(फोटो : अजित चंदनशिवे १३)
तुळजापूर : तालुक्यातील आपसिंगा-उस्मानाबाद मार्गावरील कामठा ते वरवंटी या सहा किलोमीटर अंतरावरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आपसिंगा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हा रस्ता जागोजागी फुटला असून, रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने वाहनचालकांना एकेरी मार्गावरूनच प्रवास करावा लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने आपसिंगा, कात्री, कामठा, वरवंटी येथील नागरिकांना तुळजापूर, उस्मानाबाद, आपसिंगा प्रवास करतेवेळी त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, नादुरुस्त रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, टायर फुटणे अशा घटना देखील घडत आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी नेताना रस्ता खराब असल्यामुळे वेळेत पोहोचवणे कठीण होत असल्याने प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी अमीर शेख यांनी केली आहे.