गेल्या दोन महिन्यांपासून कुसुंबा ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील इलेक्ट्रिक पोलवरील दिव्यांचा वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे गावात अंधार होता. माजी जि. प. सदस्य संग्राम पाटील व पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी यांनी ग्रामपंचायतीला वीज बिल भरण्यास सांगितले होते. मात्र, ग्रामपंचायतीने असमर्थता व्यक्त केली होती. अखेर संग्राम पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांना पत्र देऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यातूनही निर्णय न झाल्याने, संग्राम पाटील व रितेश परदेशी हे गुरुवारी जि.प.तील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कामराज पाटील यांनी मध्यस्थी करून जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क करून यावर मार्ग काढण्यास सांगितले. प्रकाश खोपकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता भामरे यांच्याशी चर्चा केली. भामरे यांनी ग्रामपंचायत कुसुंबा यांच्या प्रशासनाशी चर्चा करून बिल भरून गावातील लाईट आजच सुरू करण्यात येईल, असे सांगितले. गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक शेळके, विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी उपोषणकर्त्यांना मागणी मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.
पोलवरील वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST