सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण केले जाते आहे. आपल्या शेवटच्या भाषणात आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे सांगतात. हे सर्व मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे. गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे- १) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते.२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँगे्रस पक्षाचा होता. ३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे. ५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता. ६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. १०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती. नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही. प्रा.डॉ. अशोक चौसाळकर(राजकीय विश्लेषक)
गांधींची हत्त्या आणि नथुराम भक्तांचा कुप्रचार
By admin | Updated: May 26, 2015 23:47 IST