निवेदनात म्हटले आहे की, कळंभीर येथे सन २००१ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले तेव्हापासून या आरोग्य केंद्राचा संलग्नित गावांना आरोग्याच्या दृष्टीने निरंतर फायदा होत आहे. साक्री-निजामपूर रस्त्यावर असलेल्या कळंभीर येथील आरोग्य केंद्राला पोहोचण्यासाठी रुग्णांना दळणवळणाची व्यवस्था चांगली आहे. दिवसभर येथील ओपीडी सुरू असते. २००१ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करताना इमारत बांधण्यासाठी भूखंड मिळाला नाही यात शासनाचा दोष आहे. या कारणाने वीस वर्षांनंतर येथून केंद्र स्थलांतरित करणे योग्य ठरणार नाही. आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी आवश्यक भूखंड ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्यास तयार आहे. आरोग्य केंद्र स्थलांतराचा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास फोफरे व त्या जवळील गावांच्या नागरिकांसाठी दुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे. आरोग्य केंद्र स्थलांतरित केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली. पंचवीस गावांच्या ग्रामस्थांची गैरसोय होत असल्यास संबंधित आरोग्य केंद्र हलविले जाणार नाही असे आश्वासनही टोपे यांनी दिले असे सरपंच रितेश ठाकरे यांनी सांगितले.
कळंभीरचे आरोग्य केंद्र स्थलांतरित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST