शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जगदीप धनखड यांचे नाव कसे पुढे आले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 08:02 IST

उपराष्ट्रपतिपदासाठी धनखड यांना उमेदवारी, शिंदेंना महाराष्ट्रात खुर्ची, गुजरातमध्ये पाटीदारांना सत्ता; ही गणिते भाजपने २०२४ साठी घातली आहेत!

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

‘आपण उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहात’ असे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना पंतप्रधानांनी १६ जुलैला सांगितले, असा समज आहे, तो अजिबातच खरा नाही.  त्या दिवशी धनखड पंतप्रधान कार्यालयात मोदींना भेटले होते; पण मोदींनी त्यांना हे सांगितलेले नाही. 

वास्तवात धनखड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपाप्रीत्यर्थ आयोजित राज्यपालांच्या भोजनप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी धनखड दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी या भेटीची विनंती केली.  पश्चिम बंगालमधील विद्यमान परिस्थितीविषयी उभयताना माहिती देण्याचा हेतू त्यामागे होता. धनखड मोदी यांना भेटले तेव्हा फक्त पश्चिम बंगालबद्दलच बोलणे झाले. मोदी किंवा शहा यांच्यापैकी कोणीही धनखड यांना ते उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असणार आहेत हे कळू दिले नाही. समाजमाध्यमांमध्ये मात्र याविषयी चर्चा सुरू झाली होती. पंतप्रधानांबरोबरचा धनखड यांचा फोटो पंतप्रधान कार्यालयानेच ट्वीटरवर टाकल्याने या चर्चेला कारण मिळाले. 

राष्ट्रपती भवनात त्या संध्याकाळी धनखड भोजनाला आले असताना त्यांना अनेक मिस कॉल, त्याचप्रमाणे संदेशही आले. परंतु कार्यक्रमात असल्याने त्यांनी फोन अथवा संदेश यांच्याकडे पाहिले नाही. तेवढ्यात राष्ट्रपती भवनातील एक सेवक त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना फोन पाहायला सांगितले. प्रस्तुत लेखकाशी बोलताना धनखड यांनी स्वतः सांगितले, की उमेदवारीविषयी आपल्याला राष्ट्रपती भवनातील भोजनाच्या वेळीच समजले. भाजपमधील वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान शिष्टाचाराच्या बाबतीत फार काटेकोर असतात. शेवटपर्यंत ते माहिती स्वतःजवळच ठेवतात. त्यांनी जर धनखड यांच्या उमेदवारीविषयी आधी गुपित फोडले असते तर वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याला काही अर्थच उरला नसता. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संसदीय मंडळाला सांगितले की, उपराष्ट्रपतिपदासाठी तीन नावे समोर आली आहेत... पुढे जे झाले, ते सारेच जाणतात! 

२०२४ : भाजपाची मोठी महत्त्वाकांक्षा

२०१४पासून नरेंद्र मोदी भाजपसाठी निवडणुका जिंकून देणारे हुकमाचे पान ठरत आले आहेत. असे असले तरी येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाची यंत्रणा मात्र प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत खबरदारी घेताना दिसते. अधिकाधिक राज्यात भाजपचे सरकार येईल यासाठीही या यंत्रणेने सतत प्रयत्न केले. काही राज्यात साधनशुचिता  बाजूला ठेवून पराभवाचे रूपांतर विजयात करण्याचा उद्योगही या यंत्रणेने केला. पण हा नवा भारतीय जनता पक्ष आहे. पडद्यामागून काम करणाऱ्यांचे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे मात्र काहीसे वेगळे आहे.  उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचलात पक्ष ठाकुरांना मुख्यमंत्रिपदी बसवत असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळात राजनाथ सिंग यांना नंबर दोनचे महत्त्व देत आहे. गुजरातमध्ये पाटीदारांना सत्ता दिली तर महाराष्ट्रात मराठा समाजातील नेता मुख्यमंत्रिपदी बसवला. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचा बंदोबस्त करण्यात आला.  

इतर मागासवर्गीयांची नाराजी ओढवू नये म्हणून शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद ठेवण्यात आले आहे. राजपूत खूश राहावेत म्हणून ज्योतिरादित्य शिंदे आणि नरेंद्र सिंग तोमर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात आले आहे. हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात भाजपाला एखादा ज्येष्ठ जाट नेता मदतीला हवा आहे. उपराष्ट्रपतीपद देऊ केलेले जगदीप धनखड हेही जाट आहेत. स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासात उपराष्ट्रपती होणारे ते पहिले जाट असतील. हरयाणात दुष्यंत चौताला हे जाट नेते उपमुख्यमंत्री आहेत. छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि इतर राज्यातल्या मिळून १०९ लोकसभा मतदारसंघात आदिवासींचा प्रभाव आहे. तो डोळ्यासमोर ठेवून पक्षाने आदिवासी महिला राष्ट्रपती पदासाठी निवडली. 

गेहलोतपुत्राचे नाशिक प्रकरण

महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर अनेक नेत्यांचे भवितव्य कदाचित बदलू शकते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत हे नाशिकमध्ये एका प्रकरणात अडकले आहेत. याच वर्षी मार्च महिन्यात ६.८९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात नाशिकच्या एका व्यावसायिकाने वैभव गेहलोत आणि इतर तेरा व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली. परंतु तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली. मग सदर व्यावसायिक न्यायालयात गेला. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यायला सांगितले. प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले आणि काही दिवसातच तक्रारदाराने न्यायालयात सांगितले, की वैभव गेहलोत यांच्याविरुद्ध आपल्याला खटला पुढे न्यायचा नाही. दरम्यान, राज्यातले उद्धव ठाकरे सरकार पडले. आता गेहलोत यांना त्रास होऊ शकतो. नाशिकचे तक्रारदार बदललेल्या परिस्थितीनुसार पुन्हा वेगळा सूर लावतात का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार