शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिरल रामदासांची चिंता

By admin | Updated: October 26, 2015 22:51 IST

भारतीय राजकारणावर हिंदुत्वाचा एकारलेला बहुसंख्यांकवाद पद्धतशीरपणे लादण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न देशाच्या ऐक्याला व त्याच्या सर्वसमावेशक स्वरुपाला घातक

भारतीय राजकारणावर हिंदुत्वाचा एकारलेला बहुसंख्यांकवाद पद्धतशीरपणे लादण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न देशाच्या ऐक्याला व त्याच्या सर्वसमावेशक स्वरुपाला घातक असून त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची विनंती भारताचे माजी आरमार प्रमुख एल. रामदास यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका विस्तृत पत्रातून केली आहे. रामदास यांचे वय आता ८० वर्षांचे असून वयाच्या १४ व्या वर्षापासून तब्बल ४५ वर्षे त्यांनी भारतीय नाविक दलाची सेवा केली आहे. त्याच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतरच्या वृद्धापकाळात त्यांना देशाविषयी वाटत असलेली चिंता त्यांनी या पत्रात फार स्पष्टपणे उघड केली आहे. बहुसंख्यकांच्या हिंदुत्ववादी गटांनी देशात उभा केलेला धार्मिक उन्माद येथील लोकशाहीला व घटनेला घातक ठरणारा आहे असे बजावून रामदास म्हणतात, या उन्मादाने देशातील अल्पसंख्यकांच्या मनात, विशेषत: मुस्लीम, ख्रिश्चन, दलित व आदिवासींच्या जीवनात एक दहशत उभी केली आहे. हे समाज या दहशतीच्या अंधारात वावरत असून त्यांची होत असलेली गळचेपी हा आपला विजय असल्याचा भ्रम घेऊन ही एकारलेली हिंदुत्ववादी माणसे देशात त्यांना हवा तसा धुमाकूळ घालत आहेत, असा आरोप रामदास यांनी केला आहे. भारताचे धर्मबहुल स्वरुप नाहीसे करून त्याचे हिंदू राष्ट्रात रुपांतर करण्याचा संघाचा प्रयत्न जुना तसाच तो पद्धतशीर व आक्रमकही आहे, असे सांगून रामदास म्हणतात, मी स्वत:ही हिंदू आहे मात्र माझे हिंदू असणे सर्वसमावेशक व देशातील साऱ्यांवर प्रेम करणे शिकविणारे आहे. माझ्यावरील हिंदू संस्काराने मला हिंसा वा असहिष्णुता शिकवली नाही. आताचे संघाचे हिंदुत्व देशात पुन्हा एकवार फाळणीचे ज्वालाग्राही वातावरण उभे करणारे व साऱ्या समाजात भीतीचे वातावरण उत्पन्न करणारे आहे. एवढी वर्षे देशाच्या नाविक दलात घालविल्यानंतर आता वयाच्या ८० व्या वर्षी देशाच्या या चित्राने मला माझी मान खाली घालायला लावली आहे. संघाच्या हिंदुत्वाचे आक्रमक स्वरुप २०१४ च्या निवडणुकीनंतर अधिक धारदार व भयकारी झाले असल्याचे सांगून रामदास यांनी हिंदुंच्या अशा झुंडींनी देशात ठिकठिकाणी केलेल्या हिंसाचाराची उदाहरणे आपल्या पत्रात नमूद केली आहेत. या देशातील नागरिकांना ते त्यांची देशभक्ती सिद्ध करायला आता सांगू लागले आहेत. अल्पसंख्यांकांच्या पूजास्थानांवर हल्ले होत आहेत आणि त्यांची विटंबना केली जात आहे. हाच प्रकार दलित व आदिवासींबाबतही होताना मी देशात पाहत आहे असे या पत्रात लिहून रामदास म्हणतात, मी नाविक दलाचे नेतृत्व केले आहे. भारताचे नाविक दल, हवाई दल वा लष्कर यात सर्व जातीधर्माचे व पंथांचे सैनिक आहेत आणि त्यांचे देशप्रेम बावनकशी आहे. देशात उभ्या होत असलेल्या आताच्या धर्मांध राजकारणाचा आपल्या लष्करावर केवढा विपरित परिणाम होत असेल आणि त्यातल्या सैनिकांना त्याने केवढे असुरक्षित वाटायला लावले असेल या चिंतेने मला ग्रासले आहे. दुर्दैव हे की अशा धर्मांधतेला उघडपणे खतपाणी घालण्यात सध्याच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य व संसदेचे सभासद आघाडीवर आहेत. आपण करीत असलेला उन्मादी प्रचार जनतेएवढाच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही अनिष्ट परिणाम करू शकतो याचीही साधी जाणीव नसलेली ही उठवळ माणसे आहेत. दु:ख याचे की या उठवळांना अडविण्यासाठी व त्यांना वेसण घालण्यासाठी देशातील एकही सर्वोच्च नेता पुढे येताना दिसत नाही. आताच्या उन्मादासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरताना रामदास म्हणतात, या संघटनेने दिलेल्या चिथावणीमुळे देशातील अनेक लहानसहान गट हिंसक बनले व त्यांनी अनेक राज्यात हत्त्याकांडे घडवली आहेत. त्यांना देश, कायदा, घटना, समाज व संस्कृती आणि त्या साऱ्यांनी आपल्याला शिकविलेली सहिष्णुता यांच्याशी काहीएक घेणेदेणे नाही. एका धार्मिक उन्मादापायी ही माणसे त्यांचे देशकर्तव्य विसरली आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी कोणीही पुढे होताना न दिसणे ही राष्ट्रीय शोकांतिका आहे. रामदास आपल्या पत्रात असेही म्हणतात की सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले, या घटनांकडे क्षुल्लक म्हणून पाहू लागले असावे अशी मला शंका येते. हा सारा आगीशी खेळण्याचा प्रकार आहे. लोकांचा एक समूह इतर साऱ्यांविरुद्ध उभा करण्याचा हा डाव आहे. यातून केवळ धर्मांधताच वाढत नाही तर वंशवाद वाढीला लागून त्याचे रुपांतर फॅसिझममध्ये होत असते. या घटनाक्रमाने देशाची आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतिमाही मलीन केली आहे याचेही दु:ख कोणाला होत नसल्याचे पहावे लागणे याएवढे मोठे दुर्दैव दुसरे नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपतींनी या देशाच्या घटनेचे संरक्षण करण्याची शपथ दिली आहे. या शपथेचा विसर या देशाच्या सुरक्षेएवढाच त्याच्या एकात्मतेला धोका उत्पन्न करणारा आहे. केंद्र व राज्य सरकारांनी तात्काळ जागे होणे व देशातील धर्मांध शक्तींना आणि त्या जागविणाऱ्या संघटनांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. देशाच्या आरमाराची वस्त्रे साडेचार दशके अंगावर वागविलेल्या एका ज्येष्ठ व वयोवृद्ध अ‍ॅडमिरलची ही चिंता आहे व तिचे निराकरण करणे देशाच्या राजकीय नेतृत्वाचे कर्तव्य आहे.