धुळे : नागरपूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरण कामासाठी केलेल्या भूसंपादनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भिमशक्ती संघटनेने केली आहे़याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ चौपदरीकरणासाठी संपादीत क्षेत्रात जमीनी, शेती, कारखाने, खोटी बांधकामे, शेतात खोटी फळझाडे दाखवून कोट्यवधी रुपयांचा मोबदला भूसंपादन विभागाने अदा केला आहे, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे़धुळे जिल्ह्यात महामार्गांचे चौपदरीकरण, औष्णिक वीज प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली योजना आदी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून या प्रशासकीय प्रक्रियेत व्यापारी आणि दलालांचा सुळसुळाट झाला आहे़ राजकीय दबाव देखील वाढला आहे़नागपूर-अहमदाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनी जात नसताना देखील लाखो रुपयांचा मोबदला अदा केल्याचे प्रकारही घडले आहेत, असा गंभीर आरोप भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर, जावीद बेग, अनिल ठाकूर, दत्ता शिंदे, अमोल थोटे, राहूल ठाकूर आदींनी केला आहे़ गैरव्यवहाराची त्वरीत चौकशी केली नाही तर आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा दिला आहे़
भूसंपादनात गैरव्यवहाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:32 IST