धुळे- कोरोना साथरोगाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळच्या दूध विक्रीला बंदी घातल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे दूध विक्री व वाटपासाठी लॉकडाऊनच्या नियमातून सूट देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्यासह देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कठोर नियम व अटींसह कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यात दुग्ध व्यवसायासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दूध विक्रीला संध्याकाळी बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यासह सर्व घटकांना नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्याला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय हा मुख्य जोड धंदा आहे. दुधाच्या व्यवसायावरच शेतकऱ्यांची आठवड्याची व महिन्याची आर्थिक घडी अवलंबून असते. दरम्यान दूध उत्पादनासाठी महागडी जनावरे, चारा, ढेप तसेच औषधोपचार आणि मनुष्यबळ यासाठी प्रचंड खर्च येत असतो. हा सर्व खर्च वजा करून शेतकरी आपला चरितार्थ भागवत असतो. मात्र लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळी दूध विक्रीला बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामीण भागातून दुधाचे संकलन करून असंख्य शेतकरी शहरात दूध विक्रीसाठी दररोज सकाळ व संध्याकाळ या दोन वेळेत येत असतात. मात्र लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळी दूध विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हजारो लीटर दुधाचे नुकसान होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूध विक्रीचे सकाळचे नियम जैसे थे ठेवत शहरात दूध विक्रीसाठी लॉकडाऊनच्या नियमत सूट देत संध्याकाळी ६ ते ८वाजे दरम्यान कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे नियम पाळत दूध पोहच विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.