...चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.