(मना रे)- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकरमानसिक ऊर्जेमुळे स्थिरावलेल्या व्यक्ती आपल्या अवतीभोवतीच आपण पाहतो. सामान्य माणसे असतात ती. पण, तीच मातीत भक्कमपणे पाय रोवून असतात. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती’ कारण त्या माणसांमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यांच्या मानसिक सक्षमतेत एक प्रकारचा कणखरपणा असतो. तो कणखरपणा कधी विपरीत स्थितीमध्ये किंवा कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी व्यक्तीची ढाल बनून तिचे रक्षण करतो. तर कधी एक अस्त्र बनून आयुष्याची राख करणाऱ्या भयानक समस्यांचा अग्नीच विझवून टाकतो. एकंदरीत आयुष्यातील युद्धप्रसंगांना सामोरे जाताना या व्यक्तीमध्ये जे मनोबल येते ते त्यांच्या अंतरंगातूनच. परमेश्वरकृपेने अशा काही गोष्टी आपल्यात नैसर्गिकरीत्या आलेल्या असतातही. त्या फक्त आपल्याला जोपासाव्या लागतात. तर कधी त्या कणखर गुणांना आणि खंबीर विचारांना आपल्याला प्रसंगानुरूप जन्म द्यावा लागतो. अनेक वेळा आयुष्यातील विपरीत प्रसंगांनी आपण दु:खी होतो आणि त्या दु:खात जेरबंद होतो. प्रसंग अटीतटीचे असतातच; पण त्यातून ज्या दु:खाची निर्मिती होते ती मात्र अमर्याद भासते. दु:खाच्या त्या पिंजऱ्यात आपण असे काही अडकतो की इतर सत्यम् शिवम् सुंदरम् असे जग आपल्याला दिसतच नाही. सुंदर विश्वाची हाक कानावर पडतच नाही. त्या दु:खाच्या क्षितिजापलीकडे जे अनमोल सौंदर्य असते ते आपण पाहू शकत नाही. किंबहुना आपण ते पाहायला तयारही नसतो. आपले मन वास्तविकतेच्या दुनियेत यायला तयारच नसते. देवाने दिलेल्या आयुष्यात कडूगोड अनुभव असतात. पण आपण मात्र त्या कडवट जीवनानुभवात हरवलेले असतो. म्हणूनच तर एक माणूस म्हणून, आपल्याला आपली मर्यादा समजून घेणे गरजेचे असते. आपण गमावलेले मिळविण्यासाठी आपली ताकद पणाला लावतो. अप्रिय घटनेशी दोन हात करायचा अथक प्रयत्न करतो; पण जमत नाही. का जमत नाही, कसे जमत नाही? या प्रश्नांभोवती आपले मन रुंजी घालत राहते. कित्येक वर्षे आणि कधी-कधी पुरा जन्म. का झाले माझ्याबाबतीत असे? कशामुळे झाले? कारण काय या त्रासाचे? डोके भणाणून उठते. पण उत्तर मिळत नाही. बरे या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत असा नियमही नाही. पण जर विचारांचा ओघ वळवता आला तर काहीतरी विधायक करता येईल. त्यासाठी काही गोष्टी आपण आपल्या मानवी अनुभवाच्या कक्षेत राहून समजावून घेतल्या तर आपली ऊर्जा आपण वाया घालविणार नाही. अनेक वेळा जेव्हा आपण संकटाच्या चक्रव्यूहात शिरतो तेव्हा (सुभद्रपुत्र अभिमन्यूसारखेच) आपली मर्यादा आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच ज्या समस्या आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत त्यात आपली एनर्जी वाया न घालवणे केव्हाही शहाणपणाचे ठरते. एक तरुण गृहस्थ त्याच्या मालकाने पगार वाढविला नाही म्हणून रागारागाने ती नोकरी सोडून बसला. पैशांची चणचण तर घरात होतीच. दुसरी नोकरी मिळत नव्हती म्हणजे जे हातात होते तेही घालवून बसला. वेळीच नोकरी मिळणे किती कठीण आहे ही मर्यादा ओळखणे त्या युवकासाठी किती महत्त्वाचे होते. अशा अनेक कठीण समयी स्वत:ची मर्यादेची लक्ष्मणरेषा ओळखून आपली ऊर्जा वाचविणे खूपच फायद्याचे ठरते. म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरावेत. अर्थात ज्याला आपली मर्यादेची सीमारेषा ओळखता आली त्याला दुसऱ्यांच्या मर्यादाही ओखता येतात. साहजिकच दुसऱ्यांकडून किती अपेक्षा करावी याचे भान अशा व्यक्तींना उत्तम राहते. मानसिक हायजिनचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे दोन व्यक्तींमधील संवाद व सामंजस्य जपले जाते. स्वत:चा मान राखायला शिकणे व त्याबरोबरच दुसऱ्याचाही सन्मान राखणे, हा दुसरा महत्त्वाचा टप्पा मानसिक शुचितेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. भावनिक गुंतागुंतीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘इगो.’ यामुळे व्यक्ती कायम अशांततेच्या, असमाधानाच्या आहारी जाते. समस्या कधी कधी नसतेच किंवा छोटीशीच असते. अभिमानाचे खरे कारण हे व्यक्तीला स्वत:बद्दल असलेल्या असुरक्षितेतून आलेले असते. जेवढी स्वत:बद्दल आपल्याला खात्री नसते तेवढे आपण अतृप्त राहतो. या अतृप्तीमुळे खरेतर आपण बाह्य जगातील प्रसंगातून व माणसातून आपला मानमरातब शोधू लागतो. लोकांच्या छोट्या छोट्या (बहुधा आपल्याला न आवडलेल्या) गोष्टींमुळे आपण आपली शांती गमावतो, चिडतो, संतापतो. लोक खरेतर आपल्या मनासारखे वागायला बांधील नाहीत. पण आपल्याला मात्र वाटते की त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागले पाहिजे.आपण आपल्या अस्तित्वाचा सन्मान ठेवतो तेव्हा दुसऱ्याचा सन्मानही ठेवतो. आपल्याशी चांगले वागणारे आणि न वागणारे दोघेही सारख्याच दृष्टीने पाहतो. जो माणूस स्वत:ला प्रेमाने पाहतो तो इतरांकडेही प्रेमानेच पाहतो. याच्याउलट स्वत:चा धिक्कार करणारा दुसऱ्याकडेही तसाच पाहातो. मानसिक शुचिता मात्र आपल्याला स्वत:चा सन्मान जोपासत एका वेगळ्याच क्षितिजावर नेते. त्या क्षितिजावर जगाला प्रकाश देणारा दाता सूर्य असतो.अलीकडेच निदा फाजली या संवेदनशील शायराचे निधन झाले. त्यांनी अगदी सहजपणे जगाचा हा व्यापार अचूक शब्दांत वर्णन केला आहे. जगात आपण मनोमनी मागितलेले मिळतेच असे नाही. ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कहीं जमीं तो कहीं आसमां नही मिलता..’ जेव्हा आपल्या मनात स्वत:बद्दल ठाम आत्मविश्वास असतो तेव्हा आपण आपला मान स्वत:च जपतो. लोक आपल्या बाजूने किंवा आपल्या विरोधात काय करतात याचा परिणाम आपल्यावर होऊ देत नाही. मानसिक शुचिता निकोप ठेवायची शक्ती कित्येकांना देवाने जणूकाही आशीर्वादपूर्वक दिली आहे असे वाटते. कित्येक वादळे यांच्या आयुष्यात आली आणि गेली; तरी या लोकांचे आयुष्य स्थिरावले ते त्यांच्या मानसिक ऊर्जेमुळे.देवाने दिलेल्या आयुष्यात कडूगोड अनुभव असतात. पण आपण मात्र त्या कडवट जीवनानुभवात हरवलेले असतो. म्हणूनच तर एक माणूस म्हणून, आपल्याला आपली मर्यादा समजून घेणे गरजेचे असते. आपण गमावलेले मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावतो.
सन्मानाने जगताना...
By admin | Updated: February 21, 2016 05:18 IST