शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शरणागतीला विरोध करा, ‘डोकं’ चालवा, निर्भय व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:05 IST

दिल्ली येथे सुरू असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. तारा भवाळकर यांनी केलेल्या प्रदीर्घ भाषणाचा संपादित आणि संक्षिप्त सारांश!

डॉ. तारा भवाळकर, लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक

माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल विश्वामध्ये तेव्हापासून तो आपल्या भोवतालच्या वातावरणातून बऱ्याच गोष्टी शिकत आला आहे. चालीरीती, रुढी या तिथल्या निसर्गाने त्याला शिकवल्या आणि त्याच्या गरजांनी, हवामानाने शिकवल्या. त्याच्या  भावना, श्रद्धा, आचरण, त्याची घरे, त्याचं बोलणं, त्याच्या देवता, त्याचं अन्न हे सारं तो जिथे होता तिथल्या निसर्गाने घडवून आणलं आणि याला आपण म्हणतो ही संस्कृती. मानववंश जन्माला आल्यापासून  आजपर्यंत जी स्थित्यंतरं झाली ती निसर्गाने आणि भोवतालच्या वातावरणाने झाली. नंतरच्या काळामध्ये निरनिराळ्या संस्कृतींच्या लोकांच्या सरमिसळीमुळे, देवाण-घेवाणीमुळे झाली.. हे मानववंशशास्त्र. माणसाच्या वंशाने हे सगळं निर्माण केलं, काही स्वीकारलं. काही गोष्टी नाकारल्याही. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात, काही गोष्टीत सुधारणा करावीशी वाटते. काही गोष्टी एकदम सोडून द्याव्या वाटतात, काही थोडंसं परिवर्तन करून मग त्या वापराव्याशा वाटतात... हा सगळा माणसाचा इतिहास! मानववंश, समाजशास्त्र, त्याच्या पाठीमागचं माणसाचं मन, त्याच्या श्रद्धा, देवदेवता, भावभावना, संवेदनांच्या देवाणघेवाणीतून माणूस घडला. त्याला आपण संस्कृती म्हणतो.

निसर्गाने माणसाला मूलतः जगायला शिकवलं आहे आणि तो प्रवास आजपर्यंत चाललेला आहे म्हणून याला लोकसंस्कृती म्हणायचं आणि या धर्माला मी ‘लोकधर्म’ असे म्हणते.  तुम्ही कुठलाही शिक्का मारा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन वगैरे  काहीही मारा; परंतु लोकांच्या जगण्यातून जे आपोआप निर्माण झालेलं आहे, तो ‘लोकधर्म’. म्हणून  रूढार्थाने इथला धर्म जरी बदलला आणि भौगोलिक परिस्थिती तीच असली तरी चालीरीती, रूढीमध्ये फारसा फरक पडत नाही आणि म्हणून धर्मांतर करूनसुद्धा संस्कृत्यंतर होतंच असं नाही. लोकसंस्कृती ही सबंध भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली आहे.  

 प्राचीन काळापासून चालत आलेला सर्वसामान्य माणसांच्या आचारातला, विचारातला, भावनांतला, संवेदनातला जो आचार धर्म; त्याला मी ‘लोकधर्म’ असंच म्हणते. त्यामुळे आपला धर्म हा अमुक आहे तमुक आहे अशा एकारलेपणामध्ये कधी मला अडकावंसं वाटलं नाही. फार सुदैवाने आपलं सगळं संत साहित्य, विशेषत: वारकरी मराठी संत साहित्य प्रामुख्याने अतिशय उदारमनस्क साहित्य आहे. ज्याला आपण प्रबोधन प्रबोधन म्हणतो ते लोकपरंपरेतल्या स्त्रियांनी, संतांनी, पुरुषांनी, लोककलावंतांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. लोकसंस्कृतीचा हा व्याप आपल्या सगळ्या आधुनिक संस्कृतीलासुद्धा व्यापून राहिलेला आहे.

१९७५ मध्ये स्त्रीमुक्ती वर्ष नावाची भानगड आली आणि त्यावेळेला लोक सांगायला लागले की हे पाश्चिमात्यांकडून आलेलं आहे. मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. मी म्हटलं, हे पाश्चिमात्यांकडून आलेलं नाही, आमच्या बायका फार जबऱ्या होत्या हो! जी बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्रीमुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली सिमोन दि बोव्हा माहिती नव्हती. ती काय म्हणते? ‘‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी॥ उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी॥’’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे.. त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु त्याचा भंडाफोड या आमच्या संत, कवयित्रींनी तेराव्या-चौदाव्या शतकामध्ये केलेला आहे.

आज  माणसांचं जीवन कसं चाललेलं दिसतं? - जुनं ते जाऊद्या सगळं, आता नवीन काय ते पाहा.. असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचाही प्रयत्न करायचा. त्यासाठी लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. लोक स्वतःला पदवीधर म्हणवतात, उच्चशिक्षित म्हणवतात परंतु आपण हे कर्मकांड का करतो आहोत, याचा साधा विचारही करत नाहीत असे दिसते.  नुसतं करत राहायचं... ते अमुक करा, तमुक करा, तमुक करा आणि मग त्याला ‘सायंटिफिक रिझन देण्याचा प्रयत्न करायचा.’ ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, व्याज विज्ञान/खोटं विज्ञान’ ते हेच! मग या खोट्या विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवायच्या, आणि मग हे वैज्ञानिक सत्यच कसं आहे, हे ठासून सांगायचा उद्योग चालू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ‘तथाकथित’ शिक्षित समाज याला बळी पडतो आहे, हा उलटा प्रवास  चिंताजनक आहे.

आपण ज्याला ‘सायंटिफिक रिझन’ देतो म्हणतो, वैज्ञानिक सत्य म्हणतो, त्याच्या पाठीमागच्या  अप्रबुद्धपणाकडे आमचं लक्षच नाहीये. अपवाद आहेतच, पण असे बहुसंख्य आहेत ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे; पण  त्यांचे मेंदू काम करीत नाहीयेत. त्यांचे मन आणि मेंदू  मोकळे करायला पाहिजेत, चिमटीएवढे मेंदू असलेली  माणसं आंधळे आचरण करत आहेत, कर्मकांडामध्ये गुंतून त्याचे समर्थन करीत आहेत, यांना सुशिक्षित का म्हणायचं? हे साक्षर आहेत फक्त! 

कारण ज्ञानाने धीर यायला पाहिजे, ज्ञानाने धाडस यायला पाहिजे, ज्ञानाने भीती वाढता कामा नये, उलट भीती गेली पाहिजे! ज्ञानाने भीती जायच्या ऐवजी  वाढत असेल तर या लिहिता-वाचता येणाऱ्यांना ज्ञानी म्हणायचं का?   ज्ञानामुळे माणूस निर्भय व्हायला पाहिजे आणि या देशातले लोक जर जास्त निर्भय व्हायचे असतील तर त्यांनी या सगळ्या कोंडाळ्यातून बाहेर यायला पाहिजे, आणि  लोकसंस्कृतीचा, लोकविज्ञानाचा सर्वांगाने नीट धांडोळा घ्यायला पाहिजे. शहाणी माणसं असतात ती विचार करतात आणि जुन्यातलं टाकाऊ काय आणि टिकाऊ काय याचं विवेकाने ग्रहण करत असतात. स्वतः परीक्षण करतात. स्वतःचं डोकं चालवतात...  आणि मूर्ख जे असतात ते दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून असतात.

अमुकतमुक महाराजांनी सांगितलंय, व्हा शरणागत! या शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे, ज्ञानाने माणसाला निर्भय बनवलं पाहिजे.