भूम : शहरातील सहायक निबंधक कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर असले तरी शिपायासह इतर दोन पदे रिक्त आहेत. शिवाय, एक अधिकारी जिल्हा कार्यालयात वर्ग झाल्यामुळे सध्या दोघांवरच या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. परिणामी अवैध सावकारकींच्या तक्रारींवरील कारवाईसह इतरही अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.
शहारासह तालुक्यात २२४ संस्था, २७ सावकार व पतसंस्था आहेत. या सर्वांचा कारभार सांभाळण्यासोबतच पीक कर्जवाटप, पीककर्जावरील व्याज माफीचे महत्त्वाचे कामदेखील या कार्यालयामार्फत केले जाते. विशेषत: अवैध सावकारीला आळा घालण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. परंतू, ही सर्व कामे करण्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध नाही. कर्मचारी नसल्याने आजवर अवैध सावकारकीच्या १८ तक्रारी पेंडिंग आहेत. या कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी जुलै २०२० पासून या कार्यालयातील शिपाईपद रिक्त आहे. यामुळे कार्यालय साफ सफाई होत नसल्याने कार्यालयात दुर्गंधी देखील पसरली आहे. पर्यायाने येथे काम करणाऱ्या व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या कार्यालयात सहायक सहकार हे २०१७ मध्ये रुजू झाले. परंतु, रुजू झाल्यापासून ते उस्मानाबाद येथील डीडीआर कार्यालयात सेवावर्ग झाले आहेत. त्यामुळे पगार या कार्यालयातून निघत असला तरी त्यांना सेवा मात्र उस्मानाबादला बजावावी लागत आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक, सहकार अधिकारी श्रेणी-१ ही दोन पदेदेखील रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत असून, उपलब्ध दोघा कर्मचाऱ्यांनाच तारेवरची कसरत करीत कारभार हाकावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट
अनेक कामे खोळंबली
शासनाच्या वतीने तालुक्यासह शहरातील नागरिकांचे संस्था नोंदणी प्रकरणे, सावकारी लायसन्स, सावकारी तक्रारी, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याबाबत मदत, शेतकऱ्यांची कर्ज माफी, शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत व्याज व अनुदान सवलत ही सर्व कामे वेळेत व तातडीने मार्गी लागावीत याकरिता सहायक निबंधक कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, कर्मचारी अपुरी संख्या असल्याने शेतकऱ्यास अनेक कामे खोळंबली आहेत. सहायक निबंधक व मुख्य लिपिक हे दोनच कर्मचारी असल्याने या कार्यालयाचा पत्रव्यवहारदेखील यांनाच करावा लागत आहे.
पाच दिवस कार्यालय बंद
तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी प्रशासनाने विविध भागातील कर्मचाऱ्यांसोबतच दोघांवर भार असलेल्या सहायक निबंधक कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कर्तव्यावर घेतले. त्यामुळे या कालावधीत पाच दिवस हे कार्यालय चक्क बंद राहिले. या कालावधीत नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.