शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

दत्ताेपंतांची भिक्षांदेही..

By admin | Updated: June 11, 2014 10:52 IST

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत.

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक शिक्षणसंस्थांचे संचालक-मालक-पालक व महर्षी असलेले माननीय दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत. मागितलेली भिक्षा त्यांनी दडविली नाही. ‘मुलांना द्या’ म्हणजे मुलांना द्या, ‘मुलांना हवे’ म्हणजे मुलांना हवे. गेली चाळीस वर्षे सत्तेची सगळी पदे व त्यावरचे आनंद अनुभवल्यानंतर पंचाहत्तरी उलटलेल्या या मेघ्यांना आता स्वत:साठी काही नको. त्यांचे पोट आणि मन भरले आहे, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. (तरीही प. नागपूरची विधानसभेची जागा मिळाली, तर ती लढविण्याचा एक इरादा त्यांचे मन अजून सोडत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीवर्गाचे म्हणणे आहे.) घरी सारे आहे.  पैसा आहे, गाड्या आहेत, नोकरचाकर आहेत. पण, तरीही सत्तेचे पद नाही. ते द्या आणि त्यांचे कुशलमंगल करा, अशी त्या वृद्ध व तृप्त पित्याची मागणी आहे. भाजपामध्ये बरीच दयाळू माणसे आहेत. ती अशा बाहेरच्यांना सामावून घेण्यासाठी घरातल्यांना जागा रिकामी करायला सांगू शकणारी आहेत. एकट्या नागपुरात त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहितांसाठी जागा केली. मग अटल बहादूर सिंग या लोहियावाद्यासाठी केली, राष्ट्रवादीच्या रामदास तडसासाठी केली. आपली माणसे आणखी काही काळ मागे राहतील, तशीही त्यांना मागे राहण्याची सवय आहे. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ ही संघाची कविता त्यांना प्रेरणा देऊन दीर्घ काळ पायातच ठेवू शकणारी आहे. त्यामुळे दत्ताभाऊंना निराश होण्याचे कारण नाही. त्यांच्या दोन पोरांनीही आशा सोडण्याची गरज नाही. संघ परिवार मोठा आहे. तो राजकीय मतभेद पोटात घेतो आणि वैचारिक मतभेदही सांभाळून घेतो. तसे मेघ्यांजवळ वैचारिक म्हणावेसे काही नाहीही. त्यांच्याजवळ जे आहे, ते भाजपाला व त्याच्या पुढार्‍यांना याआधीही चालले आहे व तसे ते पुढेही चालणार आहे. मेघ्यांची खरी अडचण भाजपात नाही. त्या पक्षाच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या आप्तस्वकीयांच्या लोंढय़ात ती आहे. त्यात त्यांना दिसणारे त्यांचे स्नेही, नातेवाईक, जवळचे व दूरचे असे खूप लोक आहेत. त्यांची गर्दी वाढली, तर आपल्याला आणि आपल्या पोरांना तीत पाय ठेवायला जागा उरेल की नाही, ही त्यांची भ्रांत आहे. राजकारणात वरच्या जागा तशाही थोड्याच असतात. त्या वाढविण्यावरही एक र्मयादा आहे. शिवाय, त्या वाढविण्याचे स्वातंत्र्य आता नागपुरात नाही. ते अहमदाबादेत आहे. त्यामुळे गिरीश गांधी, त्यांचे चिरंजीव निशांत गांधी आणि त्यांच्या मागून येणारे बाकीचे लोंढे दारात पोहोचण्याआधीच जर काही होऊ शकले, तर ते मेघ्यांना हवे आहे. त्यासाठी ते दिल्लीत गेले. संबंधितांना भेटले आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी ‘काही तरी करा हो,’ असं म्हणून परतले. त्यांच्या आधी आणखीही एका पराभूत वैदर्भीयाने तेथे हजेरी लावली होती. पण, त्यांचे पुढारी सावध. त्यांनी त्याला तत्काळ दोन वर्षांसाठी राज्यसभा देऊ केली आणि त्याचा भाजपाप्रवेश तेवढय़ा काळासाठी रोखला. केंद्रीय नियोजन आयोगावरील एक मराठी सभासद आपला बायोडाटा घेऊन एका दिल्लीकर वजनदाराकडे मेघ्यांच्या उपस्थितीतच हजर झाला. आपला बायोडाटा त्या पुढार्‍यांच्या हाती रीतसर देऊन त्याने त्यांच्या पायांना रीतसर हातही लावला. तो गेला, तेव्हाही मेघे तेथेच होते, असे म्हणतात. असो. मेघे सावध आहेत. त्यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या मार्गात आता आणखी अडसर नको आहेत. सारे असते. पैसा, मान, लोकप्रियता, शिक्षणसंस्था, सलामीसाठी मास्तर-प्राध्यापक, चेलेचपाटे, हाताशी बाळगलेले आणि पोसलेले असे सारेच काही. पण, गाडी साधी असते. तिच्यावर दिवा नसतो अन् तेवढय़ासाठी जीव टाकणारे लोक असतात. प. महाराष्ट्रातले एक असे दिवंगत पुढारी राज्याला ठाऊक आहेत. मरतानाही त्यांच्या तोंडी ‘लाल दिवा, लाल दिवा’ हे शब्द होते, असे म्हणतात. पण, त्यालाच निष्ठा हेही नाव आहे. पवार दिवा देत असतील तर पवार, विलासराव देत असतील तर विलासराव आणि आता गडकरी देणार असतील तर गडकरी. गंमत म्हणजे जो असे काही देईल, ‘त्याच्या पायात आपल्या कातड्याचे जोडे घालायला’ मेघे नेहमीच तयार असतात. त्यांचे असे बरेच कातडे त्या कामी वाया गेल्याची चर्चा जाणकारांत आहे. असो. एवढय़ा भक्तिभावाने आणि श्रद्धाबुद्धीने केलेली कोणतीही तपश्‍चर्या निष्फळ होत नाही. तशी ती मेघ्यांचीही होणार नाही. अखेर दैवते तरी दुसरी कोणती आश्‍वासने देणार असतात.. आणि ती दिली, तरीही ती फुकटच्या शब्दांची असतील. पदे वा दिवे तत्काळ देणारी असणार नाहीत.. नाही का?