मुख्यमंत्री मुफ्ती मुहंमद सईद मुंबईच्या भरवशावर सहा ते सात हजार कोटी रूपयांची तजवीज करायला निघाले, म्हणजे ४६ हजार कोटींच्या जम्मू-काश्मिरच्या अर्थ संकल्पात त्यांना दहा टक्क्यांची मराठी शीग हवी आहे.देशाला भुरळ काश्मिरची आणि काश्मिरला भुरळ मुंबईची अशी गत झाली आहे. देवदार-चिनारची उंच उंच झाडं, निरागस माणुसकीचा ऊबदारपणा, स्वच्छ रुणझुणत्या नद्या, मनाळा मोहून घेणारं हिरवंगार नजकतीचं सौंदर्य रूपेरी पडद्यावर कित्येक दशके अनुभविलं. ‘मै और मेरी तनहाई’ पासून ‘कबिरा मान जा’पर्यंतच्या गितांनी मने चिंब केली! निर्माते व ताऱ्यांचे खिसे भरले, पण या लकाकीमुळे काश्मिरच्या गंगाजळीत वाढ मात्र झाली नाही. मुख्यमंत्री मुफ्ती मुहंमद सईद म्हणालेही, ‘दिसते ते खपतेच असे नाही!’ एवढ्या एका वाक्यावर ते मुंबईच्या भरवशावर सहा ते सात हजार कोटी रूपयांची तजवीज करायला निघाले आहेत. म्हणजे ४६ हजार कोटींच्या जम्मू-काश्मिरच्या अर्थसंकल्पात त्यांना दहा टक्क्यांची मराठी शीग हवी आहे. मुकुटमणी वगैरे कितीही म्हणत असलो तरी दहशतवादाच्या गर्द छायेत सापडल्याने त्या राज्याच्या आर्थिक स्थैर्यात बदल झालेला नाही. काश्मिरींना आता आर्थिक स्थैर्य हवे आहे. मुफ्ती सरकार राजकीयदृष्ट्या कितीही कोलांटउड्या मारीत असले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही, हे त्यांनाही उमगते. त्यामुळे एका भल्या पहाटे मुफ्तीसाहेब जागे झाले. त्यांना ट्युलिपच्या ओसाड बागा दिसल्या. रिकाम्या बोटहाऊसेस डोळयांना खुपल्या. हॉटेले चाळीस टक्के रिकामी असल्याचे त्यांना सांगितले गेले. वाहनमालकांचे हप्ते थकल्याचे चित्र त्यांना अस्वस्थ करुन गेले. राजकीय जोर कितीही असला किंवा सत्ता हाती आली असली तरी हे सारे चित्र बदललेच पाहिजे, हे कोणत्याही राज्यकर्त्याला वाटणे स्वाभाविक आहे. तुडुंब भरलेला जम्मू काश्मिरचा खजिना रीता होतो आहे. तो भरण्याचे कोणतेच चिन्ह दृष्टीपथात नाही. पर्यटन कोमेजून गेले! मग करणार तरी काय? सईद यांनी भाजपाचे कंकण बांधले असल्याने त्यांना मदतीची रसदही भाजपाच पुरवणार हेही स्पष्ट आहे. पंतप्रधानांना विश्वासात घेऊन त्यांनी पहिली साद महाराष्ट्राला घातली! बॉलीवूडशिवाय पर्याय नसल्याने तेथील ताऱ्यांना काश्मिरचे ब्रँ्रॅड अॅम्बॅसडर होण्याची गळ घातली. बॉलिवूडच्याच भाषेत सांगायचे तर त्यांना सुरुवातीला कुणीच ‘घास’ टाकली नाही. आघाडीच्या ५० तारे तारकांना त्यांनी मुंबईत भेटीला बोलविले, मोजून १३ आले. प्रश्न पैशांचा होता. बैठकीनंतर पैसा सोडणार म्हटल्यावर आता त्यांच्याकडे रांग लागली. मुंबईची भेट फिस्कटली म्हणून काहींनी त्यांना काश्मिरात गाठले. या ताऱ्यांंच्या एकेक मागण्या चांगल्याच मनोरंजन करणाऱ्या आहेत. कन्येसह भेटलेल्या एका मोठ्या नटीने अट घातली की आमच्यापैकी एक इथे चित्रित होणाऱ्या चित्रपटात असेल तरच चित्रिकरणाला परवानगी दिली जावी. एका मोठ्या नटाने सांगितले, काश्मिरचा जराही भूभाग दिसला तरी त्याला रॉयल्टी लावून निम्मी रक्कम मला मिळावी. दहशतवाद्यांनी धमक्या दिल्या व करार मोडायची वेळ आली तर रक्कम परत मिळणार नाही. एकीने पद्म पुरस्काराचे समीकरण लावून पाहिले. ईलाज नसल्याने मुफ्तींनी सारेच ऐकून घेतले. आता अनुपम खेर, ऋषी कपूर, इरफान खान, करिना, राणी, मल्लिका, कंगना अशा साऱ्यांनीच इच्छा प्रकट केली. ही एक ताजी बाजू असली तरी एकेकाळी काश्मिरात असंख्य हिंदी चित्रपटांचे शूटिंग होत असे. ती संख्या आता बोटावर मोजता येते. दहशती गटांनी चित्रपट निर्मात्यांना धमक्या दिल्या, अभिनेत्र्या घालत असलेल्या कपड्यांनाही दहशतवाद्यांचा आक्षेप असायचा. सीमापार संबंध जोडले गेले. यातून जम्मू काश्मिरला मिळाले काय? दैन्य व दु:ख! या राज्याचे एकूण बजेट ४६ हजार कोटींचे आहे. यंदाची तूट साडेचार हजार कोटींची असली तरी प्रत्यक्षात ११ हजार कोटींनी महसूल घटला. मुंबईच्या भरवशावर ६१०० कोटी रूपये मिळायचे. मुंबई व महाराष्ट्रातून पर्यटन व चित्रीकरणासाठी जाणाऱ्या संख्येत ४५ टक्के घट झाली. उलट काश्मिरातून मुंबईत सव्वा लाख नागरिक आले. मुफ्तींनी नवी मुंबईत काश्मीर हाऊससाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. मुंबईत साऱ्यांनाच जागा हवी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतून कारखानदारी गुजरातेत सरकत असल्याची चिंता करावी की मुंबईच्या जिवावर उदरभरण करणाऱ्यांना आश्रय देऊन चोख उत्तर द्यावे. पेच विलक्षण आहे पण यातच मेख आहे.- रघुनाथ पांडे
मै और मेरी तनहाई
By admin | Updated: May 29, 2015 23:54 IST