कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासन, प्रशासनातर्फे वारंवार कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात येत आहे. मात्र, या सूचनांबाबत ग्रामीण भागात अजूनही फारसे गांभीर्य आहे, असे दिसत नाही. मृत्यूंचे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक असतांनाही बहुतेक गावांमध्ये आजही मास्क लावले जात नाही, सामाजिक अंतर राखले जात नाही. सार्वजनिक कार्यक्रमांनाही पूर्वीप्रमाणेच गर्दी होत आहे. वारंवार हात धुणे, नाका-तोंडाला वारंवार हात न लावणे या गोष्टीचा संबंध दिसून येत नाही. परिणामी ग्रामीण भागातही कोरोनाचे पाळेमुळे घट्ट पसरलेले आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळतात, तेथे काही दिवस काळजी घेतली जाते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याचे दिसून येत आहे.
धुळे तालुक्यात बाधितांची संख्या सर्वाधिक १८ हजार ९३९ एवढी असून, आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०५ जणांचा मृत्यू झालेला आहे, तर त्या खालोखाल रुग्ण संख्या साक्री तालुक्यात ६२६५ एवढी असून, आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झालेला आहे. शिरपूर तालुक्यातील बाधितांची संख्या ५ हजार १५८ असून, त्यात ९० जणांचा मृत्यू झालेला आहे, तर शिंदखेडा तालुक्यात बाधितांची संख्या ४ हजार ५१९ असून, आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे शासकीय नोंदीवरून स्पष्ट होत आहे.
निमगूळ ठरले हाॅटस्पाॅट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ हे हाॅटस्पाॅट ठरलेले आहे. ७ हजार ४०० लोकसंख्या असलेल्या या गावात दुसऱ्या लाटेत किमान ३५ ते ४० जणांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालायाचे डाॅ. हितेंद्र देशमुख यांच्या म्हणण्यानुसार गावातील फक्त सात-आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
त्याखालोखात शिंदखेडा तालुक्यातील मालपूरमध्येही कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे . सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या १५ दिवसांत १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. गावातील अनेक बाधितांवर सुरत, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत.
साक्री तालुक्यातील म्हसदी हे गावही हाॅटस्पाॅट ठरलेले आहे. १३ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दुसऱ्या लाटेत ११० जणांना कोरोनाची लागण झाली, तर आतापर्यंत म्हसदी परिसरात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आहे.
पिंपळनेर-कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक ग्रामीण भागातील गावांनी कोरोनाला गावात शिरू न देता वेशीवर अडवत गाव सुरक्षित ठेवले होते. पण, दुसऱ्या लाटेत या सर्व गावांमध्ये कोरोनाने प्रवेश करीत हाहाकार माजविला आहे. आतापर्यंत २० ते २५ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला, तर असंख्य नागरिकांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात कोरोना रुग्ण वाढले, आता कोरोना थांबणार कसा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
अधिकृत नोंदच नाही
ग्रामीण भागातील अनेकांवर तालुका, जिल्हा अथवा दुसऱ्या जिल्ह्यात उपचार सुरू असतात. यापैकी काहींचा बाहेरगावीच मृत्यू होतो, तेथेच बाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे त्याची नोंद ग्रामपंचायत स्तरावर होत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांचा नेमका आकडा ग्रामपंचायतीकडून मिळत नाही. शिवाय अनेक ठिकाणी कोरोनाने मृत्यू झाला अशी नोंद होत नाही. त्यामुळे कोरोनामुळे किती व नैसर्गिकरीत्या किती जणांचा मृत्यू झाला ते समजू शकत नाही.
धुळे तालुका
रुग्ण : १८९३९
ॲक्टिव : ५६९
मृत्यू : १०५
शिरपूर तालुका
रुग्ण : ५१५८
अॲक्टिव : ४३५
मृत्यू : ९०
शिंदखेडा तालुका
रुग्ण : ४५१९
ॲक्टिव : ४२८
मृत्यू : ६४
साक्री तालुका
रुग्ण : ६२६५
ॲक्टिव : ११२०
मृत्यू : ५६
हाॅटस्पाॅट ठरलेले काही गावे
निमगूळ
लोकसंख्या ५१५८
मृत्यू सुमारे : ३५ ते ४०
मालपूर
लोकसंख्या ७४००
मृत्यू : १७
म्हसदी
लोकसंख्या १३०००
मृत्यू : २५
पिंपळनेर
लोकसंख्या २५०००
मृत्यू २० ते २२