महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत २८ हजार ८०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर शहरात अनेकांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरी संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ५ ते ३० एप्रिलपर्यंत मिनी लॅाकडाऊन जाहीर केला आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेली आहे. असे असताना बुधवारी तिसऱ्या दिवशी आग्रारोड, पारोळारोड, दत्तमंदिर, संतोषी माता चाैक, चाळीसगाव व मालेगावरोडसह साक्री रोड वरील दिवसभर बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती.
व्यावसायिकसह नागरिक अनभिज्ञ
जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आग्राराेड व अन्य ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना विचारले असताना त्यांना मिनी लाॅकडाऊनबाबत माहीत नव्हते. त्यामुळे देवपूर, साक्रीरोड तसेच पाचकंदिल बाजारपेठेत नागरिक बिनधास्त खरेदी करताना दिसून आले.
कारवाई पथक दिसेना
राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू केलेले असताना बुधवारी शहरातील दुकाने दिवसभर सुरू होती. तर कारवाई करताना मनपाचे पथक कुठेही दिसून आलेले नाही. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारात गर्दी दिसून आली. दरम्यान, नागरिकांना एकाच ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असताना पोलिसांकडून शहरात कोणत्याही ठिकाणी कारवाई करताना दिसून आले नाही.
पेट्रोलपंप, बसस्थानक परिसर
बसस्थानक, पेट्रोलपंप, चहा व नाश्त्याचे गाडे तसेच रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यामुळे मिनी लाॅकडाऊनचे पालन होताना दिसून आले नाही.