लोकांनी मास्क बांधावे यासाठी पोलीस प्रशासन मात्र स्टँड परिसरात कार्यरत आहेत इतकेच काय ते कोरोना प्रसार प्रतिबंधक काम सुरू असल्याचे दिसते. गावात कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाहीत यासाठी आणि संख्या वाढेल तेव्हा लॉकडाऊन करा असे म्हणण्याची वेळ येण्याआधीच आतापासून काळजी घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ग्रामपालिकेने देखील मास्क वापर,सुरक्षित अंतरासाठी प्रबोधन म्हणून स्पीकर रिक्षा फिरविणे यावेळी उचित ठरेल. गावात जागोजागी फलक लिहून लोकांना आवाहन करणे जरुरी वाटते. रिक्षा,टॅक्सी,बसेस मधून गर्दी असते. सुरक्षित अंतराचा प्रश्नच यात येत नाही. यात एखादा जरी संक्रमित व्यक्ती असला तर कोरोना फोफावण्याची भीती असणारच आहे. गर्दीत सध्या प्रवास टाळणे हा देखील बचाव होऊ शकेल. सध्या तरी निजामपूर परिसरात एखादी दुसरी संक्रमित व्यक्ती आढळते आहे. ती संख्या वाढू नये यासाठी आताच जागृत होऊन उपाय योजना करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
निजामपुरात उपाययोजनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST