मातोश्री हे शिवसेनेचे जन्मस्थान विधानसभेच्या ज्या मतदारसंघात आहे त्या वांद्र्यातून मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या संघटनेने आपला उमेदवार उभा करणे वा तो उभा करण्याचा विचार करणे ही गोष्ट साधी नाही. दिल्लीत सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष व त्याचे महाराष्ट्रात सख्य असलेली शिवसेना हे दोन्ही पक्ष आपल्याला मारणार आणि काँग्रेस किंवा कोणताही पक्ष त्या स्थितीत आपल्याला तारणार नाही या निर्णयाप्रत देशातील मुसलमानांचा वर्ग येऊ लागला असल्याचे सांगणारी ही वस्तुस्थिती आहे. इत्तेहादूलने याआधी विधानसभेची औरंगाबादची (शिवसेनेच्या भाषेत संभाजीनगराची) व मुंबईतील भायखळ्याची विधानसभेची जागा जिंकली आहे. मुंबऱ्यात त्या पक्षाचा उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाला आहे. त्याही पूर्वी नांदेडच्या महापालिकेत इत्तेहादूलचे अकरा नगरसेवक निवडून आले आहेत. आपल्याच देशातील आपलीच कोट्यवधी माणसे आपल्यापासून दुरावत चालली असल्याचे केंद्राला व महाराष्ट्राला सांगणाऱ्या या गंभीर बाबीचा विचार न होणे वा तो होत असलेला न दिसणे याएवढी मूकबधिरच नव्हे तर आंधळी बाबही दुसरी नाही. आंध्र विधानसभेत इत्तेहादूलचे सात आमदार आहेत. त्या पक्षाचे अध्यक्ष बॅ.असदुद्दीन ओवेसी हे लोकसभेत निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि बंगालमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचे त्या पक्षात घाटत आहे आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत इत्तेहादूलने त्या शहरातील आपली ताकद साऱ्यांच्या लक्षात आणून दिलीही आहे. ही स्थिती देशाचा एकात्म विचार करणाऱ्या प्रत्येकाला चिंतेत टाकणारी व त्याचे पंधरा कोटी नागरिक पुन्हा एकवार आपल्यापासून मनाने दूर जातात की काय असा विचार करायला लावणारी आहे. दलितांचा एक मोठा वर्ग हिंदू समाजापासून दूर गेल्याच्या घटनेने आपल्याला काहीच शिकविले नाही की काय असे वाटायला लावणारे हे वास्तव आहे. वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला आहे आणि काँग्रेसकडून नारायण राणे हे पूर्वी मुख्यमंत्री राहिलेले बलाढ्य उमेदवार लढतीत उतरले आहेत. या निवडणुकीत होणारे मतदान कसे असेल व त्याची विभागणी कशी होईल हे सांगायला कोणा राजकीय जाणकाराची गरज नाही. तीत इत्तेहादूल विजयी झालीच तर त्याचेही आश्चर्य करण्याचे कारण असणार नाही. यातला खरा प्रश्न, या पातळीपर्यंत म्हणजे मतदानाच्या धार्मिक विभाजनापर्यंत देशाचे राजकारण कोणी आणून पोहचविले हा आहे. देशभक्ती आणि धर्मांधता या एका पातळीवरच्या गोष्टी नव्हेत. देशावर प्रेम करायचे तर ते त्यातील सगळ्या नागरिकांवर करावे लागते हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे. इत्तेहादूलचा इतिहास उघड आणि बोलका आहे. १९२६ च्या सुमारास हैदराबादच्या निजामाचे आसन मजबूत करायला व ते संस्थान भारतापासून वेगळे ठेवायला ही संघटना स्थापन झाली. रझाकार हे भयकारी अपत्यही याच संघटनेचे आहे. हैदराबादचे संस्थान निजामाच्या ताब्यातून बाहेर पडून भारतात विलीन होईपर्यंत इत्तेहादूलने व तिच्या रझाकार या संघटनेने त्या प्रदेशात केलेला अनाचार हा इतिहासाचा भाग असला तरी साऱ्यांच्या स्मरणात अजून शिल्लक आहे. हैदराबाद भारतात विलीन झाल्यानंतर व विशेषत: १९८०नंतर इत्तेहादूलच्या नेतृत्वाने आपल्या भूमिकांमध्ये बदल केला व ती संघटना स्वत:ला भारतीय म्हणू लागली. असदुद्दीन ओवेसी हे त्या संघटनेचे एकमेव राष्ट्रीय पुढारी स्वत:ला भारतीय मुसलमान म्हणविणारे आहेत. संसदेतील त्यांची कारकीर्द त्यांच्या एकारलेपणासाठी ओळखली जात नाही. धार्मिक प्रश्नावर त्यांच्या भूमिका सदैव धर्मनिरपेक्ष पण अल्पसंख्यकांच्या अधिकाराबाबत सावध राहिल्या आहेत. इंडिया टुडे या इंग्रजी नियतकालिकाने काही वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हजर राहिले होते. त्यावेळी केलेल्या आपल्या भाषणात भारतीय मुसलमानांविषयी ते जरा जास्तीच्या काळजीने बोलू लागले तेव्हा तेथे उपस्थित असलेले इत्तेहादूलचे खा. असदुद्दीन तात्काळ उठून त्यांना म्हणाले ‘तुम्ही तुमच्या देशातील मुसलमानांची काळजी घ्या. इथल्या मुसलमानांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आम्ही भारतीय लोकच आमचे प्रश्न सोडवू. त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही.’ इत्तेहादूलची बदललेली प्रकृती सांगणारी ही घटना आहे. त्या पक्षाचे सारेच पुढारी असदुद्दीन यांच्याएवढा व्यापक विचार करणारे अर्थातच नाहीत. त्यांचा धाकटा भाऊ व आंध्र विधानसभेचा सभासद अकबरुद्दीन हा कमालीचा तिरकस व एकारलेला आहे. मात्र त्या एकट्यावरून साऱ्या समाजाची प्रतिमा मनात निश्चित करणे अन्यायकारक आहे. तरीही देशात मुसलमानांची संख्या पंधरा कोटींच्या जवळ जाणारी आहे व ती बांगला देश आणि पाकिस्तान या देशांच्या लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. या साऱ्या भारतीय मुसलमानांचे नेतृत्व इत्तेहादूलकडे जाणे ही गोष्ट देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रकृतीला व एकात्मतेला मानवणारी नाही. वांद्र्याच्या निवडणुकीने एवढे सत्य जरी साऱ्यांच्या गळी उतरविले तरी (तिचा निकाल कसाही लागो) तो तिचा मोठा लाभ ठरणार आहे.
इत्तेहादूलचा धडा !
By admin | Updated: March 31, 2015 05:39 IST