शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

हे न्यायालय की अन्यायालय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 02:14 IST

पत्नीचे वय १५ वर्षांहून अधिक असेल तर समागमासाठी तिची सहमती वा संमती असण्याचे वा घेण्याचे कारण नाही व १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीवरील नव-याचा बलात्कार हा अपराध ठरत नाही

पत्नीचे वय १५ वर्षांहून अधिक असेल तर समागमासाठी तिची सहमती वा संमती असण्याचे वा घेण्याचे कारण नाही व १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीवरील नव-याचा बलात्कार हा अपराध ठरत नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केवळ स्त्रियांवर अन्याय करणाराच नाही तर तो घटनाविरोधीही आहे. स्वातंत्र्याची सुरूवातच, माझा माझ्या देहावर पूर्ण अधिकार आहे या जाणिवेतून होते. त्यावर दुसºया कुणाला हक्क सांगता येणार नाही वा सक्ती करता येणार नाही ही व्यवस्थाच ते स्वातंत्र्य खरे व पूर्ण करीत असते. हे स्वातंत्र्य १५ वर्षांहून कमी वयाच्या स्त्रीएवढेच त्याहून वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीलाही असते. ते नवºयाने तुडविले म्हणून तो गुन्हा नाही असे सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर त्या न्यायालयाला घटनेने भारतीय जनतेला दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये निरर्थक वाटतात असे म्हणावे लागेल. देशात समान नागरिकत्व आहे आणि ते स्त्रियांनाही पुरुषांएवढेच प्राप्त आहे. स्त्री असल्यामुळे तिचे अधिकार कमी होत नाहीत आणि पुरुष असल्याने त्याला पत्नीवरील जास्तीचे अधिकारही मिळत नाहीत. त्यामुळे पत्नीवर तिच्या संमतीवाचून शारीरिक संबंध लादण्याचा पतीचा प्रयत्न कायदा, घटना व मानवाधिकार या साºयांविरुद्ध जाणारा व अन्यायकारक आहे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पत्नीची संमती या संबंधात गृहित धरली जाते. मात्र तसे गृहित धरले जाणे व पत्नीची संमती असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण जेथे असे गृहित धरणे संपले असते वा अशी संमतीही नाकारली जात असते तेथे ही परंपराच अन्यायी ठरत असते. भारतात अल्पवयीन मुलामुलींची लग्ने मोठ्या प्रमाणावर होतात. शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, असुरक्षितता व मागासलेल्या परंपरा यामुळेही हे घडत असते. तशा समाजात तर ही संमती वय झाले असो वा नसो कधी विचारात घेतली जात नाही आणि न घेणे तेथे बहुधा समाजमान्यही असते. मात्र बदललेल्या काळात व शिक्षणाचा अंगिकार केलेल्या वर्गात प्रत्येकच स्त्रीपुरुषाला तिच्या व त्याच्या अधिकाराची जाण आली असते. त्यातही लैंगिक प्रश्नाबाबतची समाजाची जाण आता वाढली असल्याचे या न्यायालयानेही आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. १५ वर्षांहून अधिक वयाच्या सुशिक्षित व अधिकारांची जाण असलेल्या स्त्रीला तिच्यावर लादलेला बलात्कार मुकाट्याने सहन करायला सांगणे न्यायालयाच्या अधिकारात कसे बसते? केवळ ती विवाहित आहे म्हणून की बलात्कार करणारा पुरुष तिचा नवरा आहे म्हणून ? पुरुषाला शरीरसुख देणे हा स्त्रीचा धर्म वा कर्तव्य आहे काय? त्याबाबत तिचे मत, मन व इच्छा याही बाबी पहायच्या असतात असे सर्वोच्च न्यायालयालाही वाटू नये काय? जागतिक संस्थांच्या पाहणीनुसार भारतातील ४७ टक्क्यांएवढ्या मुलींची लग्ने वयाच्या १८ व्या वर्षाआधीच होतात. त्यातही १८ टक्के मुलींची लग्ने १५ वर्षाआधीच झाली असतात. खरे तर आपल्या समाजात समागमासाठीच काय विवाहालासुद्धा मुलींची संमती गरजेची आहे असे ६० ते ७० टक्के पालकांनाच वाटत नाही. त्यांनी निवडलेल्या व सांगितलेल्या मुलामागून मान टाकून जाणे एवढेच तिच्या प्राक्तनात असते. ज्या मुली शरीरसंबंधांना अजून पुरेशा व आरोग्यदृष्ट्या सक्षम झाल्या नाहीत त्यांना विवाहाच्या बंधनात जखडले की त्यांची शरीरविषयक इच्छा वा अधिकार हे सारे संपुष्टात येते हे न्यायालयाला कळते की नाही ? अकाली मातृत्व आलेल्या अल्पवयीन मुलींच्या करुण कहाण्या या न्यायमूर्तींच्या कानावर कधी येतात की नाही? संमती वयाचा कायदा आणि त्यावरची चर्चा या देशात झाल्याला आता शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही या संमतीतील मुलींचा हक्क मान्य करावा असे वाटत नसेल तर आपली न्यायालये नुसती डोळ्यांवर पट्ट्या ओढूनच नाहीत तर कानात बोळे घालूनही बसली आहेत असे म्हणावे लागेल. असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील स्त्रियांवर म्हणजे ५० टक्के जनतेवर घोर अन्याय करून त्यांच्या शरीरावरचा त्यांचा हक्क नाकारला आहे. सामाजिक, धार्मिक व पारंपरिक कारणे सांगून व्यक्तीचे अधिकार नाकारण्याचा काळ कधीचाच संपला आहे. शिवाय आपल्या घटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व्यक्तींचे आहेत. ते धर्माचे, जातीचे वा कुटुंबाचे नाहीत. खरी गरज याविषयी नव्या मुलींचे व मुलांचे शैक्षणिक जागरण करण्याची आहे. त्यावर भर देऊन हा प्रश्न न्याय्य मार्गाने सोडविता येणार आहे. बाईची मान व देह तिच्या नवºयाच्या स्वाधीन केल्याने तो सुटणार नाही. त्यात सामाजिक व कौटुंबिकच नव्हे तर नागरी न्यायही नाही. आपला देश व समाज अजून मध्ययुगातच वावरत असल्याची व त्याला नव्या जगाची ओळख अजून पटली नसल्याचे सांगणारे या निकालातले वास्तव आहे. या निकालाविरुद्ध महिलांच्या संघटनांनी फेरविचारासाठी याचिका दाखल करणे गरजेचे आहे. ते देशातील जागरूक पुरुषांचेही कर्तव्य आहे. वास्तविक अशी याचिका केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयापुढे दाखल केली पाहिजे. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या या निकालपत्राचा घटनेच्या आधारे फेरविचार केला पाहिजे. अन्यथा आपले सर्वोच्च न्यायालय हे न्यायालय न राहता अन्यायालय होईल, हे त्यानेही लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Courtन्यायालय