हगणदारीमुक्तीची (ओडीएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे
बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे.
नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी द्वितीयस्तर हगणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी, तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत उतरविण्यासाठी वृत्तपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमांतून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ मार्गदर्शिकेप्रमाणे हगणदरीमुक्त शाश्वतता आणि शोषखड्ड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन १५ वा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.
पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची (वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर) माहिती स्वच्छ
भारत मिशन (ग्रामपंचायत) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीएम-२.० मोबाइल ॲप्लिकेशनमधून नोंदीत करावी, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान यशस्वी होईल यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले.