नेर - ग्रामपंचायतीची निवडणूक धामधुमीत पार पडल्या नंतर आता २८ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आणि उत्सुकता लागली आहे. यामुळे प्रत्येकाला सरपंच होण्याची आशा लागून आहे.नेर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली़ यात गायत्री जयस्वाल यांच्या जनता जनार्दन पॅनलने १० जागांवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने ते सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत. त्यांच्याकडे बहुमत असलेल्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या फोटोचे गावात होर्डिंग्ज लावून ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता फक्त सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.प्रत्येकाला सरपंच पदाचे स्वप्नगेल्यावेळी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निघाले होते. त्यामुळे यावेळी वेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडून आलेल्या प्रत्येकाला आपल्या प्रवर्गाचे आरक्षण निघण्याची आशा आहे. त्यामुळे सरपंच पदावर त्यांना दावा करता येणार असल्याने प्रत्येकाला आपणच सरपंच होऊ असे स्वप्न पडू लागले आहेत. मात्र असे असले तरी आरक्षणानंतर कोणाला सरपंच पदाची संधी द्यायची हे पॅनल प्रमुख गायत्री जयस्वाल यांच्यावर अवलंबून राहणार आहे.
नेरच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 23:14 IST