भूम : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी सर्वपक्षीय फॉम्युर्ला चालला. येथील परंडा रोडवरील अनुसूचित जाती मुलांची निवासी आश्रमशाळेत सकाळी २७ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला. एका फेरीचा निकाल जाहीर होण्यासाठी एक तासाचा कालावधी लागत होता. निकाल बाहेर पडताच समर्थकांकडून गुलालाची उधळण, घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला जात होता. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती म्हणून वालवड, ईट, माणकेश्वर, पाथरुड या ग्रामपंचायतकडे पाहिल जाते. यातील वालवड येथे राष्ट्रवादी-भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय श्री वाल्मीकेश्वर ग्रामविकास पॅनलने ११ जागांवर यश मिळविले असून, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता मोहिते यांची पिछेहाट झाली आसल्याने येथे सत्तांतर झाले. माणकेश्वर येथे जिल्हा परिषद सदस्य शिवसेना स्व. बाबूसाहेब अंधारे यांच्या जनविकास अघाडी पॅनलने १२ जागांवर यश मिळवित ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेतली. पाथरुड येथे महाविकास अघाडी पुरस्कृत पॅनलचे १० उमेदवार विजयी झाल्याने येथेही सत्ता बदल झाला असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या आरसोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार राहुल मोटे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्या पॅनलला यश मिळाले. त्यामुळे येथेही सत्तेच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिंचपूर ढगे येथे माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांचे समर्थक विशाल ढगे यांनी वर्चस्व कायम राखण्यात यश मिळिवले. शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ यांच्या वांगी (बु) गावात त्यांच्याच पॅनलचा पराभव झाला असून, येथे राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य अदिनाथ पालके यांच्या नेतृत्वाखालील ह. भ. प. धोडोपंत दादा महाराज पॅनलने बाजी मारली. नळी वडगाव ग्रामपंचायतीवर वंचित आघाडीचे प्रवीण रणबागूल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ताबा मिळवला. रामेश्वर येथे संत भगवानबाबा परिवर्तन पॅनलने सर्व सातही जागांवर विजय मिळिवला असून, येथे शिवसेना महिला अघाडी तालुकाध्यक्ष अर्चना दराडे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. आष्टा येथे राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामविकास अघाडीला यश मिळाले असून, येथेही सत्तांतर झाले आहे.