शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: एमआयएमची पतंगबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 07:27 IST

इम्तियाज जलील यांनीच माध्यमांना दिली आणि त्यावर वृत्तवाहिन्यांनी दिवसभर दळण घातले. 

सगळीकडे पेटत्या होळीभोवती बोंबा मारल्या व धुळवडीला शिव्यांची लाखोली वाहिली जात असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या बिनदोरीच्या राजकीय पतंगबाजीने जोरदार मनोरंजन सुरू आहे. अर्थात धुळवडीला एकमेकांना शिव्या घालण्याऐवजी ओव्या गाण्याचा हा प्रकार आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-हत्तेहादूल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम किंवा एमआयएम या महाराष्ट्राच्या गेल्या तीन निवडणुकीत चर्चेत आलेल्या पक्षाने म्हणे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत आम्हाला घ्या, असे निमंत्रण दिले. निमंत्रणाची भाषा मात्र वेगळी आहे. तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची बी टीम समजता ना, मग शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आम्हाला घ्या आणि आमच्या धर्मनिरपेक्षतेची खातरजमा करून घ्या, असे ते निमंत्रण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे हे एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले असता, त्यांच्याकडे दोन्ही काँग्रेससाठी हा निरोप देण्यात आला. ही माहिती इम्तियाज जलील यांनीच माध्यमांना दिली आणि त्यावर वृत्तवाहिन्यांनी दिवसभर दळण घातले. 

एमआयएमच्या या नव्या चुंबाचुंबीच्या प्रयत्नाला २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पृष्ठभूमी आहे. लोकसभा निवडणूक हा पक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीसोबत लढला. भाजप-सेना युती व दोन्ही काँग्रेसची आघाडी यांच्या मुख्य लढतीत अनेक जागा या तिसऱ्या आघाडीने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसला गमवाव्या लागल्या. त्यामुळे एमआयएमची आघाडीने धास्ती घेतली. पण, विधानसभा निवडणुकीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचा संसार मोडला. दोघेही स्वबळावर लढले. त्याचे कारण लोकसभेवेळी आंबेडकरांच्या पक्षाची मते एमआयएमला मिळाली, पण एमआयएमचा काहीही फायदा वंचितला झाला नाही. एमआयएमने केवळ औरंगाबाद ही लाेकसभेची एकच जागा लढवली. चंद्रकांत खैरे व अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यातील मतविभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला व ते अवघ्या साडेचार हजार मतांनी विजयी झाले. हैदराबादचा प्रादेशिक पक्ष असलेल्या एमआयएमचा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रवेश तेलंगण सीमेवरच्या नांदेड महापालिकेत २०१२मध्ये झाला. याठिकाणी ११ नगरसेवक निवडून आले. पण, पुढच्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे पंचवीस नगरसेवक निवडून आले. 

तिथूनच इम्तियाज जलील आधी आमदार व नंतर खासदार झाले. बिहार निवडणुकीत एमआयएमने राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसचे गणित बिघडवले. एमआयएमचे आमदार निवडून आले पाचच, पण त्यांनी राजद-काँग्रेसच्या अनेक जागा पाडल्या. त्याचा धडा आधी पश्चिम बंगालच्या व नंतर उत्तर प्रदेशच्या मतदारांनी घेतला. बंगालमध्ये भाषेची अडचण होती आणि उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा यश मिळविले असले, तरी त्यात एमआयएममुळे झालेल्या मतविभाजनाचा तितकासा फायदा झालेला नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभेवेळच्या मतविभाजनाचा धडा विधानसभा निवडणुकीवेळी घेतला. 

मालेगाव व धुळे या लगतच्या मतदारसंघांत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले खरे. पण, तरीही त्या पक्षाला ४४ जागा लढवून जेमतेम ७ लाख ३८ हजार म्हणजे १.३४ टक्के मते मिळाली. याउलट २३६ जागा लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नसला, तरी साडेचार टक्के अर्थात पंचवीस लाखांहून अधिक मते त्यांना मिळाली. या भानगडीत एमआयएमची राजकीय विश्वासार्हता जवळपास संपली आहे. त्यामुळेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रस्तावाची बोळवण करताना, आधी तुम्ही भाजपची बी टीम नाही हे कृतीने सिद्ध करा मग पुढचे बोलू, असे सुनावले आहे. अनेकांना असे वाटते की, एमआयएम हा हिंदू मतांना भीती दाखविण्यासाठी भाजपकडून वापरला जाणारा बागुलबुवा आहे. एमआयएमच्या नेत्यांनी स्फोटक बोलायचे, त्याला हिंदुत्ववादी पक्षांनी तितकीच स्फोटक उत्तरे द्यायची. त्यातून निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि दोन्हीकडून मतांचे पीक कापायचे, असेच होत आले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मिळालेले उत्तर अपेक्षित असेच आहे. भाजपचे नेते व आयटी सेलकडून लगेच शिवसेनेवर टीका आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जनाब वगैरे टाेमणे सुरू झाले तेही अपेक्षितच.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण