शेतकरी पांडुरंग काशीद यांची तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी सोयाबीन पेरणीसाठी ६० हजार रुपये खर्च केला. पिकात तणाचे प्रमाणात वाढ होऊ नये म्हणून १८ व्या दिवशी तणनाशकाची फवारणी केली. दोन दिवसांनंतर फवारणी केलेल्या औषधाचा परिणाम गवतावर होण्याऐवजी सोयाबीन पिकावर दिसू लागला. सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडून ती जळून चालली आहेत. परिणामी साडेचार एकर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. परिणामी संबंधित शेतकरी अडचणीत आला आहे.
चौकट
कुटुंब जगवायचं कसं?
तणनाशक फवारणीने साडेचार एकर सोयाबीनची वाढ खुंटून पाने जळून गेली. पेरणीसाठी ६० हजार रूपये खर्च केला आणि उत्पादनाची शाश्वती नाही. दुबार पेरणी करावी, म्हटले तर पैसे नाहीत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा तरी कसा?
-पांडुरंग काशीद, नुकसानग्रस्त, शेतकरी, माळुंब्रा