शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

प्रगत राष्ट्रवादाकडून उन्मादी राष्ट्रवादाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 04:53 IST

दोन दिवसांत दोन अगदी वेगवेगळ्या घटना घडल्या, तसंच एका जुन्या घटनेची आठवण करून देणारा दिवसही येऊन गेला.

दिवाळीत पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवसांत दोन अगदी वेगवेगळ्या घटना घडल्या, तसंच एका जुन्या घटनेची आठवण करून देणारा दिवसही येऊन गेला. भोपाळच्या मध्यवर्ती तुरूंगातून पळून गेलेल्या ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या संघटनेच्या आठ जणांशी पाडव्याच्या दिवशी पोलिसांची चकमक झाली आणि त्यात ते सारे जण मारले गेले. नंतर भाऊबिजेच्या दिवशी देशातील एक प्रमुख इंग्रजी वृत्तवाहिनी असलेल्या ‘टाइम्स नाऊ’ चे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली. त्याआधी पाडव्याच्या दिवशी इंदिरा गांधी यांच्या हत्येला ३२ वर्षे पूर्ण झाली आणि तोच दिल्लीत झालेल्या शिखांच्या शिरकाणाचा ३२ वा स्मृतिदिनही होता.इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे भीषण शिरकाण झाले. जवळ जवळ साडे तीन हजार शीख पुरूष, बायका-मुलं मारली गेली. इंदिरा गांधी यांची हत्या केली, ती खलिस्तानी दहशतवाद्यांनी. कारण होेते, ते त्यांच्या सरकारने केलेल्या सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचे. ही हत्या खलिस्तानी म्हणजे शीख- दहशतवाद्यांनी केली म्हणून दिल्लीत शीखांचे हत्याकांड घडवून आणण्यात आले.पाकच्या पुढाकारानं जर्नेलसिंह भिन्द्रावाले सुवर्ण मंदिरातून जून १९८४ च्या पहिल्या काही दिवसांत ‘स्वतंत्र खलिस्तान’ची घोषणा करणार होता. त्याचा अंदाज येताच इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्याचा निर्णय घेतला. परिणामाची पूर्ण कल्पना असूनही. त्याची किंमतही त्यांना स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन मोजावी लागली. मात्र खलिस्तानच्या मागणीला खतपाणी घातले, ते काँगे्रसनेच, हेही तेवढंच खरं आहे. पंजाबात अकाली व जनता पक्ष यांच्या आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्ण्यासाठी झैलसिंग यांनी संजय गांधी यांच्यासह भिन्द्रनवाले या एका ग्रंथीला (कीर्तनकाराला) हेतूत: पुढे करून खलिस्तानचा नारा द्यायला लावला. त्यासाठी ‘शीख स्टुडन्ट्स फेडरेशन’ला उचकावण्यात आलं. या संघटनेची जी बैठक झाली, त्याची सर्व आर्थिक व इतर जबाबदारी झैलसिंग यांनी घेतली होती. एकदा हे खलिस्तानचं वारं घोंघावू लागल्यावर, सीमेपलीकडच्या पाकिस्तानात भुत्ते यांना फासावर लटकावून सत्तेवर आलेल्या जनरल झिया-ऊल-हक यांना, १९७१ च्या बांगलादेश युद्धातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारताच्या विरोधातील छुप्या युद्धाची जी रणनीती लष्करानं आखली होती, तिची अंमलबाजवणी करण्याची सुवर्णसंधी मिळाली. शेवटी या सगळ्यीची परिणती इंदिरा गांधी यांच्या हत्येत व शिखांच्या शिरकाणात झाली.या ३२ वर्षांपूर्वीच्या घटना आणि त्या वेळचा माहोल आठवला की, सध्याच्या राजकीय-सामाजिक चर्चाविश्वात जो काही धुमाकूळ चालू आहे, त्याच्याशी असलेला फरक ठळकपणं जाणवतो. देशाच्या पंतप्रधानाची हत्या झाली होती. देशाच्या राजधानीत भीषण हत्याकांड घडलं होतं. दहशतावादाचं गडद सावट देशावर धरलं गेलं होतं. देशाच्या भवितव्याची चिंता होती. देश कसा पुढं जाईल, याबाबत साशंकता होती. आजच्या तुलनेत देशापुढं भलं मोठं आव्हान होतं. पण त्या काळातील चर्चाविश्व देशभक्ती व देशद्रोह या समीकरणानं व्यापलं गेलेलं नव्हतं. काँग्रेसनंच शिखांचं शिरकारण घडवून आणलं होतं. इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या दोघा शीख शरीररक्षकांनी केली म्हणून. पण शीख समाजाला काँगे्रसनं देशद्रोही ठरवलं नाही. शिखांच्या शिरकाणाबाबत काँगे्रसला जबाबदार धरणाऱ्यांना, या हत्याकांडातील सहभागाबाबत काँगे्रस नेत्यांवर कारवाई व्हावी म्हणून आंदोलनं करणाऱ्यांना, ‘देशाच्या शत्रूंच्या बाजूनं कसे काय बोलता’, असा सवाल कधीच विचारला नाही. आज नेमकं तेच घडतं आहे आणि भोपाळ येथील तुरूंगातून पळून गेलेले ‘सिमी’चे तरूण चकमकीत मारले गेल्यानं गदारोळ उडाल्यावर, ‘देशाच्या सीमेवर सैनिक शत्रूचा मुकाबला करीत असताना त्यांच्या हस्तकांना पोलिसांनी ठार मारलं, तर गदारोळ का उडवता, देशाच्या श्त्रूंना पाठबळ का देता’, असा सवाल उघडपणे विरोधकांना भाजपा व मोदी सरकारातील मंत्री विचारीत आहेत....आणि मुख्य प्रवाहातील बहुसंख्य प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांत (सोशल मीडिया) हाच सूर लावला जात आहे. असा हा ‘देशभक्ती’ व ‘देशद्रोह’ या विभागणीचा सूर लावणाऱ्या प्रसार माध्यमांतील दिग्गजात सर्वात आघाडीवर होते, ते ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी. प्रसार माध्यमांचे नीतिनियम व पत्रकारितेची सर्व कर्तव्यं व मर्यादा पार वाऱ्यावर सोडून त्यांनी सरळ ‘देशद्रोह्यां’च्या विरोधात मोहीमच उघडली होती आणि देशाला सध्या ‘देशभक्ती’ची कशी गरज आहे, याचं कीर्तन ते आपल्या दररोजच्या कार्यक्र मात करीत होते. पत्रकार असण्यापेक्षा ते प्रचारकच बनले होते. आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि नवी वृत्तवाहिनी सुरू करून ते याच व्यवसायात राहणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आजकालच्या जमान्यात कोणी एकटा दुकटा पत्रकार वा त्याचा गट कोणतीही वृत्तवाहिनी सुरू करू शकत नाही, इतकं ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’चं अर्थकारण गुंतागुंतीचं बनलं आहे. तेव्हा शक्यता अशी आहे की, गोस्वामी यांना पुढं करून एखादा उद्योगसमूह जोडीला परदेशी गुंतवणूक घेऊन नवी वृत्तवाहिनी सुरू करण्याच्या बेतात असावा. या वृत्तवाहिनीचा अजेंडा हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरेल, असं वळण साऱ्या राजकीय--सामाजिक चर्चा विश्वाला देण्याचा असू शकतो. गोस्वामी यांनी जो स्वत:चा ‘ब्रँड’ बनवला आहे, त्याचा उपयोग करून घेण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पुढील लोकसभा निवडणुकीला सव्वा दोन वर्षे राहिली असताना हे घडते आहे, ही गोष्टही लक्षात घेण्याजोगी आहे. एकूणच रोख दिसत आहे, तो उन्मादी राष्ट्रवादाचा माहोल तयार करण्याचा. सैन्यदलं वा पोलीस यांच्या कोणत्याही कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करणं, मतभेद व्यक्त करणं, हा देशद्रोह आहे, हे जनमनात रूजवण्यावर सारा भर दिला जाताना दिसत आहे. ‘शत्रू’ला कसले कायदे व नियम, त्याला मारूनच टाकले पाहिजे, हा लोकशाही राज्यव्यवस्थेत निषिद्ध मानला गेलेला विचार प्रमाण ठरविण्याकडं राज्यसंस्थेचा कल वाढतना दिसत आहे.स्वातंत्र्यानंतर आपण प्रगत राष्ट्रवादाची कास धरली होती. नंतर इंदिरा गांधी यांच्या काळापासून या प्रगत राष्ट्रवादाला सत्तेच्या संधीसाधू राजकारणाची कसर लागली. त्याचा फायदा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिल्लीतील सत्ता ताब्यात घेतली. आता आपण उन्मादी राष्ट्रवादाकडं वाटचाल करू लागलो आहोत, हे दर्शवणाऱ्या या घटना आहेत. -प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)