फार दिवसांनी मुंबई आनंदात आहे, मंत्रालयात पेढ्यांची खैरात आहे, पुणे-चिंचवडात बेहोशी आहे आणि काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षात दिवाळी आहे. सिंचन घोटाळ्यातले सारे आरोपी निर्दोष सुटले आहेत. अजितदादा पवार स्वच्छ आहेत आणि सुनील तटकरे बिनडाग आहेत. माधवराव चितळे नावाच्या साधुपुरुषाने सिंचन घोटाळा कांडी फिरवून नाहीसा करून दाखविण्याचे जादुई काम आपल्या अहवालातून केले आहे. परिणामी, गेली काही वर्षे अकारणच खाली माना घालून वावरणारी आपली पुण्यश्लोक माणसे आता पुन्हा ताठ मानेने फिरू लागली आहेत. त्यांची काळवंडलेली अपराधी मने कपडे धुण्याच्या नव्या साबणाने लख्ख धुतल्यासारखी पांढरीशुभ्र झाली आहेत. माणसे तशीही चांगली होती. त्या बिचाऱ्यांनी पैसे खाल्लेच नव्हते. ७0 हजार कोटी रुपये खाणे ही तशीही साधी गोष्ट नाही. आपली रोडतांगड माणसे एवढ्या नोटा खातील आणि पचवतील, हे पचनशास्त्रातसुद्धा न बसणारे वास्तव आहे. मुळात तो पैसा चितळेबुवांच्या कांडीने बहुदा लुप्तच झाला असावा आणि त्याचा आळ अकारण आपल्या राजकीय सज्जनांवर आला असावा. मोठी माणसेही कधीकधी अपराधाच्या सावटाखाली येतात. त्या श्रीकृष्णावर नव्हता का स्यमंतक मण्याच्या चोरीचा आळ आला? त्या बिचाऱ्यालाही सारे असेच नव्हते का सोसावे लागले? पण, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो चितळेबुवांच्या आशीर्वादावाचून मोकळा झाला. तो सुटला, सत्यभामेवरचे सावट गेले, रुक्मिणी प्रसन्न झाली आणि हो, त्या सोळा हजार एकशे आठ बाकीच्या बायकाही हसायला लागल्या. आताच्या चितळेबुवांच्या आशीर्वादाने पवार कुटुंब मोकळे झाले. थोरले पवार निश्चिंत आणि धाकटे पवार पुन्हा नव्या मनमानीला सिद्ध झाले. ‘माझा भाऊ मुख्यमंत्रीच झाला पाहिजे,’ असे म्हणायला सुप्रियाबाई मोकळ्या झाल्या आणि तटकरेंचा पराभवही धुवून निघाला. आपल्या महाराष्ट्राचेच एकदा काहीतरी केले पाहिजे. त्या चितळेबुवांवर त्याचा विश्वास काही केल्या बसत नाही. त्याला ते ‘लुप्त’ झालेले ७0 हजार कोटी अजून दिसतात. ते ज्यांच्या खिशात आहेत ती माणसे दिसतात. त्यांचे पालक आणि संरक्षक दिसतात. पण ती माणसे वजनदार आहेत. जुनी आहेत, त्यांना काही म्हणायचे झाले, तरी महाराष्ट्र घाबरतो. त्या बीजेपीवाल्यांचे सोडा, त्यांचे कामच ओरडणे आणि आरोप करणे हे आहे. दिल्ली हाती आल्यापासून त्यांच्या जिव्हा तशाही जास्तीच्या सैल झाल्या आहेत आणि शिवसेना? तिला तर शिव्या देण्याखेरीज दुसरे कामच नाही. तिचा नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे आणि त्याला अजून चार महिने ते डोक्यावर वागवायचे आहे. या काळात हवा भरून भरून तरी किती भरायची? भाजपावाले त्याचे ऐकत नाहीत, त्यांना दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र दिसतो. उद्धवचे मग काय करायचे? (शिवाय त्यांचे पाय ओढायला मनसेचे राज ठाकरे तिकडे उभे आहेत. त्यांचा एक पाय भाजपात आणि दुसरा राष्ट्रवादीत आहे. ही स्थिती उद्धवची कुतरओढ सांगणारी आहे.) त्यांनी किती दिवस वाट पाहायची? चितळेबुवा, तुम्ही हे चांगले केले नाहीत. तुमच्यावर किती जणांची भिस्त होती? तुमच्यावर विश्वास नसतानाही त्यांनी ती ठेवली होती. हा माणूस सरकारधार्जिणा आहे, तो सरकारी समित्यांवर असतो आणि आनंदात राहतो. शिवाय हो, त्याचे भगतगणही खूप आहेत. तेही त्याच्या प्रत्येक अहवालाला टाळ्या वाजविणारे आहेत. त्यांना हारतुरे घालणारे आणि त्यांच्या पोथ्या लिहिणारेही आहेत. (तशा पवारांच्या पोथ्या लिहिणारे विद्वानही मुंबईत मांड्या ठोकून आणि पैसे घेऊन बसल्याच्या वार्ता हवेत आहेत.) आता त्यांच्या अशा भालदार-चोपदारांच्या पोथ्या येण्यास हरकत नाही. महाराष्ट्राचे काय, ७0 हजार कोटी पुन्हा येतील, ते पुन्हा त्याच्याच खिशातून येतील, शेवटी सरकार आपले आहे. पुढारी आपले आहेत. पैसे त्यांच्या खिशात असले काय आणि आपल्या खिशात असले काय, दोन्ही सारखेच आणि ते त्यांनी खाल्ले काय आणि आपण खाऊ घातले काय सारे एकच. शेवटी सारे महाराष्ट्राच्याच अंगी लागणार आहे. दु:खाचे कारण नाही. जे पैसे बुडाले ते बुडाले. नवा पैसा उभारण्याची म्हणजे तो कराच्या रूपाने पुन्हा देण्याची तयारी आता आपण करू या. त्यांचे कल्याण झाले आहे, आपलेही ते कधीतरी होणारच आहे आणि तरीही ज्यांना शिक्षेचे समाधान हवे आहे त्यांच्यासाठी माधवबुवांनी वेगळी सोयही करून ठेवली आहे. मंत्री निर्दोष सोडले, तरी अधिकाऱ्यांना त्यांनी फास लावले आहेत. आता अधिकारी पिंजऱ्यात आणि मंत्री लालदिव्यात. महाराष्ट्राची अशी करमणूक यापूर्वी कधी कोणी केली नाही. ती केल्याबद्दल चितळेबुवांचा साऱ्यांनी एकमुखाने जयजयकारच केला पाहिजे.
चितळेबुवांचा जयजयकार
By admin | Updated: June 17, 2014 07:55 IST