धुळे : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शेतकरी आत्महत्या आणि पीडित कुटुंबांना मिळणारी मदत हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
धुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढता आहे तर मदतीचा आलेख मात्र उतरता आहे. सन २०१९ मध्ये ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी केवळ ६२ पीडित कुटुंबांना मदत मिळाली आणि ३७ कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरली. तर गेल्या वर्षी ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी केवळ २४ पीडित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तब्बल ३२ कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ९ प्रकरणे फेर चाैकशीसाठी प्रलंबित असून लवकरच ही प्रकरणे निकाली निघणार आहेत. याचाच अर्थ जिल्ह्यात दोन वर्षांत ०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्या तरी ०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांची सरकारी निकष न पाळताच अखेर झाली आहे असेच म्हणावे लागेल. पात्र ठरलेल्या प्रकरणांमध्ये एक लाखाची आर्थिक मदत मिळते.
शेतकरी आत्महत्येनंतर पीडित कुटुंबांना कोणतेही निकष न लावता सरसकट एक लाखाची मदत देण्याची घोषणा तत्कालीन युती शासनाने केली होती. परंतु ही घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.
मदतीसाठीचे निकष
नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा अशा कारणांमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तरच त्याचे पीडित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरते. महसूल, पोलीस आणि कृषी विभागाचा अहवाल त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. पोलिसांचा अभिप्राय, शवविच्छेदन अहवाल, नापिकीचे कारण असले तर कृषी खात्याचा अहवाल, कर्जबाजारीपणा असेल तर कर्जाचा तपशील आणि वसुलीसाठी तगादा लावल्याचे पुरावे.
चिंचखेडे ता. साक्री : येथे प्रकाश सुकदेव बेडसे वय ५० यांनी डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सतीश वय २० याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आत्महत्या केली. नापिकी, लाल्या रोग, कांदा सडला तसेच सावकार व बँकांचे कर्ज असल्याने या पिता पुत्राने जीवनयात्रा संपवली. शवविच्छेदन अहवालासह धुळ्याला जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्याइतकेही पैसे या कुटुंबाकडे नसल्याने हे कुटुंब मदतीपासून वंचित आहे. मोठा मुलगा आणि आईचा तीन बिघे जमिनीवर उदरनिर्वाह सुरू आहे.
तऱ्हाडी, ता. शिरपूर : येथे गोविंदराव गुलाबराव भामरे यांनी २७ डिसेंबर २०१६ मध्ये आत्महत्या केली. केवळ २ एकर अल्प शेतजमिनीवर त्यांची पत्नी अतिशय संघर्षाने संसाराचा गाडा हाकते आहे. एका मुलाने फायर सेफ्टीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तर एक मुलगा सध्या त्याच कोर्सला आहे. एका मुलीचे लग्न झाले. कर्जमाफी नाही, रेशनचे धान्य नाही, निराधार योजनेचा लाभ नाही. शासकीय योजना या पीडित कुटुंबापर्यंत पोहोचलीच नाही. तहसील कार्यालयाकडून केवळ शिवण यंत्र मिळाले आहे.