शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम!

By विजय दर्डा | Updated: July 22, 2019 06:17 IST

माझा हा विश्वास स्वानुभवातून होता. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने श्रीहरिकोटा येथे गेलो तेव्हा ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांची चिकाटी आणि समर्पण मी जवळून पाहिले होते.

विजय दर्डा15 जुलै रोजी ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण पाहण्यासाठी भारतात अनेक लोक मुद्दाम पहाटेपर्यंत जागत होते तेव्हा मी ऑस्ट्रियात होतो व तेथे तेव्हा मध्यरात्रही झालेली नव्हती. मी टीव्ही पाहण्याची तयारी करेपर्यंत ते प्रक्षेपण पुढे ढकलल्याची बातमी आली. खरं तर हे प्रक्षेपण आधी ऑक्टोबर २०१८ मध्ये व्हायचे ठरले होते. पण ते झाले नाही. त्यानंतर ३ जानेवारी, नंतर ३१ जानेवारी व शेवटी १५ जुलैची तारीख ठरली होती. त्या दिवशीही प्रक्षेपण झाले नाही तेव्हा बहुतांश उत्साही लोकांची तात्कालिक निराशा झाली. पण मी अजिबात निराश झालो नाही, कारण प्रक्षेपणात आलेल्या अडचणीवर आपले वैज्ञानिक लवकरच मात करतील, याचा मला विश्वास होता.

माझा हा विश्वास स्वानुभवातून होता. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने श्रीहरिकोटा येथे गेलो तेव्हा ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांची चिकाटी आणि समर्पण मी जवळून पाहिले होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी ही संधी मला मिळाली होती. तेथे एअर कंडिशन्ड खोल्यांमध्ये बसूनही वैज्ञानिकांच्या कपाळावर आलेला घाम मी त्या वेळी पाहिला होता. प्रत्येक अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण किती महत्त्वाचे असते व त्या वेळी ते किती तणावाखाली असतात यावर माझी वैज्ञानिकांशी सविस्तर चर्चा झाली होती. प्रक्षेपक यानातील बिघाड लगेच दुरुस्त करून आज २२ जुलै रोजी ‘चांद्रयान-२’ पुन्हा अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे, हे त्यांच्या या मेहनतीचेच फलित आहे.

३,८७७ किलो वजनाच्या ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण भारतास नक्कीच अभिमानास्पद असेल. ‘चांद्रयान-१’ केवळ चंद्राच्या कक्षेत घिरट्या घालून आले होते. ‘चांद्रयान-२’च्या माध्यमातून ‘इस्रो’ ‘विक्रम’ हे लॅण्डर व ‘प्रज्ञान’ हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविणार आहे. हे शक्य झाले तर अशी अवघड कामगिरी फत्ते करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. सप्टेंबरमध्ये चंद्रावर उतरल्यानंतर, लँडर चंद्रावर भूकंप होतात का, याचा शोध घेईल तर ‘रोव्हर’ तेथील खनिजांचा मागोवा घेईल. चंद्राभोवती घिरट्या घालणारे ‘ऑर्बिटर’ पृथ्वीच्या या उपग्रहाचे नकाशे तयार करेल.

‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण यासाठीही महत्त्वपूर्ण असेल कारण मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याला दोनच दिवसांपूर्वी ५० वर्षे पूर्ण झाली. आता ‘चांद्रयान-२’ त्यात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे. ‘चांद्रयान-२’मधील लॅण्डर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात उतरविले जाणार आहेत. जगातील विकसित देशांनाही हे जमलेले नाही. भारताने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ रशियन रॉकेटने सोडला होता, हे लक्षात घेतले तर भारताची ही प्रगती नक्कीच नेत्रदीपक आहे. दळणवळणासाठी पहिला ‘अ‍ॅप्पल’ हा उपग्रह सोडण्यासाठीही परदेशाची मदत घ्यावी लागली होती. त्या वेळी ‘अ‍ॅप्पल’ उपग्रह बैलगाडीतून नेला जात असतानाचे छायाचित्र जगभर गाजले होते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, बैलगाडीपासून सुरुवात करून आज आपण एकाच यानाने एकावेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचे कसबही आत्मसात केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पहिला भारतीय जेव्हा चंद्रावर उतरेल ती आपल्यासाठी खूप मोठी घटना असेल. ही मोहीमही आपले वैज्ञानिक फत्ते करतील, यात मला तिळमात्र शंका नाही. याची त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे.

या सर्वांचे श्रेय आपल्या वैज्ञानिकांकडे जाते यात संशय नाही. पण देशाचे राजकीय नेतृत्वही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, हेही विसरून चालणार नाही. देश स्वतंत्र झाल्यावर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे नानाविध आव्हाने व अडचणींचे डोंगर होते. परंतु त्या परिस्थितीतही नेहरूजींनी अंतराळाकडे दुर्लक्ष केले नाही. सुदैवाने त्या वेळी अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात काही तरी करून दाखविण्याचे दुर्दम्य स्वप्न उराशी बाळगणारे थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई हयात होते. नेहरू व साराभाई यांच्या एकत्रित दूरदृष्टीतून १९६२ मध्ये राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली.

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणाच्या या शुभदिनी हे सर्व शक्य करणाऱ्या वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो. तसेच नव्या पिढीने विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी पुढचे पल्ले गाठावेत, असाही मी आग्रह करेन. विज्ञान हेच प्रगतीचे सशक्त माध्यम आहे हे निर्विवाद सत्य आहे. जगात ज्या देशांनी विज्ञानाची कास धरली ते आज आघाडीवर आहेत. आपल्यालाही ते शिखर गाठायचे आहे आणि खूप लवकर गाठायचे आहे!

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी ५0 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मुख्यमंत्री म्हणून परतण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला आणि त्यावर उपाय शोधून प्रभावी अंमलबजावणी करू शकणारा नेता अशी प्रतिमा उभी करण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. फडणवीस यांना पाच वर्षे कारभार करताना अनेक अडथळे आले, पण त्याकडे त्यांनी संधी म्हणून बघितले. कुठल्याही प्रश्नाबाबत पूर्वग्रह न ठेवता तो सोडविणे हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो त्यांच्यावरील आई-वडिलांच्या संस्कारांतून आलेला आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे  चेअरमन आहेत) (vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2