नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर येणे आणि त्याच्या माध्यमातून संघपरिवाराने देशाचा ताबा घेणे, या घटनेचा खरा अर्थ एकट्या शरद पवारांखेरीज दुसर्या कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने गंभीरपणे समजून घेतला नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा असलेल्या आपल्या देशातले राजकारणी नेहमीच उगवत्यांच्या मागे लागले आहेत. तसे करताना ते त्यांचा पूर्वेतिहासही विसरले आहेत. रामविलास पासवान, चंद्राबाबू नायडू या राष्ट्रीय पुढार्यांपासून रामदास आठवले, दत्ता मेघेंपर्यंतच्या सार्यांची सध्याची भाजपाच्या दिशेने सुरू असलेली धावाधाव याच वास्तवाची निदर्शक आहे. लोकशाहीत सत्तापरिवर्तन ही एक अटळ बाब आहे. अमेरिकेत सामान्यपणे दर चार वर्षांनी सत्ताकारण बदलते. इंग्लंड आणि र्जमनीतही ते दर पाच वर्षांनी बदलताना आढळते. पण, सत्तेवरचा पक्ष बदलला की आपले इकडचे सारे चंबूगबाळ उचलून तिकडे जाण्याची लाजीरवाणी पद्धत त्या देशात नाही. भारतातही संघपरिवारातली माणसे वर्षानुवर्षे सत्तेबाहेर राहिली, पण त्यांनी कधी काँग्रेस वा सत्ता जवळ केली नाही. आताचा त्यांच्याकडचा वाढलेला ओघ त्यांचीही करमणूक करीत असणार आणि त्यातले जाणकार त्याविषयी एकमेकांच्या कानात हसून कुजबुजतही असणार. शरद पवारांविषयी राजकारणात अनंत संशय आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यातले जाणकार नेहमीच सांगत आले आहेत. तथापि, एका गोष्टीबाबत शरद पवारांविषयीचा विश्वास सार्यांनी बाळगला पाहिजे. ते वृत्तीने सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहेत. पूर्वी ते तसे होते, आज तसे आहेत आणि पुढेही तसेच राहणार आहेत, याविषयी कोणाच्याही मनात शंका राहू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी केलेल्या दमदार व्याख्यानाने ही गोष्ट पुन्हा एकवार सार्यांच्या लक्षात आणून दिली आहे. (शरद पवार म्हणजे प्रफुल्ल पटेल नव्हे आणि ‘माझ्या कातड्याचे जोडे त्यांच्या पायात घातले, तरी त्यांचे माझ्यावरील उपकार फिटणार नाहीत,’ असे म्हणणारे दत्ता मेघेही नव्हेत) मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील धर्मांध शक्तींनी उचल खाल्ली आहे. देशातील अल्पसंख्य, दलित व कमजोर वर्गांना त्यांनी धाक दपटशा दाखवायला सुरुवात केली आहे. पुण्यात मोहसीन शेख या २८ वर्षे वयाच्या तरुणाने केवळ मुसलमान घालतात ती स्कल कॅप डोक्यावर चढविली एवढय़ाचसाठी त्याला मारहाण करून त्याचा खून करणारी स्वत:ला हिंदू राष्ट्र सेना म्हणविणारी गुंडांची टोळी कशामुळे माजली, याचा विचार या संदर्भात महत्त्वाचा ठरावा. उत्तर प्रदेशात पंडित नावाच्या भाजपाच्या कार्यकर्त्याचा झालेला खून, ही या घटनेची प्रतिक्रिया असेल, तर या प्रकरणाचा विचार गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि बंगाल या राज्यांतले अल्पसंख्य आजच भयभीत आहेत. संघाच्या राममाधवाने ३७0 व्या कलमाची भाषा अकाली व अस्थानी उकरून काढल्याने सार्या जम्मू काश्मिरात अस्वस्थता आहे. कर्नाटक व केरळ या राज्यांत अल्पसंख्यकांची संख्या मोठी आहे आणि त्या वर्गात या सार्या घटनांमुळे भीतीची भावना निर्माण झाली आहे. आपला कोणताही एक वर्ग भीतीच्या दडपणाखाली ठेवून समाजाला पुढे जाता येत नाही. निर्भय व नि:शंक माणूस आणि समाज यांनाच स्वबळावर उभे होता येते आणि पुढेही जाता येते. मोदींचे सरकार हे केवळ भाजपाचे सरकार नाही. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेही सरकार नाही. प्रत्यक्षात ते संघाचे सरकार आहे. त्यावर संघाच्या नेत्यांचा व विचारांचा पगडा आहे. मोदी स्वत: हे वास्तव नाकारत नाहीत आणि १९७८ मध्ये दुहेरी सदस्यत्वाचा वाद पुढे करणारी मधू लिमयांसारखी सर्मथ माणसे आता राजकारणातही नाहीत. ज्यांनी हा वाद पुढे करायचा, तीच माणसे मोदींची आरती करायला हातात तबके घेऊन पुढे होताना पाहावे लागत आहे. यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुक यावर दिसणारी भगव्या परिवारातील स्त्रीपुरुषांची आक्रमकच नव्हे, तर हिंसक वाटावी अशी भाषणे व लिखाण ज्यांनी ऐकली व वाचले त्यांना शरद पवारांच्या वक्तव्यातले वास्तव नीट समजू शकणारे आहे. लोकशाहीत हिंसेची व दडपशाहीची भाषा न चालणारी आहे. ही भाषा लोकशाही मारणारीच आहे. दुर्दैवाने तिला आळा घालू शकतील अशी माणसे आज सरकारात नाहीत आणि राजकारणातही दिसत नाहीत. पुण्यात झालेल्या खुनाचा निषेध पंतप्रधानांनी केला पाहिजे, असे संपादकीय एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने परवा लिहिले. मात्र, पंतप्रधान सोडा, त्यांच्या कोणा प्रवक्त्यानेही त्याची दखल घेतल्याचे कुठे दिसले नाही. हा येऊ घातलेल्या काळाची पावले सांगणारा प्रकार आहे. ती उघड केल्याबद्दल शरद पवारांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.
शरद पवारांचे अभिनंदन..
By admin | Updated: June 10, 2014 09:14 IST