मागील वर्षी गणेश उत्सव कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. सार्वजनिक गणेश उत्सवांनाही अनेक बंधने होती. गणेशमूर्तीसाठी उंचीची मर्यादा, दोन्हीवेळच्या आरतीसाठी किती माणसे असावी, सजावट कशी करावी आदीबाबत प्रशासनाने सूचना दिल्या असल्याने मोठ्या गणेशमूर्ती मागील वर्षी दिसल्या नाहीत. गणेश उत्सव साजरा करताना जल प्रदूषण होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती वापराबाबत आवाहन करण्यात आले होते.
यंदा प्रशासनाने कोरोनाचा धोका कायम असताना निर्बंध काहीअंशी शिथिल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता गणेशोत्सव येतो आहे. सध्या गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मूर्त्या जास्त प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पीओपी व शाडू च्या मूर्त्यांचे विसर्जन केले तर त्या लवकर पाण्यात विरघळत नाहीत तसेच पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढते, असे निष्कर्ष काढण्यात आले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढतो आहे. शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आदीकडूनही याबाबत जागरुकता केली जाते आहे. याचे फलित म्हणून काही भागात विशेषतः शहरात आता खाण्याच्या सोड्यापासून गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत.
चौकट -
४८ तासात विरघळते मूर्ती
पीओपी किंवा शाडूच्या मूर्ती विरघळण्यास मोठा कालावधी लागतो. त्या तुलनेत खायच्या सोड्यापासून बनविलेल्या गणेशमूर्ती ४८ तासात म्हणजे दोन दिवसात विरघळतात. तसेच या मूर्ती घरच्या घरी विसर्जित करता येतात. त्यामुळे आता सोड्याचा वापर करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकडे शहरी भागात कल वाढेल, असे चित्र आहे.
चौकट -
पीओपीच्याच मूर्तीची विक्री जास्त
वर्ष पीओपी शाडू
2019 2500 500
2020 2200 350
2021 2600 600 अपेक्षित
चौकट -
ग्रामीण भागात माहिती नाही...
आपल्याकडे पीओपीच्या मूर्त्या जास्त बनवतात तसेच विक्रीसाठी येतात. शाडूच्या मूर्त्यांचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षी कोरोनामुळे मूर्ती विक्रीचे प्रमाण थोडे घटले होते. यंदा चांगली विक्री होईल असा अंदाज आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी आपल्याकडे नदी, विहीर, तळे आदी ठिकाणी गर्दी होते. पीओपी किंवा शाडूच्या मूर्त्या लवकर विरघळत नाहीत. सोड्याचा वापर करून त्या लवकर विरघळत असतील तर तो पर्याय चांगला आहे. परंतु त्याबाबत अजून आपल्याकडे माहिती नाही, असे मूर्तिकार विकास परदेशी यांनी सांगितले.
चौकट -
नंतर खत म्हणून करा पाण्याचा उपयोग -
पाण्यामध्ये सोडा मिसळून त्या पाण्यात मूर्ती विसर्जन केल्यास ती विरघळण्यास ४८ तास लागतात. त्या पाण्याचा वापर नंतर खत म्हणूनही करता येतो. त्यामुळे विसर्जनाची ही पद्धत पर्यावरणपूरक ठरू शकते.