धुळे : जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ८ व ९ आॅगस्ट असे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पूरस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून बुधवारी सकाळी प्रतिसेकंद ८ हजार ५१५ क्युसेस विसर्ग करण्यात येत असून तो सुरूच ठेवून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. बुराई धरणातूनही प्रतिसेकंद १ हजार ९०० क्युसेस विसर्ग करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग करून तसेच त्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. साक्री तालुक्यातील पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या प्रकल्पांमधून ओसंडणारे पाणी अक्कलपाडा धरणात येत असून पाऊसही होत असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. त्याच पद्धतीने बुराई धरणाच्या साठ्यातही वाढ होत असल्याने विसर्ग करण्यात येत आहे.दरम्यान जिल्ह्यात ८ व ९ आॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
धरणांमधून विसर्ग सुरूच, सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:33 IST