शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१२०० ते ६ लाख !

By admin | Updated: October 17, 2016 04:57 IST

फडणवीस सरकारने अगदी अलीकडे आर्थिक दुर्बलतेची केलेली नवी व्याख्या आहे वार्षिक ६ लाखांचे उत्पन्न.

साठ-सत्तरच्या दशकात म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या काळात आर्थिकदृष्ट्या मागास किंवा दुर्बल कोण हे निश्चित करण्याचा निकष होता, वार्षिक १२०० रुपयांचे उत्पन्न ! याचा अर्थ ज्या पालकाचे रोजचे उत्पन्न ३.२८ रुपये असेल त्याचा पाल्य शैक्षणिक शुल्कात संपूर्ण माफी मिळविण्यास पात्र ठरत असे. राज्यातील फडणवीस सरकारने अगदी अलीकडे आर्थिक दुर्बलतेची केलेली नवी व्याख्या आहे वार्षिक ६ लाखांचे उत्पन्न. याचा अर्थ ज्या पालकाची रोजची मिळकत १६४३.८३ रुपयांहून कमी असेल त्याची पाल्ये शिक्षण शुल्कात निम्मी सवलत म्हणजे अर्धनादारी मिळण्यास पात्र ठरणार आहेत. याच वेळी दारिद्र्यरेषा निश्चित करण्याचे जे विभिन्न मापदंड आहेत, त्यानुसार देशाच्या ग्रामीण भागात ५४, तर शहरी भागात ७२ रुपयांचे दरडोई उत्पन्न हा निकष संबंधितास दरिद्री घोषित करतो. अर्थात ही व्याख्यादेखील सर्वमान्य नाहीच. थोडक्यात कशाचाच कशाला मेळ नाही. गेल्या पाच-सहा दशकांमध्ये वेळोवेळी झालेली चलनवाढ लक्षात घेता पन्नास वर्षांपूर्वीच्या तीन रुपयांची किंमत आज जर १६०० रुपयांहून अधिक झाली असेल तर त्याचा अर्थ रुपया अंमळ जास्तीच घसरत गेला आणि त्या प्रमाणात महागाईत प्रचंड वाढ झाली. असेल तसेही असेल. पण त्यामुळे फडणवीस सरकारने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयाचे मोल कमी होत नाही. कालपर्यंत अन्य मागासवर्गीयांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात जी सवलत मिळत होती ती आता सरकारने समाजातील सर्वच जातींसाठी खुली करून दिली आहे. अर्थात त्यातदेखील दोन वर्ग आहेत. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते सहा लाख रुपये या चौकटीत असेल त्यांना शैक्षणिक शुल्कात अर्धनादारी प्राप्त करायची तर किमान साठ टक्के गुणप्राप्तीची अर्हता निर्धारित केली गेली असून, ज्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखांहूनही कमी असेल त्यांच्या पालकांसाठी अशी कोणतीही किमान अर्हता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जशी झपाट्याने चलनवाढ होते आहे तशीच परीक्षा पद्धतीत गुणवाढदेखील होत असल्याने साठ टक्के गुण मिळविणे फारसे कठीण नाही. ते सहजी मिळतात. सरकारच्या या नव्या निर्णयानुसार अर्धनादारी मिळविण्यासाठी आता जातीच्या नव्हे, तर उत्पन्नाच्या दाखल्याची अनिवार्यता निर्माण होणार असल्याने तो बदलही क्रांतिकारकच म्हणावा लागेल. अर्थात दाखला कोणताही असो, तो मिळविणे आता फार जिकिरीचे राहिलेले नाही! सरकारच्या या निर्णयाचा आर्थिक दुर्बलतेपायी शिक्षणापासून वंचित राहावे लागणाऱ्यांना तर लाभ होईलच होईल; पण अभियांत्रिकीची खासगी महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थांना तो अधिक होईल. सरकारने ज्यांना अर्धनादारीची सवलत लागू केली आहे, त्यांनी प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शुल्क भरणे क्रमप्राप्त असून, त्यातील निम्म्या रकमेचा त्यांना सरकारकडून परतावा दिला जाणार आहे. तो पुन्हा संबंधित संस्थांकडेच दिला जाईल आणि त्यानंतर या संस्थांनी तो संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोचता करावा अशी अपेक्षा राहील. पण सरकारकरवी परताव्याची रक्कम नक्की केव्हा मिळेल आणि मिळेल की नाही याची काही शाश्वती नाही. कारण मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची काहीशे कोटी रुपयांची थकबाकी आजही सरकारच्या नावावर शिल्लक आहे. याचा अर्थ खासगी संस्थांचे यात काहीही नुकसान नाही. सरकारने त्यांच्याकडे परताव्याची रक्कम सुपूर्द केली तरच त्यांच्यावर काही जबाबदारी येऊन पडेल आणि जेव्हा केव्हा तसे होईल तोपर्यंत त्यांना लाखो रुपये बिनव्याजी वापरण्याची मुभा राहील. यात खोटी हजेरीपत्रके आणि जे तत्सम प्रकार सर्रास केले जातात त्यांचा विचारच केलेला नाही. यासंदर्भात एका दिवंगत खासदाराच्या समोर घडलेला एका दिवंगतच मुख्यमंत्र्याचा किस्सा मोठा मनोज्ञ आहे. मुख्यमंत्र्यांचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे बिअर बारचा परवाना मिळावा म्हणून गेला असता, त्या मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितले, ‘वेडाच आहेस. बिअर बार काय मागतोस, डीएड कॉलेज किंवा पॉलिटेक्निक माग, त्यात कितीतरी पटींनी अधिक पैसा आहे’! तरीही पाच-पंचवीस संस्थाचालकांचे उखळ पांढरे होतानाच दोन-पाच लाख विद्यार्थ्यांचे भले होत असेल तर कोणालाही तक्रार करण्याचे काहीएक कारण नाही. प्रश्न इतकाच की खरोखरीच असे भले होणार आहे का? सरकारने देऊ केलेल्या शुल्कमाफीचा लाभ घेऊन आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी अभियांत्रिकीची पदविका वा पदवी प्राप्त करतीलही, पण पुढे काय? मध्यंतरी उत्तर प्रदेशातील एका वृत्ताने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. साध्या शिपायाच्या जागेसाठी अनेक कथित उच्च विद्याविभूषितांनी अर्ज केले होते. रोजगाराच्या संदर्भात इतकी अवघड परिस्थिती आहे. याचा अर्थ नुसत्या बेकारांऐवजी सुशिक्षित वा उच्चशिक्षित बेकारांच्या संख्येत वाढ होणे इतकेच त्यातून घडेल. देशातील विद्यमान मोदी सरकारच्या बाबतीतही आज तोच टीकेचा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सरकार रोजगार निर्मितीच्या बाबतीत गेल्या अडीच वर्षात फारसे काही करू शकलेले नाही.