शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

सावध ऐका पुढल्या हाका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:08 IST

केशवसुतांच्या 'तुतारी' या गाजलेल्या कवितेतील 'सावध ऐका पुढल्या हाका' ही ओळ आठवण्याचे कारण म्हणजे, यावर्षीचा सप्टेंबर ज्ञात इतिहासातील सर्वांत उष्ण सप्टेंबर ठरला, तर २०२३ हे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे

केशवसुतांच्या 'तुतारी' या गाजलेल्या कवितेतील 'सावध ऐका पुढल्या हाका' ही ओळ आठवण्याचे कारण म्हणजे, यावर्षीचा सप्टेंबर ज्ञात इतिहासातील सर्वांत उष्ण सप्टेंबर ठरला, तर २०२३ हे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे, ही अस्वस्थ करून सोडणारी बातमी! कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सीएस) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२३ मधील भूपृष्ठावरील सरासरी तापमान, १९९१ ते २००० या कालावधीतील सप्टेंबर महिन्यांच्या सरासरी तापमानाच्या सरासरीपेक्षा तब्बल ०.९१ अंश सेल्सिअसने जास्त होते. याचाच अर्थ अवघ्या दोन दशकांच्या कालावधीत जवळपास एक अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. हे भयंकर आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक तापमानवाढीवर केवळ संशोधकांमध्येच चर्चा होत असे परंतु ती कटू वस्तुस्थिती असल्याची जाणीव आता सर्वसामान्यांनाही होऊ लागली आहे.

त्यामागील कारण म्हणजे तापमानवाढीचे दुष्परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागले आहेत, जाणवू लागले आहेत, अनुभवायला मिळत आहेत. सध्या सिक्कीम आणि बिहारमध्ये सुरु असलेले पुराचे थैमान हा जागतिक तापमानवाढीचाच दृश्य दुष्परिणाम आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरच दुष्परिणाम दृष्टीस पडत आहेत. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर, वणवे, हिमनद्या व हिमनगांचे वितळणे, समुद्राच्या जलपातळीतील वाढ अशा विविध मार्गांनी निसर्ग मनुष्यजातीस पुढील मोठ्या धोक्यांची जाणीव करून देत आहे. पण, दुर्दैवाने मनुष्यजात काही निसर्गाच्या सावधगिरीच्या हाका ऐकायला तयार नाही! भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात तर हे दुष्परिणाम जास्तच ठळकपणे दृग्गोचर होत आहेत. उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, ढगफुटी, पूर आणि अवर्षणाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत किती तरी वाढले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान, जलटंचाई, पायाभूत सुविधांची हानी अशा संकटांना हल्ली वारंवार सामोरे जावे लागत आहे. सध्या सिक्कीम आणि बिहारमध्ये पुराने घातलेले थैमान आणि त्यामुळे होत असलेली जीवित व वित्त हानी, भविष्यात समोर काय वाढून ठेवले आहे, याची जाणीव करून देत आहे. हरितगृह वायू उत्सर्जन हे जागतिक तापमानवाढीमागील सर्वात प्रमुख कारण आहे, हे एव्हाना सर्वमान्य झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसंदर्भातही एकमत आहे. परंतु त्यामध्ये कोणी किती वाटा उचलायचा, यावरून दुर्दैवाने भांडणे सुरूच आहेत. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करावयाचे असल्यास कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करून, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारखे शाश्वत ऊर्जास्रोत विकसित करणे गरजेचे आहे.

दुर्दैवाने अद्यापही पारंपरिक इंधनांच्या तुलनेत हे ऊर्जास्रोत महागडे आहेत आणि त्यामुळे अविकसित व विकसनशील देशांना परवडण्यासारखे नाहीत. विसाव्या शतकात विकसित देशांनी जीवाश्म इंधनांचा वारेमाप वापर करून स्वतःचा विकास साध्य करून घेतला आणि आता ते अविकसित व विकसनशील देशांना जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांची भीती दाखवून, महागड्या शाश्वत ऊर्जास्रोतांचा वापर करण्यासाठी दबाव निर्माण करीत आहेत. त्यामुळे या मुद्यावरून जगात दोन गट पडले आहेत. आम्ही जीवाश्म इंधनांचा वापर कमी करायला तयार आहोत. परंतु, पूर्वी विकसित देशांनी केलेल्या जीवाश्म इंधनांच्या वारेमाप वापरामुळे झालेल्या जागतिक तापमानवाढीची भरपाई म्हणून त्यांनी आम्हाला शाश्वत ऊर्जास्त्रोतासाठी वित्तीय व तांत्रिक मदत करावी, अशी भूमिका अविकसित व विकसनशील देशांनी घेतली आहे. या भांडणात वसुंधरा आणि मनुष्यजातीचे अपरिमित नुकसान होत आहे. उभय बाजू जेवढ्या लवकर टोकाची भूमिका सोडून लवचीक धोरण स्वीकारतील, तेवढे सगळ्यांसाठीच बरे होईल! सर्वसामान्य माणसानेही तापमानवाढीच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याची वेळ आता आली आहे. मी काय करू शकतो, माझ्या सहभागामुळे असा कोणता फरक पडणार आहे, ते सरकारचे काम आहे. ही भूमिका सर्वसामान्य माणसाने सोडून देण्याची वेळ आता आली आहे. तापमानवाढ कमी करण्यासाठी जगातील सरकारे जेवढा वाटा उचलू शकतात, त्यापेक्षा जास्त वाटा सर्वसामान्य एकत्रितरीत्या उचलू शकतात. आपल्या कुटुंबाच्या पातळीवर जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे आणि शाश्वत ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे, हे प्रत्येकाला शक्य आहे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी प्रत्येकाने ते करायलाच हवे. अन्यथा, काही काळानंतर निसर्ग हाका ऐकायलाही वेळ देणार नाही !