लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तत्कालिन शासनाने सुरु केलेले महापरीक्षा आॅनलाईन पोर्टल वादग्रस्त ठरले होते़ परिणामी विद्यमान शासनाने ही परीक्षा पध्तद बंद करण्याचा निर्णय घेताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत़शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तात्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती़ तसेच ते बंद करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु झाल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रसिक खडसे यांनी तसे संकेत दिले होते. विविध विभागातील रिक्त पदांच्या आरक्षण पडताळणीचे काम सध्या सुरु आहे. ७२ हजार पदांची भरती पोर्टल मार्फत न घेता विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे. आता महाभरती पोर्टलद्वारे होणार नाही़ याबाबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली़विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. भरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबवावी व लवकर भरती प्रक्रिया सुरु करावी असे मत देखील त्यांनी व्यक्त केले़विधानसभा निवडणुकीत महापरीक्षा पोर्टलचा मुद्दा तरुणाईने लावून धरला होता. सत्तेत आलो तर वादग्रस्त पोर्टल तात्काळ बंद करु असे आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिले होते. मोठ्या राजकीय नाट्यमय घटनेनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. उद्धव ठाकरे यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लगेच महापरीक्षा पोर्टल बंद करण्याबाबत ट्विट केले होते़ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. शासनाने सर्व प्रथम पोर्टलला स्थगिती दिली होती व विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागवण्यात आले होते. महापरीक्षा पोर्टल बंद करावे अशा प्रकारचे अभिप्राय बहुतांश विद्यार्थ्यांकडून शासनाला प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांकडून होणाºया प्रचंड विरोधानंतर महापरीक्षा पोर्टल अखेर बंद करण्यात आले़
अखेर वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:55 IST