लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीचे लग्न असतानाच होमगार्डमध्ये कार्यरत असलेल्या भावाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे तालुक्यातील वडजाई गावात शनिवारी दुपारी घडली़ रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ एकीकडे घरात लग्नाची धामधूम सुरु असतानाच आत्महत्येच्या घटनेमुळे दु:खाचे सावट कोसळले़वडजाई येथील शेतकरी नंदलाल पुंजू सुर्यवंशी हे शेती व्यवसाय करतात त्यांना कपिल (सोनु) व कविता अशी दोन मुले आहेत. कपिल हा शिक्षण घेत होता़ शिक्षण घेत असतानाच तो होमगार्डमध्ये भरती झाला होता़ सुटीच्या दिवशी तो शेतात वडिलांना सर्वोतोपरी शेती कामांमध्ये मदत करीत असे़ नंदलाल सुर्यवंशी हे शेती व्यवसाय करुन परिवाराचा उदरनिर्वाह करित गरीब परिस्थितीशी झुंज देत आपला परिवार सांभाळत होते. त्यांची एकुलती एक मुलगी कविता हिचा विवाह येत्या १२ मार्च रोजी वडजाई गावात होणार होता़ लग्नपत्रिका वाटपासह विवाहाची संपूर्ण तयारी पुर्णत्वास आली होती. लग्न सोहळा असल्याने जवळीचे वºहाडी येण्यास सुरुवात झाली असतानाच ‘लग्नासाठी कपडे नंतर घे’ असे वडीलांनी सांगितल्याचा राग आल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कपिलने आत्महत्या केल्याने घरातील सर्वच सुन्न झाले आहेत़१२ मार्च रोजी कविताचे लग्न आहे़ त्याची धामधूम घरी सुरु झाली आहे़ त्यातच ही दुर्घटना घडल्यामुळे गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ रविवारी सायंकाळी ५ वाजता कपिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले़ शोकाकूल वातावरण आहे़
लग्नाची धामधूम असतानाच आत्महत्येमुळे दु:खाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:06 IST