शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

एका मूलग्राही समीक्षकाचे जाणे

By admin | Updated: May 28, 2016 04:12 IST

गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांच्या विचारसृष्टीवर अपार श्रद्धा असलेले आणि साधना या विवेकी नियतकालिकाच्या विकासवाढीची तन-मन- धनाने चिंता वाहणारे महाराष्ट्राचे

गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांच्या विचारसृष्टीवर अपार श्रद्धा असलेले आणि साधना या विवेकी नियतकालिकाच्या विकासवाढीची तन-मन- धनाने चिंता वाहणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या निधनाने ठाम विचारांचा पण कमालीच्या संवेदनशील मनाचा मराठी वाङ्मयाचा एक ज्येष्ठ समीक्षक आपण गमावला आहे. आपली हयात आणि घरादारासकटची सारी मिळकत आपल्या विचारांच्या व तो पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हवाली करून समाधानाने सारे चांगले शोधत राहण्याची व त्याला आपल्या परीने बळ देण्याची निष्ठा त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळली. परिणामी त्यांच्या सदिच्छांचा व उत्साहवर्धक पाठिंब्याचा लाभ झालेले सामाजिक कार्यकर्ते जेवढे त्यांच्या संपर्कात होते, तेवढेच अनेक नवनवे लेखक, लेखिका, कवी, कवयित्री आणि साहित्य प्रांतात काही नवे करू पाहणारे तरुणही त्यांच्याजवळ होते. समीक्षकाला शब्दाएवढीच त्यामागच्या आशयाची जाण असावी लागते. हा आशय खूपदा बहुरंगी, अनेकार्थी व बहुविध छटांनी नटलेला असतो. रा.गं.ची समीक्षादृष्टी हा सगळा आशय त्याच्या शब्दार्थाएवढाच कवेत घेणारी होती. त्याचमुळे ती कमालीची सखोल व प्रत्यक्ष लेखकालाही आपल्या लिखाणातून न उलगडलेले प्रश्न व न सुचलेले विचार त्याच्या लक्षात आणून देणारी होती. मराठीतील समीक्षकांची परंपरा तशीही रोडावत आणि क्षीण होत असताना रा. ग. जाधव यांनी तिची ध्वजा उंच उचलून धरली होती. त्यांच्या समीक्षेचा आणखी महत्त्वाचा विशेष हा की त्यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांवरील श्रद्धांना आपल्या समीक्षेच्या क्षेत्रात उतरू दिले नाही. त्या दोन क्षेत्रातली त्यांची वाटचाल स्वतंत्र आणि समांतर होती. एक अतिशय उत्कृष्ट व विद्यार्थिप्रिय प्राध्यापक हा लौकिक पाठीशी असलेल्या जाधवांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात समीक्षेची सर्वाधिक असली तरी कविता व ललितबंधांची पुस्तकेही समाविष्ट आहेत. मुंबई-पुण्याकडील प्रथितयश लेखकांइतकेच अमरावती वा भंडाऱ्याकडील नव्याने लिहिणाऱ्यांना त्यांनी आपल्या समीक्षेत स्थान दिले. बोली भाषेचे महत्त्व जपणारे आणि त्या भाषांमधून लेखन करणारे लेखक व कवींविषयीची त्यांना विलक्षण आस्था होती. मात्र जाधवांना राज्यातच नव्हे तर देशात मान्यता मिळवून दिली ती त्यांच्या नवतेबाबतच्या शोधदृष्टीने. १९६० च्या सुमारास दलित साहित्याचा शक्तिशाली प्रवाह मराठी सारस्वतात आला. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्याची, त्याला नाके मुरडण्याची किंवा त्याची तोंडभर पण खोटी स्तुती करणाऱ्या उथळ समीक्षकांची संख्या मोठी होती व ती पुढे होती. जाधवांचे मोठेपण हे की त्यांनी आरंभापासून या साहित्यप्रवाहाची गंभीर दखल घेतली. तेवढ्यावर न थांबता हे साहित्य एक दिवस देशाच्या व जगाच्याही वाङ्मयक्षेत्रात मानाचे स्थान मिळवील याची ग्वाही त्यांनी दलित साहित्यिकांना दिली. हीच बाब त्यांनी स्त्रियांच्या लिखाणाबद्दलही केली. स्त्री साहित्य हे साहित्यच नव्हे इथपासून त्यात पुरेसे गांभीर्य नाही, विचार नाही, ते जीवनाला स्पर्श करत नाही किंबहुना स्त्रियांचा बुद्ध्यांकच कमी आहे इथपर्यंतची त्यांच्या लिखाणाची टवाळी अनेकांनी केली व अजूनही ती संपली नाही. रा.गं.चे वैशिष्ट्य हे की त्यांनी स्त्रियांच्या लेखनाचे नुसते स्वागतच केले नाही, तर मानवी आयुष्याची तोवर साहित्यात न आलेली प्रकरणे आणि जाण या साहित्याने समाजाला कशी आणून दिली याविषयीचे मार्गदर्शनच समाजाला केले. समाजाला आपल्याच आयुष्याचा एक मोठा भाग आपल्याला कसा अज्ञात होता याची जाण जशी दलित साहित्याने आणून दिली तशी आपण गृहीत धरलेले घर व स्त्री-पुरुषांसंबंधीचे समज केवढ्या ठिसूळ पायावर उभे होते याचे भान स्त्री साहित्याने समाजाला दिले. या उदयिक क्षेत्रांचे स्वागत करण्याचा पहिला मान मराठीत रा. ग. जाधवांना जातो. या साहित्यातील उणिवाही त्यांनी दाखवून दिल्या. पण त्या दाखविताना त्या साहित्याचा कंद शाबूत राहील याची हळुवार काळजीही त्यांनी घेतली. औरंगाबादच्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातही त्यांनी नव्याने साहित्यक्षेत्रात प्रविष्ट होणाऱ्या व ते क्षेत्र समृद्ध करणाऱ्या लेखक-लेखिकांकडे नुसते कौतुकाने नव्हे तर अभिमानाने व आपलेपणाने पाहण्याचा सल्ला वाचकांना दिला. गांधी विचारांवर अपार श्रद्धा असल्याने आणि संस्कृती हेच साहित्याचे खरे मूल्य असल्याची जाण असल्याने जाधवांनी गांधींच्या मूल्यांएवढीच साऱ्या सांस्कृतिक मूल्यांचीही आयुष्यभर काळजी घेतली. समाजातील पुरोगामी चळवळींचेही ते पाठीराखे होते. साधनाचे नरेंद्र दाभोलकर यांच्यावर त्यांनी एक कवितासंग्रहच लिहिला. दाभोलकर पुण्यात त्यांच्याकडे मुक्कामालाच असत. संस्कृती संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलन, परंपरागत मूल्ये आणि पुरोगामी दृष्टी यांचा समन्वयच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशी माणसे दुर्मीळ असल्याच्या आजच्या काळात जाधवांचे जाणे हे साऱ्यांनाच चटका लावून जाणारे आहे.