धुळे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात लॉकडाऊन केलेले असताना धुळ्यात देखील टप्प्या-टप्प्याने कठोर अंमलबजावणी सुरु झालेली आहे़ पांझरेवर असणारे पूल बंद करण्यात आल्यामुळे शहर आणि देवपूर भागाचा संपर्क थांबविण्यात आलेला आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी केवळ लहान पुल सुरु ठेवण्यात आलेला आहे़ दरम्यान, वर्दळीचे चौक सुध्दा आता बंद केले जात आहेत़शहरातील नागरीकांचे परस्पर संपर्कामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरुन मानवी जिवीताला धोका होऊ नये याकरीता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिसांकडून आखल्या जात आहेत़ शहरातील पांझरा नदीवरील गणपती मंदिर ते मोराणकर बंगलाकडे जाणारा पूल, कालिका माता मंदिर ते जयहिंद स्विमींगकडे जाणारा पूल, महात्मा गांधी पुतळा ते पंचवटीकडे जाणारा मोठा पूल असे तीन पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले़ तर,आपत्कालिन व अत्यावश्यक सेवेसाठी पांझरा नदीवरील दातासरकार ते सावरकर पुतळा दरम्यान असलेला लहान पूल सुरु ठेवलेला आहे़ आवश्यकता असलेल्यांनाच या पुलावरुन वावरता येणार आहे़ याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे़पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळ असणारे पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठ मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़ पुर्वीच्या काळी खजाना लुटीची घटना घडल्यानंतर लूट करणाऱ्यांना पकडण्यासाठी मोठा पूल पोलिसांनी बंद केलेला होता़ तसेच १९६९ मध्ये पांझरा नदीला महापूर आलेला होता़ यावेळी मात्र पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नव्हती़ पूलच बंद झाला होता़ प्लेग, स्वाईन फ्लू असे विविध आजार आले होते़ त्यावेळी मात्र वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची वेळ ओढवली नव्हती़ यंदा मात्र पूलच बंद करण्याचा कटू प्रसंग ओढवला आहे़
धुळे शहर व देवपूरमधील ‘संपर्क’ तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:13 IST