बालाजी आडसूळ
कळंब : अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या ‘तालिबानी’ वर्चस्वाचा प्रतिकूल परिणाम होऊन ‘सुकामेवा’ चांगलाच महागला असून, मागच्या पाच दिवसात सर्रास मागणी असलेला बदामाचा दर सहाशे रूपये किलोवरून हजारी पार करून गेला आहे.
अलिकडे लाईफस्टाईल अन् यामुळे खाद्यसंस्कृती बदलली आहे. श्रीमंतीच्या खुणा दर्शवणारा ‘सुकामेवा’ मध्यमवर्गीयांच्या घरात दिसून येत आहे. मागच्या दशकभरात मागणी वाढलेल्या ड्राय फ्रूटसमधील अंजीर, बदाम, मनुके, काजू, पिस्ता, अक्रोड, शहाजीरे यासह अगदी लज्जतदार ‘टेस्टींग पावडर’ ही प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आयात होते. मात्र, मागच्या आठवडाभरात तेथे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका भारतीय ड्राय फ्रूट बाजाराला बसला असून सुक्यामेव्यातील अनेक वस्तूंचा दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारला आहे.
बॉक्स 1
मागणी कायम, पण ‘स्टॉक’ जेमतेम....
कळंब शहरात ड्राय फ्रूट मार्केट चांगले आहे. बाजारात ठोक, किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडील साठ्यांची एकत्रित माहिती मिळू शकली नसली तरी काही व्यापाऱ्यांनी मागणी कायम आहे, मात्र आमच्याकडे जेमतेम स्टॉक आहे. यामुळे तालिबान संकटाचा येणाऱ्या काळात परिणाम अधिक जाणवणार असल्याचे सांगितले.
बॉक्स 2
दर पूर्ववत होण्याची गरज...
प्रतिक्रिया
कळंब शहरात ड्राय फ्रूटसची मोठी मागणी आहे. परंतु, अचानक झालेली दरवाढ ग्राहकांना झळ देणारी आहे. सहाशे रुपये किलोचा बदाम हजाराच्या पुढे गेला आहे. यामुळे भाव विचारून ग्राहक थांबत आहे. खरेदी टाळत आहे.
- गजानान जाधव, ड्रायफ्रूट विक्रेते, कळंब
बदाम, अंजीर, काजू, मनुके, पिस्ता यांची मागणी जास्त असते. मात्र, दरवृद्धी झाल्याने खरेदी व विक्री यावर परिणाम होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असा दर असेल तर उलाढाल वाढते. यामुळे दर पूर्ववत होण्याची गरज आहे.
- हारून दारूवाले, ड्रायफ्रूट विक्रेते, कळंब
भाव फलक...
ड्राय फ्रूट तणावापूर्वी तणावानंतर
बदाम ६०० १२००
अंजीर ९०० १२००
अक्रोड ८०० १०००
लिंबूसत्व १०० १६०