शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंधार वाढत चालला, पणत्या जपूया। 

By किरण अग्रवाल | Updated: August 19, 2021 10:53 IST

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. 

- किरण अग्रवाल

अलीकडे समाजजीवनाचे व जगण्याचेही संदर्भच बदलले असल्याने प्रत्येकजण मी व माझ्यात गुंतत चालला आहे, त्यामुळे स्वार्थांधांच्या मतलबी गोतावळ्यात माणुसकीचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे हे खरेच; पण इतरांचे जाऊ द्या, जेव्हा आपलेही आपल्याला होत नसल्याचे दिसून येते तेव्हा मनाचे व्याकूळ होणे गहिरे होऊन गेल्याखेरीज राहत नाही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. काही घटना या अपवादात्मक असतात, पण पांढऱ्या कॅनव्हासवर काळा डाग उठून दिसावा तशा असतात. समाजमनाची अस्वस्थता वाढीस लावणाऱ्या या घटनांमुळे वेदना व व्याकुळतेच्या जाणिवा घट्ट होतातच, परंतु नात्यांचे बंध किती सैल होत चालले आहेत हेदेखील त्यातून लक्षात येते. नागपुरातील घटना तशीच आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील किसनराव बोरकर हे ज्येष्ठ गृहस्थ आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीस नागपुरात उपचारासाठी घेऊन आले होते. दवाखान्यात असताना तर तिच्या मुला मुलींनी तिच्याकडे ढुंकून पाहिले नाहीच, परंतु आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही कोणी आले नाही; अखेर मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाच्या लोकांनी या अभागी मातेवर अंत्यसंस्कार केले. परिस्थिती कितीही हलाखीची वा कशीही असो, पण पोटची मुले असताना एखाद्या मातेवर अशी वेळ यावी हेच हृदय पिळवटून काढणारे आहे. यात ज्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला त्या अपरिचितांकडून माणुसकीचा प्रत्यय येत असताना, हक्काच्या म्हणवणार्‍या मुलांकडून, आप्तांकडून आलेला संवेदनाहीनतेचा अनुभव वयोवृद्ध पित्याला किती वेदना देऊन गेला असेल याची कल्पनाच करता येऊ नये. सदरची घटना ही प्रातिनिधिक म्हणता यावी, कारण समाजात अनेक ज्येष्ठांच्या वाट्याला असे दुःख आले आहे. म्हातारपणाची काठी म्हणवणार्‍या मुलांकडे आश्रितासारखे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या व्यथा या अशा असतात, ज्या सहन होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखे असते ते, पण समाजात मुलांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपला सन्मान खुंटीवर टांगून ते वाट्याला येणारे एकटेपणाचे जीवन जगत असतात. खरेतर आई वडिलांचा नीट सांभाळ न करणाऱ्या मुलांना घराबाहेर काढून देता येईल, असा एक निकाल मागे उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्येष्ठांचा योग्य सांभाळ व सन्मानासाठी कायदाही अस्तित्वात आहे, आपल्या चरितार्थासाठी ते मुलांकडून अधिकृतपणे पोटगीही मागू शकतात; पण अनेकांना हा कायदा माहित नाही व ज्यांना माहित आहे ते त्याचा वापर  करण्यास धजावत नाहीत. अर्थात प्रश्न कायद्याचाही नाहीच, तो आहे संवेदनेचा व माणुसकीचा. दुर्दैवाने या बाबी क्षीण होत चालल्या आहेत.अर्थात सारेच काही संपलेले अगर बिघडलेले नाही. तुफानातही काही दिवे तेवत असतात. नागपुरात संबंधित नलिनी बोरकर या मातेवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले तसे इतरही ठिकाणच्या घटना अधून मधून समोर येतात. परभणी जिल्ह्यातील सेलू येथेही पार्वतीबाई जैस्वाल या वयोवृद्ध महिलेवर तेथील मुस्लिम तरुणांनी रीतसर अंत्यसंस्कार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे, तर जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील जावूबाई भिल्ल या रस्त्यात बेवारस आढळलेल्या वृद्ध महिलेस काही तरुणांनी रूग्णालयात दाखल करून माणुसकीचा परिचय घडविला. अशा घटनांची यादी आणखीही लांबू शकेल, तेव्हा मथितार्थ इतकाच की; संवेदनाहीनतेचा अंधार वाढत असला तरी त्याला भेदु पाहणाऱ्या पणत्या आपल्या क्षमतेनुसार मिणमिणत आहेतच. या पणत्यांभोवती कौतुकाचा व सहकार्याचा हात धरूया इतकेच यानिमित्ताने.