शासकीय बैठकीत निर्णय
किराणा खरेदी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरुन कठोर निर्णय घेतला जावा त्यासाठी राज्यातील किराणा दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ यावेळेत सुुरु ठेवण्याचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरु झाली आहे.
आदेशाची अंमलबजावणी सुरु
सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत किराणा, भाजीपालासह सर्व दुकाने सुरळीत सुरु राहतील. पण, त्यानंतर अत्यावश्यक सेवेत मेडिकल, दवाखाना वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून पारित होताच पोलीस रस्त्यावर उतरले. महात्मा गांधी पुतळ्यापासून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत पाचकंदिल चौकासह त्याच्याही पुढे हा ताफा रवाना झाला. दुकानांसह भाजीपाला आणि फळविक्रेत्यांसह सर्व लोटगाडीधारकांना हटविण्यात आले. हीच मोहीम आग्रा रोडसह अन्य ठिकाणी राबविण्यात आल्याने सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद करण्यात आल्यामुळे शुकशुकाट पसरला.
पाचकंदिलही शांत
सकाळपासून गजबजणारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला पाचकंदिल चौकाने सकाळी साडेअकरा वाजेनंतर मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. नाहीतर याच चौकात भाजी विक्रेते, फळ विक्रेते, शहरानजिकच खेडे गावात जाण्यााठी रिक्षा यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. शहरातील बहुतेक जणांना पाचकंदिल चौकात येऊन खरेदी केल्याचे समाधान मिळत नाही. दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील पिटळण्यात आले.
नागरिकांची भटकंती थांबली
१५ एप्रिल पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सुविधांना त्यातून वगळले होते. मात्र विनाकारण फिरणारे अत्यावश्यक सुविधांची ढाल वापरत दिवसभर भटकंती करताना दिसत होते. एखाद्या दवाखान्याची फाईल अथवा पिशवी घेवून दवाखान्यात चाललो, औषधी गोळ्या घ्यायच्या आहेत, बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी चाललो अशी काही कारणे पुढे करुन बहुतेेकांची भटकंती सुरु होती. परिणामी लावण्यात आलेला लॉकडाऊन केवळ नावालाच होता. सोमवारी राज्य शासनाने निर्बंध अधिक कडक करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुकानांसाठी सकाळी ते ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ११ वाजेनंतर शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली. नागरिकांची विनाकारण होणारी भटकंतीही थांबली.
पाेलीस बंदोबस्त
शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे व विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षकांसह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरुन बंदचे आवाहन केले. परिणामी सकाळी ११ वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली होती.
व्यापाऱ्यांनीही दिला प्रतिसाद
सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व सुरु राहील त्यानंतर दुकाने बंद करण्याचे आदेश पारीत झाल्यानंतर आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. आपापली दुकाने बंद करुन घरी राहणे पसंत केले. परिणामी गजबजणारी ठिकठिकाणची बाजारपेठ दुपारपर्यंत शांत झाली होती.