शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही हे जाहीरच करा ना!

By संदीप प्रधान | Updated: October 18, 2023 08:46 IST

टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, ही अगदी सामान्य अपेक्षा आहे. पण ते होणार नसेल, तर रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही, असे तरी सरळ जाहीर करा!

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत

‘रस्ते बांधणे, त्याची देखभाल करणे ही सरकारची जबाबदारी नाही, असे राज्यातील सरकार कधी जाहीर करणार आहे’, असा थेट सवाल जनतेच्यावतीने करण्याची वेळ आली आहे. टोल वसुलीच्या नावावर राज्यात सुरू असलेली बेसुमार लूट, रस्त्यांची दुरवस्था, टोल वसुलीच्या कंत्राटामधील राजकीय लागेबांधे, टोल कंत्राटदारांबाबत सरकारमधील मंत्री व अधिकारी यांचे दिसणारे उघड उघड ममत्व यामुळे हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल वसुलीच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. 

निवडणुका दिसू लागल्यावर मनसेचे टोलबाबत आक्रमक होणे नवीन नाही. मनसैनिकांनी अगोदर उपोषण, निदर्शने यांची गांधीगिरी केली. त्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहनांना टोलमाफी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मनसैनिकांनी टोलनाक्यांवर जाऊन प्रवाशांना तो व्हिडिओ दाखवत टोल न भरण्याची विनंती केली. अर्थात टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल वसूल केल्याखेरीज एकाही प्रवाशाला पुढे जाऊ दिले नाही हा भाग अलाहिदा. देशात लोकसभेच्या व त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्याने कदाचित मुंबई एंट्री पॉइंट व अन्य काही ठिकाणी मतदान होईपर्यंत चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचे ‘औदार्य’ कदाचित सरकार दाखवेल. यापूर्वी २०१५ मध्ये काही नाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद केला असला तरी त्यामुळे टोल कंत्राटदारांचे होणारे नुकसान सरकार भरून देत आहे. तोच कित्ता गिरवला जाईल.

महाराष्ट्रात २००० च्या दशकात टोल संस्कृती उदयाला आल्यापासून ज्या रस्त्यांवर टोल आकारला जात आहे. त्या रस्त्यांच्या बांधणी, दुरुस्ती व देखभाल यावर किती रक्कम खर्च झाली. त्या रस्त्यांवर कंत्राटदाराने आतापर्यंत किती टोल वसूल केला व किती नफा कमावला, याची आकडेवारी सरकार जाहीर करीत नसल्याने लोकांच्या मनात शंका आहेत. ज्या रस्त्यांवर टोल आकारला जात आहे तो रस्ता खराब असेल तर टोल वसुली थांबवण्याची तरतूद सरकारने का केलेली नाही? टोल कंत्राटदारांनी टोल आकारला पण रस्त्याची अवस्था खराब असेल तर त्याच्याकडून दंड का वसूल केल जात नाही? टोल कंत्राटदारांवर सरकार इतके मेहरबान असल्याचे कारण टोल वसूल करणाऱ्या कंपन्या वरकरणी खासगी भासत असल्या तरी बहुतांश टोलनाक्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची भागीदारी आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपले बगलबच्चे टोल वसुलीकरिता नाक्यांवर बसवले आहेत. 

राज्यात विविध रस्त्यांवर टोल आकारणी होत असताना मुंबई फ्री वे या २२ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर टोल आकारणी केलेली नाही. जर हा रस्ता टोल न आकारता लोकांच्या सेवेत असू शकतो तर अन्य रस्त्यांवर टोल का, असा मुंबईकरांचा सवाल आहे. पेट्रोल-डिझेलवरील सेस, वाहन खरेदी करताना आकारला जाणारा कर, कमर्शियल वाहनांना परवाने देताना आरटीओकडून आकारला जाणारा कर वगैरे मार्गाने जमा होणारे शेकडो कोटी रुपये सरकार रस्त्यांची देखभाल करण्यावर खर्च करत नाही तर मग या पैशाचे काय केले जाते? 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उभारणीकरिता कंत्राटदाराने ९०० कोटी रुपये सरकारला भरले. १५ वर्षे टोल वसुलीची परवानगी दिली. या काळात कंत्राटदार २८६९ कोटी रुपये वसूल करणार ही अपेक्षा असताना कंत्राटदाराने ४८६९ कोटी वसूल केल्याची माहिती सरकारनेच दिली आहे. सरकारने स्वत: टोल वसुलीची यंत्रणा उभी केली असती तर ही मोठी रक्कम वाचली असती. पुणे ते बेळगाव किंवा मुंबई ते अहमदाबाद रस्त्यावर प्रवास करताना अनेक प्रवासी महाराष्ट्राची हद्द ओलांडल्यावर रस्ते तुलनेने कित्येक पट चांगले असल्याचे सांगतात. कोल्हापूर ते बेळगाव या प्रवासात ५० पैसे प्रति किलोमीटर दराने प्रवास होतो. त्याचवेळी महाराष्ट्रात दीड रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास होतो. शिवाय कर्नाटकात टोलचा रस्ता पकडायचा नसेल तर सर्व्हिस रोडने प्रवासाची मुभा आहे. टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, अन्यथा रस्ते ही जबाबदारी सरकारने सोडल्याचे सरळ जाहीर करा!

टॅग्स :tollplazaटोलनाका